महापालिकेच्या दुर्लक्षामुळे पाण्याची नासाडी
एकीकडे पाण्यासाठी नागरिकांची वणवण सुरू असताना पुनप्र्रक्रिया केलेले रोजचे ४० हजार लीटर पाणी नागनदीत वाया जात असून त्याकडे महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष झालेले आहे. स्वयंसेवी संस्थांनी महापालिकेच्या मदतीने मनीषनगरात सुरू केलेल्या प्रकल्पांतर्गत वस्तीत निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा उपयोग विविध कामांसाठी करण्याचे ठरवले आणि प्रकल्प मूर्त रूपातही आणला. मात्र, महापालिकेचे त्या प्रकल्पांर्गत पुनर्प्रक्रियेद्वारे निर्माण होणारे ४० हजार लिटर म्हणजे महापालिकेची आठ टँकर्स पाणी रोजच नागनदीत अक्षरश: फेकून दिले जाते.
मनीषनगर, कैकाडीनगर, महाजननगर, श्यामनगर, जयहिंद सोसायटी आदी सोसायटींचे सांडपाणी गोळा करून त्यावर प्रक्रिया करण्यासाठी उभारण्यात आलेल्या प्रकल्पावर महापालिकेने लाखो रुपयांचा निधी खर्च केला आहे. उन्हाळ्यात सर्वत्रच पाण्याचे दुर्भिक्ष असताना महापालिका मात्र, स्व निधीतून निर्माण झालेल्या प्रकल्पाकडे दुर्लक्ष करून अक्षरश: पाणी वाया जावू देण्यास एकप्रकारे मदत करीत आहे, असे म्हणणे वावगे ठरू नये. हा प्रकल्प मनीषनगरात असून त्यामुळे मनीषनगर, कैकाडीनगर, महाजननगर, श्यामनगर, जयहिंद सोसायटीतील सदनिकाधारकांना या पुनप्र्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर दैनंदिन जीवनात फार होतो. महाजननगर म्हणजेच कैकाडीनगरात भटके विमुक्त आणि बाहेरच्या प्रांतातील लोकांची वस्ती आहे. त्यामध्ये कैकाडी लोकांचे प्रमाण ३५ ते ४० टक्के तर हिंदी भाषकांची ६० टक्के आहे. २००३मध्ये मनीषनगर भागात डिसेंट्रलाईज्ड वेस्टवॉटर ट्रिटमेंट सिस्टिमच्या(डीवाट्स) माध्यमातून एक प्रकल्प उभारण्यात आला. डिवाट्स ही योजना जर्मनी आणि काही संघटनांच्या सहयोगातून भारतात सुरू करण्यात आली असून या कामात युरोपीय संघ, जर्मनी आणि भारत सरकारचा निधी उपयोगात आणला जातो. पावसाचे पाणी, झोपडपट्टय़ा, विश्रामगृह, निवासी वसतिगृह, कारागृह, रुग्णालये या संस्थांतील घरगुती दूषित पाणी बरेच वाया जाते. या दूषित पाण्यावर योग्य प्रक्रिया केल्यास बागेला, सिंचनासाठी, कारखान्यात, नर्सरी, शेती, कत्तलखाने, कार धुण्यासाठी, संडासमध्ये फ्लशसाठी किंवा रस्त्यावरील हिरवळ शाबूत ठेवण्यासाठी या पाण्याचा पुनर्वापर होऊ शकतो.
दहा वर्षांपूर्वी अतिशय ओसाड स्थितीत असलेल्या महाजननगराची सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने सार्वजनिक स्वच्छतेसाठी निवड करण्यात आली होती. आज या नगराबरोबरच आजूबाजूच्या वस्त्यांनादेखील या पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्याचा अतिशय उपयोग होत आहे. महाजननगरात या कैकाडी आणि हिंदी भाषकांच्या १५५ घरांनी स्व खर्चानी संडास बांधले आहेत. डीवाट्सची मूळ संकल्पनाच त्यासाठी राबवली गेली होती. त्यानंतर महापालिकेने या कामी सहकार्य केले. मात्र आज घडीला महापालिकेचेच त्याकडे साफ दुर्लक्ष झाले आहे. यासंदर्भात कन्सॉर्टिअम फॉर डिवाट्स डिस्सेमिनेशन(सीडीडी) सोसायटीचे विभागीय समन्वयक सचित भांडारकर आणि प्रकल्प अभियंता अन्वर अश्रफ यांच्या मते, नागपुरात दर दिवशी ४५० मिलियन लिटर टाकावू पाणी निर्माण होते. त्यापैकी १०० मिलियन लिटर पाणी भांडेवाडीत पुनर्प्रक्रिया केली जाते तर उर्वरित ३५० मिलियन लिटर सांडपाणी नागनदीन किंवा पिवळ्या नदीत वाया जाते. मनीषनगरात उभारण्यात आलेल्या डीवाट्सच्या प्रकल्पांर्तत पुनर्प्रक्रिया केलेले पाणी त्या भागातील नागरिक उपयोगात आणतात मात्र, उर्वरित ४० हजार लीटर पाणी नागनदीत सोडावे लागत आहे. त्याचा उपयोग वर्धा मार्गावरील रस्ता दुभाजकावरील आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूची हिरवळ फुलवण्यासाठी होऊ शकतो. त्यापेक्षा महापालिकेने तेथील टाकीवर एक पंप लावून टँकरद्वारे पाणी घेतल्यास नागपूरच्या हिरवळीत आणखी भर पडायला मदत होईल.
                            (क्रमश:)