देशपातळीवरील कृषी संस्था व कंपन्यांचा सहभाग असलेले राष्ट्रीय कृषी प्रदर्शन व चर्चासत्र १५ ते १९ जानेवारी २०१४ दरम्यान नागपुरात आयोजित करण्यात येणार आहे. देशभरातून पाच लाख शेतकरी या प्रदर्शनाला भेट देण्याची अपेक्षा आहे.
केंद्रीय कृषी सचिव अशोक भार्गव, राज्याचे कृषी सचिव डॉ. सुधीरकुमार गोयल, सहसचिव संजीव गुप्ता यांनी प्रदर्शनाच्या आयोजनाचा विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा घेतला. यावेळी विभागीय आयुक्त वेणु गोपाल रेड्डी, जिल्हाधिकारी सौरभ राव, महापालिकेचे आयुक्त श्याम वर्धने आणि कृषी खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्याचे माजी मुख्यमंत्री व हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जन्मशताब्दी वर्षांच्या निमित्ताने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात येत आहे. याला कृषी वसंत प्रदर्शन असेही नाव देण्यात आले आहे. केंद्रीय चमूने प्रदर्शनाच्या जागेसाठी शहरातील कस्तुरचंद पार्क, रेशमीबाग मैदान आणि वर्धा मार्गावरील कापूस संशोधन केंद्राच्या जागेची पाहणी केली. यामधून केंद्रीय कापूस संशोधन केंद्राच्या जागेची निवड करण्यात आली. या केंद्रातील १७५ एकर जागेवर हे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे.
कृषी क्षेत्रातील बियाणे, फलोत्पादन, तेलबिया, दुग्ध व्यवसाय, मत्स्यपालन, कुक्कुटपालन, कृषी यंत्र सामुग्री, सिंचन, कृषी संशोधन, विस्तार आणि इतरही संबंधित क्षेत्रातील संस्था आणि कंपन्या सहभागी होण्याची शक्यता आहे. या प्रदर्शनासाठी देशभरातून पाच लाख शेतकरी भेट देण्याची अपेक्षा असून या दृष्टीने तयारी करण्याच्या सूचना भार्गव यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. प्रदर्शनासाठी राज्य सरकारकडून ५ कोटी आणि आत्मातर्फे ६ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. कृषी प्रदर्शनासोबतच विविध विषयांवर चर्चासत्र आयोजित करण्यात येणार आहे. परराज्यांतून येणाऱ्या शेतक ऱ्यांची निवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे. वाहनांची व्यवस्था महापालिकेकडून करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त श्याम वर्धने यांनी सांगितले.