कोल्हापुरातील शहरातील बेशिस्त वाहतुकीकडे लक्ष वेधत शिवसेनेने प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना मंगळवारी धारेवर धरले. वाहतूक व्यवस्था सुरळीत न झाल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.    
कोल्हापूर शहरातील वाहतूक यंत्रणेचे तीन तेरा वाजले आहेत. वाहतुकीची कोंडी, अस्ताव्यस्त वाहने पार्क करणे या सारख्या प्रकारांमुळे वाहतुकीची शिस्त पूर्णत: बिघडली आहे. या प्रकाराकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय कुलकर्णी, रवी चौगुले, दिलीप पाटील-कावणेकर, जिल्हा परिषद सदस्य बाजीराव पाटील आदींच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक प्रादेशिक परिवहन कार्यालयात गेले. या विभागाचेअधिकारी एस.बी.आटोळे यांना निवेदन देऊन बेशिस्त वाहतुकीला आवर घालण्यात विभागातील कर्मचाऱ्यांना अपयश आल्याचे सांगून त्यांना धारेवर धरले.   
शहरातील बेकायदेशीर अवैध रिक्षा, वडाप, टॅक्सी यांची वाहतूक बंद करावी, खाजगी प्रवासी वाहतूक बसस्थानक परिसरातून हटवून ती शहराबाहेर न्यावी, शहरातून चालणारी बॉक्साइटची वाहतूक बंद करण्यात यावी, अवजड वाहने शहरात येण्याची वेळ निश्चित करावी, विद्यार्थ्यांना कोंबून नेण्याऐवजी त्याला शिस्त लावावी आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या.