चार महिन्यांत प्रथमच विश्वास वाढला
केंद्रातील मोदी सरकारला सव्वा वर्ष झाल्यानंतरही उद्योग वर्तुळातून फारसे उत्साहवर्धक बोलले जात नसतानाच देशातील ग्राहकवर्गाचा विश्वास मात्र उंचावल्याचे दिसून येत आहे. याबाबत करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणानुसार ऑगस्टमधील ग्राहक कल गेल्या चार महिन्यात प्रथमच उंचावण्यात आला आहे. हे चित्र सरकारच्या धोरणांमध्ये होत असलेल्या प्रगतीवर आधारित आहे.
सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या ‘एमएनआय इंडिया कन्झ्युमर सेंटीमेंट’ निर्देशांकानुसार, ऑगस्टमधील ग्राहक कल निर्देशांक हा उंचावत ११९.१ झाला आहे. आधीच्या महिन्यात तो ११८.६ होता. गेल्या चार महिन्यात यंदा प्रथमच तो उंचावला आहे. चालू आर्थिक वर्षांच्या सुरुवातीला, एप्रिलमध्ये असलेल्या १२२.१ पासून तो सातत्याने घसरतच होता. तर वर्षभरापूर्वी ऑगस्ट २०१४ मध्ये तो १२५.२ होता. त्याहीवेळी तो सलग डिसेंबपर्यंत घसरला होता. या दरम्यान फेब्रुवारी व एप्रिलमध्ये तो उंचावता राहिला.
२०१४ मधील घसरत्या ग्राहक कलनंतर रिझव्‍‌र्ह बँकेच्या व्याजदर कपातीच्या आशेवरच यंदा कल वधारल्याचे या निर्देशांकाचे मुख्य अर्थतज्ज्ञ फिलिप उग्लो यांनी म्हटले आहे. कर्मचारी आणि व्यवसायावर आधारित हा विश्वास आणखी वाढेल, असेही ते म्हणाले. वर्षभराच्या तुलनेत सध्याचा कल हा समकक्षच आहे, असे नमूद करून ऑगस्टप्रमाणे तो येत्या काही कालावधीत आणखी वाढेल, असेही फिलिप यांनी म्हटले आहे.
निर्देशांकात नमूद करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार ग्राहकांनी सरकारच्या आर्थिक सुधारणांमध्ये होत असलेल्या प्रगतीवर एक प्रकारे विश्वासच व्यक्त केल्याचे याबाबतच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. यामुळे एकूण व्यवसायपूरक वातावरणातही बदल घडून येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
येत्या वर्षभरात रोजगारविषयक आशावादही ग्राहकांनी याबाबतच्या निर्देशांकांत व्यक्त केला आहे. रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरणाबाबत, कमी होत असलेली महागाई आणखी व्याजदर कपात घेऊन येईल, असा विश्वास ग्राहकांनी व्यक्त केला आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने चालू वर्षांत तीन टप्प्यांमध्ये ०.७५ टक्के दर कपात केल्याचा उल्लेख याबाबतच्या अहवालात करण्यात आला आहे.