Meet Aditi Swami : अदिती गोपीचंद स्वामी ही महाराष्ट्रातील एक तिरंदाज आहे. २०२३ मध्ये जागतिक तिरंदाजी स्पर्धेत कंपाऊंड तिरंदाजी स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवून ती वरिष्ठ पातळीवरील तिरंदाजी स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणारी पहिली भारतीय तिरंदाज ठरली. त्याबरोबरच, जागतिक करंडक स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणारी ती सर्वांत लहान वयाची खेळाडू ठरली. याच स्पर्धेत तिने ज्योती सुरेखा वेण्णम आणि परनीत कौर यांच्या साथीने कंपाऊंड तिरंदाजी सांघिक स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवले. अशी कामगिरी करणारा हा पहिला भारतीय संघ ठरला. २०२३ मध्ये जागतिक युवा अजिंक्यपद स्पर्धेत तिने वैयक्तिक आणि सांघिक सुवर्ण पदक मिळवले. या यशानंतर ती एकदम प्रकाशझोतात आली. यानंतर तिला अर्जुन पुरस्कारही मिळाला.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांच्या हस्ते तिला अर्जुन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. साताऱ्यात अर्जुन पुरस्कार मिळवणारी अदिती ही तिसरी खेळाडू आहे. पहिला पुरस्कार ऑलम्पिकमध्ये कांस्यपदक मिळवणाऱ्या कुस्तीगीर खाशाबा जाधव यांना मिळाला होता. तर दुसरा पुरस्कार माणदेश एक्सप्रेस म्हणून ओळख असणारी धावपटू ललिता बाबर हिला मिळाला होता.

आदिती स्वामीच्या कुटुंबीयांवर साताऱ्यात कौतुकाचा वर्षाव झाला. वयाच्या १७ व्या वर्षी साताऱ्याच्या शेरेवाडी गावातील आदिती स्वामीने तिरंदाजी क्रीडा प्रकारात जागतिक सुवर्णपदकाला गवसणी घातली.

हेही वाचा >> World Cancer Day 2024 : ऑपरेशन, केमोथेरपी, न संपणाऱ्या वेदना अन् नवऱ्याची साथ…, कर्करोगाला हरवलेल्या तरुणीची कहाणी

अन् गवसली तिरंदाजीतील आवड

साताऱ्याच्या शेरेवाडी या गावात राहणाऱ्या गोपीचंद स्वामी यांची आदिती ही कन्या. गोपीचंद हे सरकारी शाळेत गणिताचे शिक्षक आहेत तर आई शैला ग्रामसेविका आहे. त्यांना स्वत:ला खेळाची अत्यंत आवड. त्या आवडीतूनच आपल्या मुलीने एकातरी खेळात प्रावीण्य मिळवावे ही त्यांची इच्छा. आदिती १२ वर्षांची असताना गोपीचंद तिला सातारा शहरातील शाहू स्टेडियममध्ये घेऊन गेले आणि तिला विविध खेळांची ओळख करून दिली. तिथे काही मुलं फुटबॉल खेळत होती, तर काही ॲथलेटिक्सचं प्रशिक्षण घेत होती. तर एका कोपऱ्यात काहीजण लक्ष्य ठरवून धनुष्य आणि बाणांची जुळवाजुळव करत लक्ष्य वेधण्याचा प्रयत्न करत होती. अदितीचे लक्ष तिकडेच होते. तिला हा खेळ आवडल्याचे गोपीचंद यांच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. त्यांनी तिला तात्काळ तेथील प्रशिक्षण कार्यक्रमात दाखल केले. अदितीला क्रीडा सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून त्यांनी आपला मुक्काम गावातून सातारा शहरात हलवला.

बारीक अगंकाठी पण विलक्षण एकाग्रता

आदिती लहानपणापासूनच तब्येतीने किरकोळ असल्याने तिला शारीरिक मेहनतीचे खेळ तितकेसे रुचले नाहीत. मात्र, तिरंदाजीला एकाग्रता महत्त्वाची असल्याने तिने या खेळाची निवड केली, असे तिच्या वडिलांनी सांगितले. आदिती तिच्या प्रशिक्षकांकडून म्हणजेच प्रवीण सावंत यांच्याकडून अगदी निश्चयाने घेत असलेले प्रशिक्षण पाहून त्यांना आदितीची या खेळाप्रति असणारी निष्ठा समजली. प्रवीण सावंत यांची अकादमी उसाची लागवड केल्या जाणाऱ्या शेतात होती. अकादमीमध्ये आदिती आठवड्यातील पाच दिवस तीन तास तर शनिवार-रविवारी पाच तासांपेक्षा जास्त सराव करायची. तिच्या वडिलांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेती दीपिका कुमारी आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता अभिषेक वर्मा या तिरंदाजीतील भारताच्या यशस्वी खेळाडूंचे व्हिडिओ दाखवून तिला प्रोत्साहित केले.

