पुणे : शहरातील पावसाळापूर्व कामे योग्य पद्धतीने पूर्ण झाल्याचा महापालिका प्रशासनाचा दावा शुक्रवारी सायंकाळी अवघ्या दीड तासाच्या पावसाने फोल ठरवला. पुणे शहराने पाणी तुंबण्याचा अनुभव पुन्हा एकदा घेतला. शहरातील कोथरूड, पौड रस्त्यासह पूर्व भाग असलेल्या येरवडा, विमाननगर, पुणे स्टेशन परिसरात झालेल्या पावसामुळे अनेक भागांतील रस्त्यांवर तसेच फूटपाथवर पाणी साचल्याने वाहतुकीचा फज्जा उडाला.
पाऊस थांबल्यानंतर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कामाला सुरुवात केली. मात्र, पावसाळापूर्वीच्या कामात शहरातील पावसाळी गटारे, ड्रेनेज लाइन स्वच्छ केल्यानंतरही पावसाचे पाणी वाहून न गेल्याने या कामाचा दर्जा समोर आला. पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी साचू नये, यासाठी महापालिका प्रशासनाने गेल्या दोन महिन्यांपासूनच पावसाळापूर्व कामांना सुरुवात केली आहे. शहरातील पावसाळी गटारे, तसेच ड्रेनज लाइनमधील गाळ काढून ते स्वच्छ करणे, नाले, ओढे यामधील गाळ काढणे ही कामे महापालिकेने सुरू केली आहेत. यासाठी लाखो रुपयांच्या निविदा काढण्यात आल्या असून, त्यामधून कामे पूर्ण झाल्याचा दावा महापालिकेकडून केला जात आहे.
शुक्रवारी सायंकाळी शहरात एक ते दीड तास जोरदार पाऊस झाला. पावसाचे पाणी अनेक रस्त्यांवर साचले होते. जंगली महाराज रस्त्याशेजारी असलेल्या गल्लीबोळात पावसाळी गटारे, ड्रेनेज लाईन तुंबल्याने वाट काढताना वाहनचालक आणि नागरिकांची तारांबळ उडाली. तसेच, काही दुकांनांमध्ये पाणी शिरले होते. टिळक चौकात, सोमवार पेठेतील नरपतगिरी चौक, पुणे स्टेशन परिसर, कोथरूड तसेच पौड रस्त्यावरील अनेक रस्त्यांवर पाणी साचले होते. काही ठिकाणी गाड्याही बंद पडल्या.
शहरात अवघ्या दीड तासात ४० मिलिमीटर पाऊस पडल्याने काही भागात पाणी साचल्याचे प्रकार घडल्याचे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी सांगितले. महापालिकेकडे रस्त्यावर पाणी तुंबल्याच्या तक्रारी आल्यानंतर महापालिकेचे कर्मचारी घटनास्थळी गेल्याचे दिवटे यांनी सांगितले. भवानी पेठ, कोथरूड, पौड रस्ता, टिळक रस्ता यासह नरपतगिरी चौक आणि इतर भागांतील पाणी वाहून जाण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.
पालखी मार्गांवरील ९० टक्के कामे पूर्ण
शहरात पुढील आठवड्यात पालखी सोहळा मुक्कामी येणार आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी शुक्रवारी पालखी दाखल होणाऱ्या मार्गाची पाहणी केली. शहरातील ६० ठिकाणी आवश्यक ती कामे पूर्ण करावीत, असे पत्र पोलिस आयुक्तांनी महापालिकेला पाठविले होते. त्या ठिकाणांची ९० टक्के कामे पूर्ण झाल्याचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी सांगितले.