जिल्ह्य़ासह शहरात यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वाघूर धरणातील उपयुक्त पाणीसाठा शुन्यावर आल्याने शहरात दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे. दरम्यान, पाणी वितरणाचे आवश्यक ते नियोजन न केल्यास ही समस्या आणखी भीषण होणे निश्चित असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
शहरासह जामनेर आणि तालुक्यातील काही गावांना वाघूर धरणातून पाणी पुरवठा केला जातो. तथापि, वाघुरचा उपयुक्त पाणीसाठा शून्यावर आला असल्याने पाणी कपात करा असे, पत्र वाघूर प्रकल्प विभागाने जळगाव व जामनेर पालिकेला दिले आहे. महत्वाची बाब म्हणजे, शहराला आताच दोन दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. त्यात आणखी वाढ झाल्यास व पुढे जानेवारी ते जुन २०१३ पर्यंत स्थिती काय असेल याविषयी येथे चर्चा सुरू झाल्या आहेत.
जिल्ह्य़ात या वर्षी सरासरी पन्नास टक्के पाऊस झाल्याने धरणाच्या पाणीसाठय़ात वाढ झालीच नाही. जळगाव तालुक्यातील वाघूर प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस न झाल्याने नदी-नाल्यांना पूर आले नसल्याने वाघूर प्रकल्प तहानलेलाच राहिला. त्याचे परिणाम यंदा पावसाळ्यातच जाणवायला लागले होते. वाघूर प्रकल्प विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रकल्पातील मृतसाठा ७६.७८ दशलक्ष घनफूट इतका असून उपयुक्त पाणीसाठा शून्यावर आला आहे. या स्थितीत पाणी वाटपाचे नियोजन करणे आताच आवश्यक असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. जळगाव महापालिका शहरातील नागरिकांकडून दोन हजार रुपये पाणी पट्टीच्या स्वरुपात वसूल करते. प्रशासन व सत्ताधाऱ्यांनी बाराशे रुपयांवरून सोळाशे व पुढे दोन हजार इतकी वाढ तीन वर्षांत केली. ही दरवाढ करताना शहराला दररोज शुद्ध पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सताधाऱ्यांचे हे आश्वासन हवेतच विरले असून एक दिवसाआड म्हणजे वर्षांत दिडशे दिवसही महापालिका शहराला सुरळित पाणी पुरवठा करू शकलेली नाही. दिवाळीनंतर
शहरात दोन दिवसाआड पाणी पुरवठा सुरू झाला आहे.
त्यातच गळतीमुळे वाहिन्या दुरूस्त करण्यासाठी मंगळवार व बुधवारी शहरात पाण्याचा ठणठणात होता. वाघूरचा मृतसाठा व त्या पाण्यावर अवलंबून असलेली गावे पाहता पुढे चार दिवसाआड पाणी पुरवठा करणे क्रमप्राप्त ठरणार आहे. दुष्काळी स्थितीमुळे निर्माण झालेल्या पाणी टंचाईमुळे शहराची तहान भागविण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. त्याला यश न आल्यास जळगावकरांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल हे निश्चित.