जीवनात नुसता भाबडा आशावाद असून चालत नाही. त्यात वास्तवाचे भान आणि आचरणाचे बळ असावे, असे प्रा. डॉ. यशवंत सुमंत यांनी येथे सांगितले. येथील जे.ई.एस महाविद्यालयातील गांधी अध्ययन केंद्राच्या वतीने ‘महात्मा गांधींचा मूल्यविचार’ या विषयावर आयोजित राज्यस्तरीय शिबिराचा समारोप करताना ते बोलत होते. जिल्हाधिकारी श्याम देशपांडे अध्यक्षस्थानी होते.
डॉ. सुमंत म्हणाले, की सत्य आणि निष्ठा हीच गांधीजींच्या जीवनाची ऊर्जा होती. त्यांनी मूल्यांचे शाश्वत आणि सामूहिक प्रयोग केले. मूल्यांच्या मागे शक्ती उभी करावी लागते आणि मूल्य जेव्हा आचरणाचा भाग बनते तेव्हाच ही शक्ती उभी राहाते.
जिल्हाधिकारी देशपांडे म्हणाले, की मानवी चेहरा असलेला विकासच खरा होय. त्यासाठी शिक्षण, आरोग्य इत्यादींसारख्या सामाजिक सुविधा महत्त्वाच्या आहेत. प्रत्येक व्यक्तीने सामाजिक कार्यातही सहभागी झाले पाहिजे.
‘वर्तमानातील गांधीविचारांचा संदर्भ’ या विषयावर शिबिरात बोलताना अरुण ठाकूर म्हणाले, की इतिहासात नेहमी व्यक्ती व समुदाय यांच्या संबंधांचा सत्ता हाच पाया राहिला आहे. गांधीजींनी प्रथम हा पाया बदलून या संबंधांना सत्य व स्वातंत्र्याच्या पायावर उभे केले. महात्मा गांधींची व्यक्तिरेखा आणि विचार कालसंगत आहेत. सत्याच्या लढाईत अपयश ही संकल्पना नसते, असे आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी यांनी या शिबिराचे उद्घाटन करताना सांगितले.
या वेळी माजी मंत्री डॉ. शंकरराव राख, प्राचार्य डॉ. रमेश अग्रवाल, महात्मा गांधी अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. यशवंत सोनुने यांची भाषणे झाली.