हेही वाचा >> परीक्षा, गुण यापलीकडेही आहे जग! पालकांनी मुलांना ‘या’ गोष्टी शिकत स्वत:त करा ‘हे’ बदल

धनुष्यबाण मिळाला पण…

आदितीने आता तिरंदाजीमध्ये बरेच प्रावीण्य मिळवले होते. एक दिवस प्रशिक्षकांनी तिच्या प्रगतीची माहिती देत तिच्या वडिलांना पुढील यशासाठी तिला स्वतःचे धनुष्य विकत घ्यावे लागेल, असे सांगितले. एका चांगल्या व्यावसायिक धनुष्याची किंमत सुमारे अडीच लाख इतकी होती तर त्यासाठी लागणाऱ्या बाणांची किंमत ५० हजार. ते तिच्या वडिलांना परवडणारे नव्हते. त्यांनी प्रथमच त्यासाठी लोकांकडे कर्ज मागितले. ज्यावेळी आदितीला स्वतःचे धनुष्य मिळाले, त्याचवेळी करोनामुळे टाळेबंदी लागू झाली. त्यामुळे आदितीला प्रशिक्षण केंद्रात जाणे अवघड झाले. त्यावर उपाय शोधत तिने घराबाहेरच्या परिसरात सराव करायचे ठरवले.

ग्रामीण भागातून आलेल्या आदितीमध्ये शिकण्याची आवड आणि चिकाटी होती. तिने खेळ सुरू केल्यापासून एकही दिवस सराव चुकवला नाही. दिवाळीच्या दिवशीही ती सकाळपासून दुपारपर्यंत पुन्हा प्रशिक्षणाला जायची अशी आठवण तिच्या आई वडील आणि प्रशिक्षकांनी सांगितली

आदिती ही बारीक चणीची खेळाडू. तिच्या शरीरयष्टीवरून इतके भव्य यश तिने कमावले असेल, यावर सहसा कुणाचा विश्वास बसणार नाही. मात्र, आदितीने जिद्दीने करून दाखविले. सराव करताना अनेकदा तिची बोटे सुजत असत. हाताला जखमा होत असत. करोनाकाळात तर तब्बल दोन वर्षे ती सरावापासून दूर होती.

मात्र, या प्रतिकूलतेवर आदितीने जिद्दीने मात केल्याचे शिक्षक असलेले तिचे वडील गोपीचंद अन् ग्रामसेविका असलेली आई शैला यांनी नमूद केले. तिच्या यशात प्रशिक्षक प्रवीण सावंत, सहायक प्रशिक्षक शिरीष ननावरे, दृष्टी आर्चरी ॲकॅडमीचे अध्यक्ष सुजित शेडगे, धन्वंतरी वांगडे, सायली सावंत, जितेंद्र देवकर यांचे मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरल्याचे त्यांनी सांगितले. आदिती सध्या साताऱ्यातील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात बारावी इयत्तेत शिकते.

२०२३ मध्ये जागतिक युवा अजिंक्यपद स्पर्धेत तिने वैयक्तिक आणि सांघिक सुवर्ण पदक मिळवले. अनेक स्पर्धांमध्ये तिने प्राविण्य मिळाले आणि देशाचे नाव उज्वल केले. आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचा झेंडा दिमाखात फडकविणाऱ्या अदिती स्वामी व साताऱ्यातील शिवाजी कॉलेजचा विद्यार्थी ओजस देवतळे या तिरंदाजांना अर्जुन या देशातील प्रतिष्ठेच्या पुरस्कार क्रीडा पुरस्कारासाठी निवड झाल्याचे जाहीर होताच आदिती स्वामीच्या कुटुंबीयांवर साताऱ्यात कौतुकाचा वर्षाव झाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तिचे अभिनंदन व कौतुक करण्यासाठी साताऱ्यात रीग लागली होती. खासदार श्रीनिवास पाटील उदयनराजे भोसले शिवेंद्रसिंहराजे भोसले क्रीडा अधिकारी प्रशासकीय अधिकारी अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी तिचे अभिनंदन केले. आदिती हिने ज्युनिअर जगज्जेतेपद पटकावल्यानंतर आता तिला ऑलिंपिक स्पर्धेचे वेध लागले आहेत. भारताला या खेळामध्ये सुवर्णपदक मिळवून द्यायचा विडा तिने उचलला आहे. मात्र त्यासाठी तिला काही वर्ष थांबावच लागणार आहे. यावर्षी होणाऱ्या ऑलम्पिक स्पर्धेत ती खेळत असलेला तिरंदाजीतला कंपाउंड प्रकाराचा समावेश नाही. मात्र पुढील ऑलिंपिकमध्ये या खेळाचा समावेश आहे. तोपर्यंत अनेक जागतिक स्पर्धा व त्यासाठी सराव ती करणार आहे. तिच्या या सर्व यशाचा तिच्या आई-वडिलांना प्रचंड अभिमान आहे. या पुढील प्रत्येक स्पर्धेसाठी ते तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहेत.