तेलीपुरा परिसरातील घटना आई या शब्दांत प्रेम, करुणा, माया या शब्दांचा अंतर्भाव आहे. आई ही आपल्या मुलांसाठी प्रसंगी संपूर्ण जगाशी दोन हात करून लढायला तयार होते. परंतु तेलीपुरा येथील एका महिलेने आई शब्दालाच कलंक पुसला आहे. तिने स्वत:च्या नऊ वर्षीय मुलाची गळा दाबून हत्या करून गांधीसागर तलावात आत्महत्या केली. मुलाच्या शवविच्छेदन अहवालातून हा प्रकार उघडकीस आला. मुलाची हत्या केल्यावर महिलेला पश्चाताप झाल्याने तिने स्वतचे आयुष्य संपवल्याची परिसरातील नागरिकांमध्ये चर्चा आहे. भेरूबाई उर्फ आशा रतनसिंग सोमवंशी (वय ३३, रा. जुनी शुक्रवारी, तेलीपुरा, नागपूर) असे मृत महिलेचे नाव आहे. तर कार्तिक रतनसिंग सोमवंशी (९) असे हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे. भेरूबाईचे पती हे गणेश दुग्ध मंदिरात काम करतात. हे कुटुंब दोन दिवसांपूर्वीच नवीन घरात राहण्याकरिता आले होते. भेरूबाईचे माहेर हे गोंदिया येथील असून नवरा लाखनी येथील रहिवासी आहे. कामानिमित्त दोघेही गेल्या अनेक वर्षांपासून नागपूरला राहत असून त्यांना एक अडीच वर्षांचा व एक नऊ वर्षांचा मुलगा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ नोव्हेंबरला ती लहान मुलासह एक रांगोळी स्पर्धा बघण्याकरिता गेली होती. परतल्यावर तिने काही कारणावरून नऊ वर्षीय मुलाला मारहाण केली. याप्रसंगी मुलाचा गळा आवळल्याने चिमुकल्याचा मृत्यू झाला. या प्रकाराला घाबरून ती आपल्या दुसऱ्या अडीच वर्षीय मुलाला सोडून पळून गेली. मुलाची हत्या केल्याचा पश्चाताप झाल्याने तिने गांधीसागर तलावात उडी घेऊन आयुष्य संपवल्याची परिसरात चर्चा आहे. दरम्यान, कार्तिकला एकटा घरी बेशुद्धावस्थेत बघून परिसरातील नागरिकांनी तातडीने त्याला उपचाराकरिता मेयोला हलवले. परंतु त्याचा आधीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यावर त्याचा गळा दाबून खून झाल्याचे निदर्शनास आले.