यशवंत ग्रामसमृद्धी अभियान, कुपोषण निर्मूलन, जलसंधारण, ग्रामीण विकास, पशुसंवर्धन अशा अनेक बाबतींत जिल्हा परिषदेचे काम अन्य जिल्हा परिषदांना मार्गदर्शक ठरावे, या दृष्टीने सुरू असल्याची माहिती जि.प.चे अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे यांनी दिली.
जि.प.चे सभापती कल्याण पाटील (बांधकाम विभाग) व बालाजी कांबळे (समाजकल्याण), मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव नन्नावरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबसिंह राठोड आदी उपस्थित होते. जि.प.त २५० अंगणवाडय़ा आहेत. आतापर्यंत ११७ अंगणवाडय़ा ‘आयएसओ’ मानांकनासाठी नोंदणीकृत झाल्या. जिल्हय़ाचे या वर्षी कुटुंब नियोजनाचे उद्दिष्ट १६ हजार १०० असून, आतापर्यंत ११ हजारांचे उद्दिष्ट गाठले गेले आहे. मार्चअखेर ११० टक्क्यांचे उद्दिष्ट ठेवून १०० टक्के उद्दिष्ट गाठले जाईल, असे बनसोडे यांनी सांगितले.
गरोदर माता मृत्यूचे प्रमाण २००४मध्ये १ लाखाला १३० होते. २०१२मध्ये ते घटून १०४ झाले. रुग्णालयात प्रसूती होत असल्यामुळे मृत्यूच्या प्रमाणात घट झाली आहे. जिल्हय़ात ३७ हजार वैयक्तिक शौचालयनिर्मितीचे मार्चअखेरचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत १४ हजार ५३ शौचालये बांधून झाली. या कामात जि.प.चा मराठवाडय़ात अव्वल क्रमांक आहे. गेल्या १० वर्षांत १३६ गावे निर्मलग्राम झाली. २०१३-१४साठी नव्याने ९० गावांचा प्रस्ताव पाठवण्यात आला.
लातूर तालुक्यातील ९० टक्के शाळेत स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून ‘ई लìनग’ची सुरुवात झाली. संगणक व डीव्हीडीची सोयही शाळेत आहे. ऊसतोड, वीटभट्टी कामगारांच्या मुलांसाठी हंगामी निवासी वसतिगृहे सक्षमपणे चालवली जात आहेत. एक हजार ४८३ विद्यार्थ्यांसाठी ३४ ठिकाणी अशी वसतिगृहे चालू आहेत. कामधेनू योजनेंतर्गत १२२ गावांमध्ये बाजार समिती व जि.प.च्या माध्यमातून जनावरांची तपासणी करण्यात आली. महिन्याला २७ लाख रुपयांची दुधाची निर्मिती वाढली. पर्यावरण संतुलित योजना जिल्हय़ातील १७६ गावांत राबवली जात आहे. लातूर जिल्हा यात राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. या योजनेसाठी ९ कोटी ६८ लाख सरकारकडून प्राप्त झाले. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतील जिल्हय़ाच्या कामाचे देशपातळीवर कौतुक झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.
समाजकल्याण विभागामार्फत अल्पसंख्य मुलांसाठी संगणकाचा वापर करून सर्व माहिती उपलब्ध ठेवली. १ कोटी ९९ लाख रुपयांची शिष्यवृत्ती मुलांच्या खात्यावर जमा झाली. जि.प.च्या बहुतांश इमारतींच्या छतावरील पाणी जमिनीत मुरवण्याचे काम पूर्ण झाल्याचे बनसोडे यांनी सांगितले.