पन्नास वर्षांतील सर्वात मोठी वाहतूक कोंडी
मुंब्रा-बायपास मार्गावरील सीमेंट क्राँक्रीटचा रस्ता बुधवारी पहाटे खचल्यानंतर या मार्गावरून जाणारी सर्व प्रकारची वाहतूक बंद करून ती ऐरोलीमार्गे वळविण्यात आल्याने गुरुवारी पहाटेपासून ठाणे- बेलापूर मार्गावर चक्का जाम झाल्याचे चित्र होते. शिळफाटामार्गे येणारी ही वाहतूक ठाणे-बेलापूर मार्गावरील दैनंदिन वाहतुकीत मिसळल्यानंतर या मार्गावर गेल्या ५० वर्षांत कधी झाली नाही एवढी वाहतूक कोंडी निर्माण झाली. सुमारे पाच हजार वाहने या मार्गाच्या दोन्ही बाजूस उभी होती. त्याचे परिणाम नंतर मुलुंड-ठाणे मार्गासह शहरातील अंतर्गत रस्त्यांवर झाले. दुपारी एक वाजता ही वाहतूक सुरळीत झाली. सहा तासाच्या या वाहतूक कोंडीमुळे नोकरदार व विद्यार्थी वेळेवर पोहचू शकले नाहीत.
मुंब्रा शहरातील वाहतुकीला पर्याय म्हणून बांधण्यात आलेल्या मुंब्रा बायपास मार्गाचे काम अत्यंत निकृष्ट असल्याचे यापूर्वी अनेक वेळा स्पष्ट झाले आहे. पारसिक डोंगराच्या पायथ्याशी बांधण्यात आलेला हा मार्ग डोंगरदऱ्यातून येणारे पाणी आणि माती यांच्यासमोर टिकाव धरणार नाही. त्यामुळे बुधवारी या मार्गावरील रस्ता पूर्णपणे खचला आणि या मार्गावरून दिवसाला जाणारी ६० हजार वाहनांची वाहतूक शिळफाटामार्गे व्हाया ऐरोली-मुलुंड खाडी पुलावरून ठाण्यात वळविण्यात आली. ठाणे-बेलापूर मार्गावर (जेएनपीटीमुळे कंटेनरची संख्या जास्त) अगोदरच खूप मोठय़ा प्रमाणात वाहतूक असल्याने मुंब्रा बायपासच्या वाहतुकीची भर त्यात पडली आणि पहाटेपासून हे मार्ग दुतर्फा जाम झाले. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी टी जंक्शन आहेत, त्या ठिकाणी चारही बाजूने येणाऱ्या वाहतुकीमुळे वाहतूक कोंडीचे बारा वाजल्याचे दृश्य होते. नवी मुंबईच्या औद्योगिक पट्टय़ात जाणाऱ्या चाकरमान्यांची वाहने दहानंतर या मार्गावर आल्यानंतर ही वाहतूक कोंडी एवढी वाढली की पुढील तीन तास गाडीत बसून राहण्याशिवाय नोकरदारांना दुसरा पर्याय उरला नव्हता. या अभूतपूर्व वाहतूक कोंडीचे परिणाम नंतर रबाले, गोठवली, तळवली, एमआयडीसी, येथील अंतर्गत रस्त्यावर उमटले. त्यामुळे शाब्दिक चकमक, शिवीगाळ होत असल्याचे दृश्य दिसून येत होते. ही वाहतूक नंतर शहरात पसरली होती. मुंब्रा बायपास मार्गावरील एक मार्गिका उद्या दुपापर्यंत खुली करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तोपर्यंत वाहतूक कोंडीचा हा भस्मासुर ठाणे-बेलापूर मार्गावर पसरणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले. या मार्गावर झालेली वाहतूक कोंडी सुरळीत करण्याच्या दृष्टीने नवी मुंबई वाहतूक पोलिसांची जादा कुमक पहाटेपासून लावण्यात आली होती. त्यामुळे दुपारी एक वाजेपर्यंत ही वाहतूक सुरळीत होऊ शकल्याचे उपायुक्त विजय पाटील यांनी सांगितले.
पाच हजार
वाहनांना फटका
वाहतूक कोंडीचा सर्वाधिक फटका नोकरदार आणि विद्यार्थ्यांना बसला. शाळेच्या बसेस सकाळी दहा वाजता शाळेत पोहचल्या. पुढील दोन दिवस ही स्थिती राहण्याची वाहतूक पोलिसांची शक्यता गेल्या ५० वर्षांतील वाहतूक कोंडीचा उच्चांक टी जंक्शनवरील खड्डय़ामुळे वाहतूक कोंडीत अधिक भर पडल्याचे पोलिसांचे मत असून मुंब्रा बायपासची एक मार्गिका शुक्रवापर्यंत सुरू करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत.