विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजप आमदारांच्या आरोप-प्रत्यारोप आणि घोषणांनी गाजला. या घोषणाबाजीमुळे परिसरात सकाळच्यावेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले परंतु, दोन्ही पक्षाच्या काही ज्येष्ठ आमदारांनी समन्वयाची भूमिका घेतल्यामुळे घोषणाबाजीवर पडदा पडला.
सिंचनाच्या प्रश्नावरून विरोधक एसआयटी चौकशीची मागणी करीत असताना सत्तापक्ष गेल्या पाच दिवसांपासून त्यावर कुठलेच उत्तर देत नसल्यामुळे कुठल्याही चर्चेविना सभागृहात गोंधळ होत असल्यामुळे तहकूब केले जात आहे. आधिवेशनाचा दुसरा आठवडा संपत असताना विदर्भासह राज्यातील कुठल्याही विषयावर चर्चा होत नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांच्या नेतृत्वात सर्व आमदारांनी विधिमंडळाच्या पायरीवर बसून घोषणाबाजी सुरू केली. अजित दादा शेर है, भाजपावाले चोर है.. हिंमत असेल तर मैदानात या. पळकुटे विरोधी पक्षाचा धिक्कार असो.. विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा झालीच पाहिजे.. अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून घोषणाजी सुरू असताना दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे आमदार सभागृहाच्या पायरीवर थांबले आणि त्यांनी आक्रमक होऊन ‘अजित पवार चोर है, राष्ट्रवादीचे मंत्री भ्रष्टाचारी, अजित पवार हाय हाय’ अशा घोषणा सुरू केल्या. या घोषणायुद्धामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड, विद्या चव्हाण, राजेंद्र शिंगणे, शशिकांत शिंदे तर भाजपकडून सरदार तारासिंग यांच्यासह अनेक आमदार आघाडीवर होते. जवळपास २० मिनिटे दोन्ही पक्षांकडून आक्रमकपणे घोषणाबाजी सुरू असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आणि काँग्रेसचे आमदारांनी मात्र भाग घेतला नाही. मनसेचे आमदार बाळा नांदगावकर सभागृहात प्रवेश करताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी मनसेच्या आमदारांना पाहून ‘ये अंदर की बात मनसे हमारे साथ है’ अशी घोषणा देणे सुरू केले मात्र, मनसेच्या आमदारांनी या घोषणाबाजीला फारसे महत्त्व न देता सभागृहात प्रवेश केला.
आमदार जितेंद्र आव्हाड तर भाजपाच्या काही आमदारांना लक्ष्य करीत त्यांच्या नावाने घोषणा देत होते. वैयक्तिक पातळीवर टीका करण्याचे प्रकार सुरू झाले असताना एकाक्षणी दोन्ही पक्षांच्या आमदारांमध्ये हमरीतुमरी होते की काय असे वाटत असताना काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पायरीवर ठाण मांडून बसलेले राष्ट्रवादीचे आमदार निघून गेल्यावर आणि भारतीय जनता पक्षाचे आमदारांनी एक एक करीत सभागृहात प्रवेश केला आणि जवळपास वीस ते पंचवीस मिनिटे चाललेले घोषणायुद्ध अखेर शांत झाले.