रात्रशाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी आझाद मैदानात धरणे आंदोलन सुरू करण्यात आले असून याला राज्यभरातील शाळांतील शिक्षकांनी प्रतिसाद दिला आहे. शिक्षक आमदार रामनाथ मोते यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे.
मुंबईसह राज्यात १७६ अनुदानित रात्रशाळा असून तेथील शिक्षकांची संख्या १३४५ व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या ५७७ आहे. त्यांपकी फक्त रात्रशाळेत काम करणारे शिक्षक ३५२ असून शिक्षकेतर कर्मचारी २३९ आहेत. या रात्र शाळांमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांना अर्धवेळ कर्मचारी गणले जात असून त्यांना अध्रे वेतन दिले जाते, तर घरभाडे भत्ता अजिबात दिला जात नाही. त्यांचा भविष्य निर्वाह निधी कापला जात नाही. पेन्शन योजनाही लागू नाही.
त्यामुळे निवृत्तीनंतर अशा शिक्षकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. प्रसंगी मजुरीही करावी लागते. शासनाने रात्रशाळा शिक्षकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले असून याबाबत शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी सोमवारी आझाद मदानात बेमुदत धरणे आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. रात्रशाळांच्या प्रश्नांबाबत शिक्षण विभागाकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतर शासनाने १५ मार्च २००७ रोजी समिती स्थापन केली होती. या समितीने २९ जुलै २००९ रोजी शासनास अहवाल सादर केला. तथापि गेल्या चार वर्षांत यासंदर्भात कोणतीही कार्यवाही झालेली नसून ही लोकप्रतिनिधी व शिक्षकांची फसवणूक आहे, असा आरोप शिक्षक परिषदेचे संघटनमंत्री अनिल बोरनारे यांनी केला आहे.