जग झपाटय़ाने बदलत आहे. वेगाबरोबर स्वत:ची गती शिक्षणक्षेत्रातील मंडळींनी टिकवली पाहिजे. नवीनतेचा ध्यास घेऊन शिक्षणक्षेत्रात काम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर यांनी केले.
मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेच्या अमृतमहोत्सवी वर्षांनिमित्त आयोजित कार्यक्रमात चाकूरकर बोलत होते. खासदार डॉ. जनार्दन वाघमारे अध्यक्षस्थानी होते. डॉ. गोपाळराव पाटील, मुरलीधर इन्नानी, लक्ष्मीरमण लाहोटी, श्यामसुंदर भार्गव, शैलेश लाहोटी, भगीरथ कलंत्री, डॉ. अर्चना पाटील चाकूरकर आदी उपस्थित होते.
चाकूरकर म्हणाले, की शासकीय यंत्रणेमार्फत शिक्षणात सर्व काही बदल होईल, असे गृहीत धरणे चुकीचे आहे. खासगी शिक्षण संस्थांचा सहभागही तितकाच मोठा आहे. राजस्थान शिक्षण संस्था ही लातुरातील सर्वात जुनी संस्था आहे. ज्या काळात मुलींच्या शिक्षणाची व्यवस्था करण्यास कोणी पुढे येत नव्हते, तेव्हा राजस्थान शिक्षण संस्थेने मुलींसाठी स्वतंत्र शाळा काढली. त्यासाठी संस्थाचालकांनी खिशाला खार लावून शिक्षकांचे पगार दिले. गेल्या ७५ वर्षांत अत्याधुनिक तंत्रज्ञानाची साथ करीत राजस्थान शिक्षण संस्थेने केलेल्या कामाची त्यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली.
एक मूल, एक पेन, एक शिक्षक व एक पुस्तक जगाला बदलवू शकते, असे सांगून डॉ. वाघमारे यांनी संस्थेच्या परिसरात पुरणमल लाहोटी यांचे स्मारक उभारावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. संस्थेचे माजी शिक्षक विनायक माचिले (वय ९१), दहावीचे पहिले विद्यार्थी माणिकराव प्रयाग, मुख्याध्यापिका अंजली देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. कुमुदिनी भार्गव यांनी सूत्रसंचालन केले. श्यामसुंदर भार्गव यांनी आभार मानले.