जायकवाडीतील पाणी आमच्या हक्काचे आहे, ते आम्हाला मिळालेच पाहिजे. पाणी देऊन कोणी आमच्यावर उपकार करीत नाही. थेंबाथेंबाने देण्यापेक्षा गरजेप्रमाणे ते द्यावे, असे मत माजी मंत्री सूर्यकांता पाटील यांनी आखाडा बाळापूर येथे आयोजित राष्ट्रवादीच्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
लोकसभेच्या आगामी निवडणुका, कापूस अनुदान, रस्त्यांची दुरवस्था, जायकवाडीचा पाणीप्रश्न या बाबत श्रीमती पाटील म्हणाल्या की, २७ टीएमसी पाणी आमच्या हक्काचे आहे. पाणी पिण्यासाठी की शेतीसाठी हे सरकारने ठरवायचे आहे. हक्काचे पाणी मिळत नाही, ही खेदाची बाब आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाटय़ाला आला असल्याने येथून राष्ट्रवादीकडून आपण निवडणूक लढविण्यास इच्छूक आहोत.
मात्र, याचा निर्णय पक्षाध्यक्ष शरद पवार घेतील, असेही त्या म्हणाल्या. कळमनुरी तालुक्यातील शेतकऱ्यांवर कापूस अनुदानाबाबत अन्याय होत असल्याच्या तक्रारी आहेत. प्रशासनाने या बाबत चुकीची माहिती दिल्याचे सांगितले जाते. या प्रश्नाकडे आपण लक्ष घालणार असल्याचेही त्यांनी सांगितले.