या बाजार समितीच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीत विठ्ठल देशमुखांनी बाजी मारली आहे. त्यांच्या बाजूने १० संचालकांनी, तर राकाँचे इंगोले यांना २ मतांनी पराभूत व्हावे लागले. त्यामुळे ११ संचालकांच्या गटात मात्र खळबळ उडाली आहे.
गेल्या वर्षी या बाजार समितीचे सभापती जीवन जाधव व उपसभापती विठ्ठल देशमुख यांच्यावर नाराजी व्यक्त करून १३ संचालकांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. तो दाखल होण्यापूर्वीच उपसभापती विठ्ठल देशमुख यांनी राजीनामा दिला. परंतु सभापती जीवन जाधव अविश्वासाला सामोर गेले. मात्र, ऐन वेळी राजकीय समीकरणे बदलल्याने जीवन जाधव यांच्यावरील अविश्वास ठराव बारगळल्याने ते सभापतीपदावर कायम राहिले व त्यांनी विठ्ठल देशमुखांचा राजीनामा मंजूर केल्याने हे पद रिक्त होते.
नवीन वर्षांच्या पहिल्या आठवडय़ात उपसभापतीपदाची निवड करण्यात आली. जीवन जाधव काँग्रेसचे, तर विठ्ठल देशमुख शिवसेनेचे असले तरी त्यांच्यात समन्वय असल्याने बाजार समिती देशमुख चालवितात, असा विरोधी सूर संचालकांमध्ये होता. नोकर भर्ती असो की, गाळे बांधकाम बाजार समिती तशी वादग्रस्त ठरली आहे. या बाजार समितीसाठी गाळे बांधकाम तर चच्रेचा विषय ठरला आहे. काही काळ ‘तेरी भी चूप और मेरी भी चूप’ अशा अवस्थेत एक वर्ष संचालक मंडळ निवडून आल्यानंतर खेळीमेळीच्या वातावरणात चालले. अविश्वास ठराव आणताना १३ संचालकांचा गट होता. अविश्वासाच्या दिवशी २ संचालक फुटले. नंतर ११ संचालकांचा गट कायम राहिला. त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व इतर पक्षांचे समर्थक होते. उपसभापतीपद आपल्याकडे राहावे, असे ११ संचालकांना वाटले असावे. त्यादृष्टीने राष्ट्रवादीच्या वतीने संजय इंगोले यांचे नाव पुढे करून अर्ज दाखल केले.
दुसरीकडे अनुभवी तसेच राजकीय डावपेचात आघाडीवर असणारे शिवसेनेच्या विठ्ठल देशमुखांचे नाव दुसऱ्या गटाकडून निश्चित झाले व त्यात त्यांनी बाजी मारली. १८ संचालक असलेल्या बाजार समितीच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीत विठ्ठल देशमुखांच्या बाजूने १० संचालकांनी मते दिली, तर राकाँचे इंगोले यांना २ मतांनी पराभूत व्हावे लागले.
या निवडणुकीत देशमुख यांनी बाजी मारल्याने ११ संचालकांच्या गटात मात्र खळबळ उडाली आहे. विठ्ठल देशमुख यांनी या निवडणुकीत गुप्त मतदान व्हावे, अशी मागणी केली. तेव्हाच समीकरण बदलल्याचे चित्र स्पष्ट झाले. दोन संचालकांना आपल्याकडे ओढण्यात देशमुख यांना यश मिळाले. हे दोन संचालक कोण, याबाबत सहकार क्षेत्रात मंथन सुरू असले तरी काँग्रेस-राकाँकडे बहुमत असतानाही अपयश मिळाल्याने चच्रेला उधाण आले आहे. सभापतींची भूमिका काय होती, हे नेमके स्पष्ट झाले नसले तरी अनुभवी उपसभापती पुन्हा त्यांना मिळाला, याचे निश्चितच त्यांना समाधान असेल, यात शंका नाही.