मालेगाव कॅम्प भागातील शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात रोडरोमिओंचा उपद्रव वाढल्याने विद्यार्थिनी वैतागल्या आहेत. टवाळखोरांकडून विद्यार्थिनींना उद्देशून होणारी शेरेबाजी व छेडछाड, यामुळे रस्त्याने जाताना विद्यार्थिनींना अक्षरश: जीव मुठीत धरूनच जावे लागते. पोलिसांनी नुकतीच विशेष मोहीम राबवून विद्यार्थिनींना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. या मोहिमेमुळे टवाळखोरांचा उपद्रव बऱ्यापैकी कमी झाल्याचे आढळून येत असले तरी पोलिसांचा धाक कमी झाला की पुन्हा त्यांचा हैदोस सुरू होत असल्याचा अनुभव आहे. त्यामुळे ही प्रवृत्ती वेळीच ठेचण्यासाठी पोलिसांच्या कारवाईत सातत्य हवे, शिवाय पालकांनीही सजगता दाखविणे अपरिहार्य झाले आहे
शहरातील महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालय परिसरात महिला महाविद्यालय, शेतकी शाळा, के. बी. एच हायस्कूल, कन्या विद्यालय, संगीत महाविद्यालय, फार्मसी महाविद्यालय आहेत. त्याशिवाय परिसरात विविध खासगी क्लासेसही आहेत. विद्यार्थिनींना रोडरोमिओंच्या त्रासाला अनेकदा सामोरे जावे लागते. मसगा कॉलेज ते रावळगाव नाका, दाभाडी उपकेंद्र रस्ता, सोयगाव चौफुली, एकात्मता चौक या भागातून जाताना तर मुलींना अग्निदिव्यच पार करावे लागते. कर्कश आवाजातील हॉर्न वाजवित मुलींचा पाठलाग करत वाहन चालविणे, त्यांची छेड काढणे, शेरेबाजी करणे, असले उद्योग हे टवाळखोर करत असतात. विना क्रमांकाची दुचाकी सूसाट चालविणे, असाही त्यातील काहींचा षौक असतो. कॉलेज स्टँड परिसरात असणाऱ्या टपऱ्या, दुकाने यांच्या आश्रयालाही टवाळखोर घुटमळत असतात. टवाळखोरांपैकी अनेक जण हे शाळा-महाविद्यालयांशी संबंधित नसतात.
टवाळखोरांचा पुरता बिमोड करण्यासाठी ठोस पावले न उचलली गेल्याने काही दिवसात त्याच्यातील भीड चेपली गेली. त्यातूनच महाविद्यालयाच्या रस्त्यांवर ऑईल पेंटच्या सहाय्याने विद्यार्थिनींना उद्देशून अश्लिल मजकूर लिहिण्यापर्यंत काहींची मजल गेली. विद्यार्थिनी व पालकांनी या संदर्भात तक्रारीचा सूर लावल्यानंतर महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांनी  अप्पर पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी सर्वप्रथम महापालिकेकरवी कॉलेज स्टँड परिसरात टवाळखोरांचे अड्डे बनलेले अतिक्रमण काढले. त्यानंतर दिवसभर विद्यार्थ्यांच्या वाहनांची तपासणी सुरू केली. त्यात परवाना नसणे किंवा वाहनाची कागदपत्रे नसणे, या सारख्या कारणांमुळे सुमारे १५० जणांविरूध्द दंडात्मक कारवाई करण्यात आली. परिसरात एका महिला उपनिरिक्षकासह साध्या वेशातील पोलिसांना तैनात करून टवाळखोरांवर नजर ठेवण्याची मोहीम हाती घेण्यात आली. कोणी त्रास देत असल्यास तत्काळ पोलिसांना कळविण्याचे आवाहन करण्यात आले.
पोलिसांच्या या कारवाईमुळे रोडरोमिओंचे धाबे दणाणले. चार-पाच दिवसांपासून विद्यार्थिनींना टवाळखोरांपासून होणारा त्रास कमी झाल्याचे दिसत आहे. परिसरात पोलीस कायमस्वरूपी तैनात असले तरच या प्रकारांना कायमस्वरूपी पायबंद बसू शकेल. रस्त्यांवर अश्लिल मजकूर लिहिणाऱ्यांचा शोध घेणे पोलिसांना सहजशक्य आहे. मोहिमेच्या निमित्ताने या भागात पोलीस चौकी गरजेची असल्याचे दिसून आले. महापालिका व संबंधित शिक्षण संस्थांनी पुढाकार घेऊन त्यासाठी जागा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
टवाळखोरांबरोबरच शाळा, महाविद्यालयांमधील वाढती गुन्हेगारी हा सध्या चिंतेचा विषय झाला आहे. पालकांची उदासिनता व होणारे दुर्लक्ष, हे प्रमुख घटक त्यासाठी कारणीभूत असल्याचा आक्षेप विविध शैक्षणिक संस्थांच्या व्यवस्थापकांकडून हल्ली घेतला जात आहे. पालक मेळाव्यांना उपस्थित राहणाऱ्यांची संख्या नगण्य असते. परवाना नसतानाच अनेक मुले वाहन चालवत असतात, ही बाबही पोलिसांच्या द्दष्टिने डोकेदुखी ठरत आहे. उंच किंमतीचे भ्रमणध्वनी वापरणे ही विद्यार्थ्यांची फॅशन झाली आहे.
चैन भागविण्यासाठी घरून पुरेशा प्रमाणात पैसे उपलब्ध होणे अशक्य झाले की मग त्यातील काही मुले वाममार्गाचा अवलंब करण्यापर्यंत मजल गाठतात. यामध्ये उच्च प्रतिष्ठितांच्या मुलांचाही समावेश दिसून येतो.