कर्जमाफी आता फॅशन झाली आहे, असे वादग्रस्त विधान केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी केले आहे. ‘परिस्थिती अतिशय बिकट असेल, तरच कर्जमाफी द्यायला हवी. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कर्जमाफी हा काही अंतिम उपाय नाही. कर्जमाफी म्हणजे आजकाल फॅशन झाली आहे,’ असे व्यंकय्या नायडू यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना म्हटले.

राज्यासह देशभरात सध्या शेतकऱ्यांकडून कर्जमाफीची मागणी करण्यात येते आहे. कर्जमाफी आणि शेतमालाला हमीभाव या शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत बोलताना ‘कर्जमाफी आता फॅशन झाली आहे,’ असे धक्कादायक विधान व्यंकय्या नायडू यांनी केले आहे. राज्यात शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी एल्गार केला होता. शेतकरी १ जूनपासून संपावर गेल्याने कर्जमाफीचा मुद्दा ऐरणीवर आला. यानंतर राज्य सरकारने अल्प भूधारक शेतकऱ्यांचे १ लाखांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला.

राज्यासह मध्य प्रदेश, कर्नाटक, पंजाब, उत्तर प्रदेशमध्येदेखील शेतकऱ्यांनी कर्जमाफीची मागणी केली होती. यातील कर्नाटक, पंजाब आणि उत्तर प्रदेशमधील राज्य सरकारांनी कर्जमाफीचा निर्णय घेतला. उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीआधी भाजपने कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. त्यामुळे भाजपला उत्तर प्रदेशात सत्ता हस्तगत करण्यात यश आले. सत्ता हाती येताच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शेतकऱ्यांचे १ लाखांपर्यंतचे कर्ज माफी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर भाजपशासित राज्यांसोबतच इतर राज्यांमधील शेतकऱ्यांनीही कर्जमाफीची मागणी केली. यानंतर महाराष्ट्रासह कर्नाटक, पंजाब या राज्यांनी कर्जमाफीचा निर्णय घेतला.