|| मंगल हनवते
शेतकऱ्यांना आता बारा महिने पाणी
औरंगाबाद : मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गालगत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) तब्बल १००० शेततळी बांधली आहेत. या तळय़ांच्या खोदकामातून निघालेला मुरूम रस्त्याच्या बांधकामासाठी वापरण्यात आला. तर पुढे शेततळय़ातील पाणीही बांधकामासाठी वापरण्यात येत आहे. आता काम पूर्ण झालेल्या पट्टय़ातील तळी शेतकऱ्यांना कायमस्वरूपी हस्तांतरित करण्यात आली आहेत. त्यामुळे शेतीसाठी बारामाही पाणी उपलब्ध झाले असून मोफत तळी बांधून मिळालेल्या शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
२०२३ मध्ये ७०१ किमीचा संपूर्ण महामार्ग वाहतूक सेवेत दाखल झाल्यास मुंबई ते नागपूर प्रवास आठ तासांत करता येणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प वाहनचालक, प्रवाशांना दिलासा देणारा आहे. दुसरीकडे हा मार्ग शेकडो शेतकऱ्यांसाठीही फायद्याचा ठरला आहे. तसेच अनेक गावांतील शेतकऱ्यांना बारमाही पाणी उपलब्ध झाले आहे. समृद्धी मार्गाच्या कामासाठी मोठय़ा प्रमाणावर लागणारे पाणी उपलब्ध करण्यासाठी शेततळय़ांची संकल्पना साकारण्यात आली होती.
राज्य सरकारच्या मागेल त्याला शेततळेह्ण योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या समृद्धी मार्गालगतच्या शेतकऱ्यांना मोफत शेततळी बांधून देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अर्ज न करणाऱ्या शेतकऱ्यांना शेततळे बांधून हवे असल्यास त्यांना ते उपलब्ध करण्याचा निर्णयही घेण्यात आला होता.
त्यानुसार समृद्धी महामार्गालगत छोटी..मोठी एक हजार शेततळी बांधण्यात आल्याची माहिती एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी दिली. शेतकऱ्यांच्या जागेत शेततळय़ासाठी खोदकाम करताना निघालेला मुरूम रस्त्याच्या कामासाठी वापरण्यात आला. पुढे शेततळय़ातील पाणी शेतकरी आणि समृद्धी महामार्गाच्या कामासाठी वापरण्यात येत आहे. महामार्गाची कामे पूर्ण झालेल्या टप्प्यातील शेततळी शेतकऱ्यांना हस्तांतरित करण्यात आल्याचेही गायकवाड यांनी सांगितले. शेतकऱ्यांना ही शेततळी मोफत बांधून दिली आहेत. याआधी अनेक शेतकऱ्यांना पुरेसे पाणी उपलब्ध होत नसल्याने शेतीत अनेक अडचणी येत होत्या. पण आता त्यांना कायमस्वरूपी बारमाही पाणी उपलब्ध झाले असून शेतकऱ्यांना याचा चांगला फायदा होत आहे.
माझ्या शेतात विहीर आहे, मात्र त्यात बारा महिने पाणी नसल्याने शेतीसाठी पाणी कमी पडत होते. पण आता मात्र आमची ही अडचण दूर झाली आहे. आम्हाला मोफत शेततळे बांधून देण्यात आले असून आता २०१९ पासून मुबलक पाणी मिळत आहे. शेतीचे उत्पन्न आता वाढले आहे. – कमललाल चंपालाल सुंदर्डे, शेतकरी, टाकळीवाडी, गंगापूर, औरंगाबाद</strong>
तळे बांधण्यासाठी अडीच ते तीन लाख रुपये खर्च आला असता. पण आम्हाला या प्रकल्पात मोफत शेततळे बांधून दिले आहे. आता लाखो लिटर पाणी बारा महिने शेतीला मिळत आहे. – प्रकाश नरोडे, शेतकरी, गंगापूर, औरंगाबाद