महाराष्ट्रात महिला प्रवाशांना निम्म्या दरात प्रवास योजनेमुळे राज्य परिवहन महामंडळाच्या साध्या बसमध्ये महिलांचे प्रमाण भरपूर वाढलेले दिसते. विशेषतः नुकत्याच संपलेल्या सुट्ट्यांमध्ये ही बाब ठळकपणे जाणवली. आता हेच चित्र दक्षिणेच्या शेजारील कर्नाटकात दिसत आहे. तिथे ११ जूनपासून अंमलात आलेल्या ‘शक्ती’ योजनेमध्ये कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या साध्या बसमध्ये महिला प्रवाशांना निःशुल्क प्रवास करता येतो. त्यामुळे बसमध्ये महिला प्रवाशांचे प्रमाण वाढले आहे, हे वाक्यही अपुरे पडेल. आकडेवारीच सांगायची तर पहिल्या तीन दिवसांमध्ये एक कोटीपेक्षा जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घेतला.
एकेक रुपया मोजत जीवन जगणाऱ्या काही महिलांनी तर आयुष्यात पहिल्यांदाच बसचा प्रवास केला. उत्तर कर्नाटकमधील यादगीर जिल्ह्यामधील एका दुर्गम खेड्यात राहणाऱ्या हणमाक्का यांना दक्षिण कन्नड जिल्ह्यातील ८०० वर्षे जुन्या धर्मस्थळ मंदिराला एकदा तरी भेट देण्याची अतोनात इच्छा होती. पण पैशांची सतत चणचण असल्यामुळे आपले हे स्वप्न कधी पूर्ण होईल असे त्यांना वाटले नव्हते. अखेर ‘शक्ती’ योजनेमुळे वयाच्या ६५ व्या वर्षी त्यांची ही दीर्घकाळ जपलेली इच्छा पूर्ण झाली.
हेही वाचा – स्त्रियांची भाषा म्हणजे काय ? ‘स्त्री’चे भाषिक योगदान
कर्नाटकात गेल्या आठवड्याभरात महिलांनी अक्षरशः राज्य उभे-आडवे पिंजून काढले असे म्हणावे लागेल. नेत्रावती नदीच्या किनाऱ्यावरील ‘धर्मस्थळ’ हे कर्नाटकातील सर्वात पवित्र तीर्थस्थळांपैकी एक आहे. महिलांना बसप्रवास निःशुल्क झाल्यापासून या ठिकाणी गर्दी खूप वाढली आहे. रविवारी आलेल्या अमावस्येच्या दिवशी शेकडो महिलांनी नेत्रावती नदीमध्ये स्नान केले आणि शंकराचा अवतार असलेल्या मंजुनाथाचे दर्शन घेतले.
धर्मस्थळाबरोबरच बेळगावच्या सौंदत्ती यल्लम्मा मंदिर, मैसुरूमधील चामुंडी टेकडी आणि नंजनगुड, श्रीरंगपटणम, चिक्कबल्लपुरामधील नंदी टेकड्या, बागलकोटमधील कुदालसंगम, उडुपीमधील कृष्ण मंदिर या धार्मिक स्थळांनाही महिलांची मोठी पसंती आहे. त्याशिवाय विजापूरचा गोल घुमट, बिदरमधील बसवकल्याण, बेळगावमधील कित्तुर, हम्पी, कोप्पलची अंजरनाद्री टेकडी, चामराजनगरमधील माले महाडेश्वर मंदिर आणि चित्रदुर्ग किल्ला येथेही महिला पर्यटन करत आहेत.
हेही वाचा – गच्चीवरची बाग : भाज्या कधी येतात?
विशेष म्हणजे, पुरुषांना बसमध्ये ५० टक्के आरक्षण दिले आहे, मात्र त्यांच्या जागाही महिलाच पटकावत असल्याचे सध्या तरी दिसत आहे. गर्दीतून वाट काढत बसमध्ये शिरणाऱ्या आणि मुलांना खिडक्यांमधून बसमध्ये चढवणाऱ्या स्त्रिया हे गेल्या काही दिवसांपासून सामान्य चित्र झाले आहे. अमावस्येच्या दिवशी माले महाडेश्वराच्या दर्शनाला आलेल्या महिलांच्या गर्दीमुळे बसचा दरवाजा तुटून पडल्याचीही घटना घडली. पण त्याचा महिलांच्या उत्साहावर काहीही परिणाम झाला नाही.
महाराष्ट्रातही अर्ध्या दरात प्रवास करण्याच्या सवलतीमुळे अनेक महिला प्रवासासाठी बाहेर पडल्याचे दिसते. हे प्रवास नेहमीच फार मोठे नसतात, अनेकदा थोड्या अंतरावरचेच असतात. कधी नातेवाईकांची भेट, कधी एरवी गाडीभाडे खर्च करून जाणे परवडले नसते अशा छोट्या मोठ्या घरगुती कार्यक्रमांना आवर्जून हजेरी, अनेक दिवस ‘जाऊ, जाऊ’ म्हणत राहून गेलेली धार्मिक यात्रा, एक ना दोन. महिलांकडे प्रवास करण्यासाठी अनेक निमित्त असतात आणि प्रवास टाळावा लागण्याचीही तितकीच कारणेही असतात. आता त्यातील निदान एक कारण कमी झाले आहे असे नक्की म्हणता येईल.