गेल्या तीन महिन्यातील अतिवृष्टीमुळे साप बिळाबाहेर पडण्याच्या घटना वाढल्या असून सर्पदंशाने मृत्यू होण्याच्या घटनांचीही नोंद झाली आहे. शासकीय रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णाला नेमक्या कोणत्या प्रजातीचा साप चावला आहे, याची माहिती दिली जात नाही. त्यामुळे उपचारासाठी ‘अँटी व्हेनम’ वापरणे अडचणीचे ठरत आहे. कारण, प्रत्येक विषाक्त सर्पप्रजातीसाठी सर्पदंशावरील उपचार पद्धती वेगवेगळी आहे.  
हुडकेश्वर परिसरात एका मध्यमवयीन इसमाचा नुकताच मृत्यू झाला. त्याला साप चावला असल्याचा संशय आहे. मात्र, याची नोंद झालेली नाही. त्यानंतर एका रेल्वे कर्मचाऱ्याला डय़ूटीवर असताना साप चावला. शांतीलाल बाबूलाल बावरिया (४७) हा अजनी रेल्वे क्वार्टर्स (पाण्याची टाकी) येथील रहिवासी आहे. त्याला पहाटे दोन ते चार वाजताच्या दरम्यान सापाने दंश केला. तो बेशुद्धावस्थेत होता. त्याचा सहकारी डय़ूटीवर आल्यानंतर त्याने त्याला तातडीने मेडिकलमध्ये दाखल केले. परंतु, उपचार सुरू असताना त्याचा शुक्रवारी मृत्यू झाला.
गुरुवारी प्रियंका कॉलनीतील राजू परसराम बावने (४५) घरी फरशीवर झोपला असताना त्याच्या डाव्या हाताला साप चावला. त्यालाही मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु, उपचाराला प्रतिसाद मिळण्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली. नागपूर ग्रामीण परिसरातील जयश्री प्रेमदास मारबते (१८) हिचाही सर्पदंशानंतर मृत्यूशी अनेक दिवस झुंज दिल्यानंतर मृत्यू झाला. तिच्या संपूर्ण शरीरात सापाचे विष भिनले होते.
विदर्भात झालेला अतिरेकी पाऊस, पावसामुळे नागनदी, पिवळी नदी आणि छोटय़ा मोठय़ा नाल्यांना आलेला पूर यामुळे साप मोठय़ा प्रमाणात बिळाबाहेर पडले आहेत. जागोजागी झाडेझुडपे आणि गवत माजल्याने यात सापांनी आश्रय घेतला आहे. अनेक वस्त्यांमध्ये अलीकडच्या काळात साप मोठय़ा प्रमाणात आढळून आले आहेत. भारतात आढळणारे साप पाण्यात राहणारे नाहीत. सापांच्या घोणस, कोब्रा या प्रजाती जहाल विषारी आहेत. सापाचे दर्शन झाल्यास त्याची छेडखानी करू नये, त्याला त्याच्या रस्त्याने जाऊ द्यावे, असे आवाहन वन्यजीवतज्ज्ञ डॉ. बहार बावीस्कर यांनी केले आहे. साप दिसल्यास त्याला मारून टाकण्याचा प्रयत्न केला जाते. कायद्याने हा गुन्हा आहे. अशा प्रसंगी सर्पमित्राला कळवावे. कारण, प्रत्येक साप विषारी नसतो. बिनविषारी साप चावल्यानंतरही केवळ भीतीमुळे माणूस अर्धमेला होतो, असेही डॉ. बावीस्कर यांनी सांगितले.
सर्पदंशाची लक्षणे
सर्पदंशाच्या लक्षणांमध्ये सर्पदंश झालेल्या जागी खूण दिसून येते, सूज येते, असहनीय वेदना सुरू होतात, जखमेतून रक्त येते, जळल्यासारखी संवेदना होऊ लागते, हगवण लागते, खूप घाम येतो, अंधूक दिसते, डोळ्यापुढे अंधारी येते, खूप तहान लागते, उलटय़ा होतात, ताप येतो, स्नायू काम करणे थांबवतात, हृदयाची धडधड वाढते, अशक्तपणा येतो.
उपचार
तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी, सर्पदंशाची जागा डेटॉलने स्वच्छ धुवून घ्यावी, सर्पदंश झालेला भाग उंचावर ठेवाव जेणेकरून रक्ताभिसरण मेंदूपर्यंत होणार नाही, जखमेवर थंड पाण्याचे फडके बांधावे किंवा जखमेपासून २-३ इंच वर घट्ट बँडेज बांधावे, त्यामुळे विष शरीरात पसरणार नाही. नाडीचे ठोके, श्वास आणि रक्तदाब यावर देखरेख ठेवावी, डॉक्टरांची मदत घ्यावी.