नदीकाठच्या रस्त्याला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्यामुळे नदीकाठचा हा रस्ता तातडीने पूर्ण करावा. तसेच या रस्त्यावर सध्या होत असलेली अतिक्रमणेही हटवावीत, अशी मागणी स्थानिक नगरसेविका मुक्ता टिळक यांनी केली आहे.
नदीकाठच्या रस्त्याला आव्हान देणारी परिसर संस्थेने दाखल केलेली याचिका नुकतीच फेटाळण्यात आली असून या निर्णयामुळे नदीकाठच्या रस्त्याचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायालयाच्या निकालानंतर या ऐंशी फुटी रस्त्याचे उर्वरित काम तातडीने सुरू करावे व अतिक्रमणेही हटवावीत, अशी मागणी नगरसेविका टिळक यांनी मंगळवारी आयुक्तांकडे केली. यापूर्वी संभाजी पूल ते शिवाजी पूल दरम्यान रस्ता करण्याचे महापालिकेचे नियोजन होते. मात्र, या नियोजित रस्त्यामुळे १०६ वाडे ताब्यात घ्यावे लागले असते. तसेच चारशे ते पाचशे भाडेकरूंचा प्रश्न निर्माण झाला असता. नारायण पेठ व शनिवार पेठेतील मिळकतींमधून हा रस्ता आखण्यात आला होता. हा रस्ता होत नव्हता, त्यामुळे या वाडय़ांच्या दुरुस्तीलाही परवानगी दिली जात नव्हती. परिणामी, अतिशय जुन्या घरांमध्ये सुमारे चार-पाचशे कुटुंबांना राहावे लागत आहे, अशीही माहिती टिळक यांनी दिली.
न्यायालयाच्या निकालामुळे नदीकाठचा रस्ता पूर्ण होईल. त्यामुळे यापूर्वी ज्या रस्त्याचे नियोजन करण्यात आले होते तो रस्ता विकसित करण्याची गरज राहणार नाही. त्यामुळे या निकालानंतर चार-पाचशे भाडेकरूंना दिलासा मिळाला आहे, असेही त्यांनी सांगितले.
नदीकाठचा रस्ता तातडीने पूर्ण करण्याचे नियोजन महापालिकेने करावे. हा रस्ता  सुरू झाल्यास केळकर रस्ता, शनिवार पेठ, नारायण पेठेसह या परिसरातील वाहतूक कोंडी कमी होऊ शकते. या गोष्टीचा विचार करून नदीकाठच्या रस्त्याला प्राधान्य द्यावे, अशीही मागणी टिळक यांनी आयुक्तांकडे केली आहे.