प्रत्येक मानवाचा जीवनक्रम नियतीने आधीच ठरवून दिलेला असतो, तीच आपल्या उद्दिष्टांना आकार देत असते. ही उद्दिष्टे कशी साध्य करायची, हेही तीच ठरवत असते. त्यामुळे माणूस नियतीपुढे हतबल होतो. माल्कम मगरिज या विचारवंताच्या या विधानाची आठवण यवतमाळचे काँग्रेसचे युवा आमदार निलेश पारवेकर यांच्या अपघाती निधनाने अक्षरश: अंगावर काटे उभे करून आणून दिली आहे.
वडील बाळासाहेब, आई कांताबाई, काका आबासाहेब, चुलत बंधू अण्णासाहेब यांच्यापासून सत्तेचा वारसा लाभलेल्या इजारदारी घराण्यात सोन्याचा चमचा तोंडात घेऊन घाटंजी तालुक्यातील पारवासारख्या खेडय़ात जन्मलेल्या निलेश पारवेकरांच्या अंगी जन्मजातच असामान्य बुध्दीमत्ता, नेतृत्व, सामाजिक सेवेची तळमळ, औदार्य, जिद्द, मानवी व्यवहारासंबंधी आस्था व निव्र्याज प्रेम करण्याची वृत्ती होती. राजकीय वारसा आणि उपजत गुणांमुळे अगदी तरुण वयात राजकीय पातळीवर राजकारणापलीकडचे मत्र निर्माण केले होते. वयाच्या पंचविशीत त्यांनी पंचायत समितीचे सभापतीपद आणि राज्य गृहनिर्माण वित्त महामंडळाचे संचालकपद मिळवले होते. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या युवा ब्रिगेडचे ते सक्रिय सदस्य राहिले. राहुल गांधी यांनीच त्यांना २००९ मध्ये यवतमाळ विधानसभेची उमेदवारी दिली होती. त्यावेळी पारवेकरांनी नवखे असूनही विजयश्री खेचून आणली.
अभियांत्रिकीची पदवी प्राप्त असलेल्या पारवेकरांचे मन मात्र सतत राजकारण व समाजकारणाच विचार करीत होते. आमदार झाल्यावर यवतमाळच्या विकासाचा आराखडा त्यांनी तयार केला होता. जनतेची कामे मुंबईत नव्हे, तर यवतमाळातच झाली पाहिजे म्हणून आपल्या मंगलालय या यवतमाळातील बंगल्याच्याच शेजारी त्यांनी एक शानदार कार्यालय उभारले होते. राजकारणात विरोधक आणि स्वकीयांशी मतभेद झाले तरी मनभेद होणार नाहीत, याची काळजी त्यांनी घेतली होती.
‘‘आई, मी सायंकाळी सात वाजेपर्यंत घरी येतो. तू काळजी करू नको’’, असे सांगून गेलेला माझा निलेश दुपारी घरून गेला, पण त्याचे पाíथवच घरी आले, असे जेव्हा त्यांची आई मंत्री मनोहरराव नाईक यांना साश्रूनयनांनी म्हणाली तेव्हा उपस्थित सर्वाचा आक्रोश बघवत नव्हता. वयाच्या ४२ व्या वर्षी पतीचे अपघाती निधन झाल्याच्या वात्रेने पत्नी नंदिनी व तिच्या आठ व दहा वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींची झालेली अवस्था शब्दातीत आहे.
प्रवासात भेटलेली माणसे विसरली जातात, आपल्या आयुष्यात भेटत असलेल्या माणसांची इतकी गर्दी झालेली असते की, त्यांच्या आठवणी धुसर होतात, पण आमदार निलेश पारवेकरांसारख्या तरुण लोकनेत्याचा एकदा झालेला परिचय मनावर कायमचा परिणाम करून गेला.