अन्न व औषध प्रशासनाच्या मनमानी कारभाराचा निषेधार्थ केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनने सोमवारपासून पुकारलेल्या बंदच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्य रुग्ण व नातेवाईक भरडले गेल्याचे पहावयास मिळाले. शहर व ग्रामीण भागातील बहुतेक औषध दुकाने बंद असल्यामुळे चिंताजनक प्रकृती असलेल्या रुग्णांसाठी औषधे मिळविताना नातेवाईकांची दमछाक झाली. दुसरीकडे बंदचा फारसा प्रभाव जाणवला नसल्याचा दावा अन्न व औषध प्रशासनाने केला आहे. रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी खासगी रुग्णालये, शासकीय रुग्णालयांतील औषध दुकानांद्वारे पर्यायी व्यवस्था करण्यात आल्याचे या विभागाने स्पष्ट केले आहे. परंतु, गंभीर रुग्णांना औषधांचा तुटवडा जाणवू नये म्हणून औषध विक्रेत्यांनी व्यवस्था केल्याचे संघटनेने म्हटले आहे.
अन्न व औषध प्रशासनाच्या कारभाराविरोधात राज्यभरातील औषध विक्रेत्यांनी सलग तीन दिवस बंद पुकारला आहे. या आंदोलनात नाशिक जिल्ह्यातील बहुतेक औषध विक्रेते सहभागी झाले. परिणामी, शहरासह ग्रामीण भागातील काही अपवाद वगळता बहुतेक दुकाने बंद होती. त्याची झळ रुग्णांसह नातेवाईकांना सोसावी लागली. बंदमध्ये सहभागी होणाऱ्या औषध विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे सुतोवाच अन्न व औषध प्रशासन विभागाने केले होते. परंतु, पहिल्या दिवशी एकाही विक्रेत्यावर कठोर कारवाई करण्याचे धाडस हा विभाग दाखवू शकला नाही. मुख्यालयाकडून तसे निर्देश न आल्यामुळे ही कारवाई केली गेली नसल्याचे सांगण्यात आले.
नाशिक शहर व परिसरात सुमारे ३०० घाऊक तर ११०० किरकोळ विक्रेते आहेत. संपूर्ण जिल्ह्यात ही संख्या जवळपास चार हजार विक्रेत्यांच्या आसपास आहे. गोळे कॉलनी म्हणजे औषध विक्रेत्यांची घाऊक बाजारपेठ. या ठिकाणी दिवसभर शुकशुकाट होता. काही किरकोळ दुकानांचा अपवाद वगळता जवळपास सर्वच दुकाने बंद होती. बंदला संघटनेच्या काही सदस्यांनी विरोध दर्शविला होता. बंदमध्ये सहभागी न होण्याचे आवाहन संबंधितांनी केले होते. परंतु, त्या आवाहनाला अतिशय तुरळक प्रतिसाद लाभल्याचे दिसत होते. शहरासह जिल्ह्यातील बहुतांश औषध विक्रेते बंदमध्ये सहभागी झाल्याचे संघटनेचे सचिव योगेश बागरेचा यांनी सांगितले. ज्यांनी बंदला विरोध केला, त्यांनी प्रतिसाद पाहून आपली भूमिका बदलल्याचे बागरेचा यांनी नमूद केले. नाजूक परिस्थितीत असणाऱ्या रुग्णांवरील उपचारात औषधाविना अडचणी उद्भवू नयेत याची दक्षताही संघटनेने घेतली. अशा रुग्णांसाठी विक्रेत्यांनी आवश्यक ती औषधे उपलब्ध करण्याची व्यवस्था केल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
बंदकाळात रुग्ण व नातेवाईकांची गैरसोय होऊ नये म्हणून अन्न व औषध प्रशासनाने उपलब्ध केलेल्या मदतवाहिनीवर अनेक भागातून दूरध्वनी आले. त्या त्या ठिकाणी आसपासच्या रुग्णालयातील दुकाने, जिल्हा रुग्णालय आदी ठिकाणावरून संबंधित रुग्णांच्या औषधाची व्यवस्था करण्यात आल्याचे या विभागाचे सहआयुक्त रमेश उरणकर यांनी सांगितले. सिडको, सातपूर, कॉलेजरोड, शालीमार आदी भागातून हे दुरध्वनी आल्याचे त्यांनी सांगितले. शहर व परिसरात अनेक ठिकाणी दुकाने सुरू आहेत. ज्या ठिकाणी दुकाने बंद आहेत, तिथे रुग्णांच्या नातेवाईकांना गरजेनुसार औषधे उपलब्ध करुन दिले जात आहे. दुपापर्यंत जिल्ह्यातील कोणत्याही भागात औषध पुरवठा बंद असल्याची तक्रार आली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अन्न व औषध प्रशासन आणि औषध विक्रेते यांच्यातील वादात रुग्ण व नातेवाईक भरडले गेले. दुकाने बंद असल्याने औषध मिळविण्यासाठी नागरिकांना अनेक ठिकाणी शोधाशोध करावी लागली.