ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोळसा गावातील गावकऱ्यांवर पुनर्वसनासाठी दबाव टाकण्यात येत असून या गावकऱ्यांचे वनविभागातील रोजंदारीचे काम वनविभागाने बंद केले असून ते पूर्ववत सुरू करण्यात यावे, अशी मागणी प्रहार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केली.
राज्य शासनाचे वनखात्यातील सचिव प्रवीण परदेशी यांनी ९ मार्चला कोळसा येथील जिल्हा परिषद शाळेत वनविभागाचे अधिकारी व तहसीलदारांची गावकऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. यात ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या व्यवस्थापनाने कोळसा गावातील गावकऱ्यांचे वन विभागातील रोजंदारीचे काम १३ मार्चपासून बंद करण्याची सूचना गावकऱ्यांना देण्यात आली होती. गावकऱ्यांचे काम बंद करणे हा गावकऱ्यांवर केलेला अन्याय आहे. वनअधिकारी व महसूल अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांनी लवकरात लवकर गाव खाली करावे, असे सांगून व पुनर्वसनासाठी तयार व्हा अन्यथा, वनविभागातील रोजंदारीची कामे देणार नाही, अशा धमक्या दिल्या, असा आरोपही देशमुख यांनी यावेळी केला आहे. १३ मार्चला या विभागाने कोळसा गावातील १५ लोकांना कामावरून काढले. या गावातील लोकांचा रोजंदार हा एकमेव जगण्याचा मार्ग असून यांना कामावरून काढण्यात आल्याने त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. या सोबतच अंगणवाडी व पंचायत समितीचीही कामे बंद करण्यात आली आहे. शासनाच्या नियमानुसार कोळसा गावातील गावकऱ्यांवर पुनर्वसन करण्यासाठी दबाव टाकता येतो व आता आचारसंहिता लागली असून असा प्रकार वनविभागाकडून होत आहे, ही बाब गंभीर असून आचारसंहितेच्या नियमानुसार संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, असे आवाहनही देशमुख यांनी केले आहे. या सर्व बाबतीत ७ दिवसात शासनाने निर्णय घ्यावा अन्यथा, पुढील भूमिका लवकरच घेण्यात येईल, असेही ते म्हणाले. कोअर झोनमधील गावांचे पुनर्वसन करणे याला आमचे समर्थन नाही. पुनर्वसनातील कामांमध्ये मोठय़ा प्रमाणात घोळ झाला आहे. गावकऱ्यांचे बळजबरीने पुनर्वसन करणे हा गुन्हा असून याची चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या गावात १४० कुटुंबे होती. त्यापैकी ४५ कुटुंबे २००७ साली भगवानपूरला स्थायीक झाली व २०१२ मध्ये १२ कुटुंबेही भगवानपूरला गेली आहेत. आता या गावाची लोकसंख्या ५०० च्या जवळपास असून यात ३८० मतदार आहेत. पत्रकार परिषदेला गावातील ग्रामपंचायत सदस्य शांता कुळमेथे, गजानन वेलके, सुधाकर आत्राम, दशरथ पेंदाम, सतीश सिडाम, सतीश नैताम, निळा शिडाम, अहिल्या मेश्राम, गीता मडावी, मुकेश मेहता, नामदेव पेंदाम आदी उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 20th Mar 2014 रोजी प्रकाशित
ताडोबातील कोळसावासीयांवर पुनर्वसनासाठी दबाव, रोजंदारीही बंद
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोळसा गावातील गावकऱ्यांवर पुनर्वसनासाठी दबाव टाकण्यात येत असून या गावकऱ्यांचे वनविभागातील रोजंदारीचे काम वनविभागाने बंद केले असून ते पूर्ववत सुरू करण्यात यावे, अशी मागणी प्रहार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केली.

First published on: 20-03-2014 at 12:43 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tadoba tiger reserve kolara villages rehabilitation