बडय़ा पायाभूत विकासाच्या प्रकल्पांसाठी आपली केवळ विदेशी संस्था व गुंतवणूकदारावरच मदार का असावी, तर जनसामान्य आणि व्यावसायिकांना व्याज परताव्याची हमी पाहून अशा गुंतवणुकीला प्राधान्य देता येईल, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

सेवानिवृत्त नोकरदार, शिक्षक, पोलीस शिपाई असे सर्व जनसामान्य देशाच्या विकासात महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांसाठी आपल्या गुंतवणुकीने थेट योगदान देऊ शकतील. त्यांनी गुंतविलेला हा पैसा चांगल्या व्याज लाभासह परत केला जाईल, असा विश्वास गडकरी यांनी नागरी सहकारी बँकांतील अग्रणी सारस्वत बँकेच्या शतकमहोत्सवी वर्ष सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला. असे झाले तर विदेशी गुंतवणुकीची आपल्याला गरजच पडणार नाही, अशी त्यांनी पुस्ती जोडली.

सहकार क्षेत्रातील बँकांचे मूळ स्वरूप जपले गेले पाहिजे. खासगी बँकांच्या दावणीला बांधून त्यांचे त्यामध्ये विलीनीकरण केले जाऊ नये, असे आपले रिझव्‍‌र्ह बँकेला आर्जव असल्याचे गडकरी यांनी सांगितले. या प्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही व्यासपीठावर हजर होते. रिझव्‍‌र्ह बँकेचे कार्यकारी संचालक सुदर्शन सेन, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे हेही व्यासपीठावर होते.