मंडलिक-शेट्टी या खासदारद्वयांचा ऊसदराच्या तोडग्याला संमती दर्शवीत जिल्ह्यातील बहुतांशी साखर कारखाने उद्या शनिवारपासून सुरू होत आहेत. शुक्रवारी बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, आमदार के. पी. पाटील यांनी २७०० रुपये दर देण्याची घोषणा करीत उसाच्या दराबाबत एक पाऊल पुढे टाकले. बिद्रीपेक्षा कोणता कारखाना आणखी जादा दर देणार याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
    उसाला ३००० रुपये पहिली उचल द्यावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलन छेडले आहे. काल गुरुवारी रात्री सदाशिवराव मंडलिक व राजू शेट्टी या दोन खासदारांची बठक झाली. त्यामध्ये २६५० रुपये उसाला दर देण्याचे मान्य करण्यात आले. प्रथम २२०० रुपये आणि दोन महिन्यांनंतर ४५० रुपये अशा दोन टप्प्यांत ही रक्कम शेतकऱ्यांना देण्यावर एकमत झाले. यानिमित्ताने गेले दोन महिने निर्माण झालेली ऊसदराची कोंडी अखेर फुटली. दोघा खासदारांतील तडजोडीचा हाच मुद्दा इतर कारखान्यांनाही पसंत पडला असल्याचे आता दिसू लागले आहे. बिद्री कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील यांनी तर आणखी ५० रुपये जादा देण्याची तयारी दर्शवल्याने शेतकऱ्यांनी या निर्णयाचे चांगले स्वागत केले आहे. प्रथम २२५० आणि दोन महिन्यांनंतर ४५० रुपये बिद्रीच्या वतीने शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत. शाहू कारखान्याचे अध्यक्ष विक्रमसिंह घाटगे यांनीही दोघा खासदारांनी मान्य केल्याप्रमाणे दर देणार असल्याचे शुक्रवारी गाळप हंगाम शुभारंभप्रसंगी घोषित केले. कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभ शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते शुक्रवारी पार पडला. वारणा सहकारी साखर कारखाना गेल्या आठवडय़ाभरापासून सुरू असला तरी अद्याप त्यांच्याकडून दराबाबत भाष्य झालेले नाही.
    दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील उर्वरित साखर कारखाने शनिवारपासून सुरू होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. दत्त, गुरुदत्त, जवाहर, शरद, बिद्री, भोगावती, आजरा आदी कारखान्यांच्या गव्हाणीत उद्या उसाची पहिली मोळी पडणार आहे.
 मुश्रीफांचे शेट्टींवर टिकास्त्र
    ऊसदरासाठी २२०० व ४५० रुपये अशा दोन तुकडय़ांत २६५० रुपयांवर तडजोड करून स्वाभिमानीचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला असल्याचा आरोप कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत केला. स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्याशी संपर्क साधून आपण २२०० आणि २०० रुपयांचे २ हप्ते असा ऊसदराचा फॉम्र्युला दिला होता. खोत यांनी शेट्टींशी चर्चा करून निर्णय कळवण्यात येईल, असे सांगितले होते. प्रत्यक्षात खासदार मंडलिक यांच्याशी चर्चा करून शेट्टी यांनी २६५० रुपये दर स्वीकारून शेतकऱ्यांचे जबर आíथक नुकसान केले आहे. शेट्टी यांच्या या भूमिकेमुळे शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झालेला असून त्याची जबाबदारी घेऊन शेट्टी यांनी खुलासा करावा असे आवाहन मुश्रीफ यांनी केले. ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी ऊसदर आंदोलनाबाबत कार्यक्रम करून दाखवावा असे जे विधान केले आहे त्याचा शेट्टी विपर्यास करीत असल्याचे नमुद करून मुश्रीफ यांनी त्याची सीआयडी चौकशी करण्याची मागणी केली.