छत्रपती संभाजीनगर : बीड जिल्ह्यातील नायगाव येथील मयूर अभयारण्यातील ७५० हेक्टरवरील ‘ग्लिरिसीडिया’ काढण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. हे झाड अगदी मुळापासून काढावे लागत असल्याने प्रतिएकर दोन ते अडीच लाख रुपये लागतील, असा अंदाज आहे. या मयूर अभयारण्यात सात हजारांहून अधिक मोर असावेत, असा अंदाज आहे. या भागात फळांची झाडे लावण्याचे प्रस्तावित असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

डोंगर केवळ हिरवे दिसण्यासाठी सामाजिक वनीकरण विभागाने लावलेल्या या झाडाचा पक्षी आणि प्राण्यांना उपयोग नसल्याने ही कारवाई प्रस्तावित आहे. गिरिपुष्प किंवा उंदीरमारी अशा नावाने ओळखले जाणारे हे झाड हिरवे दिसते. ते एवढे कडसर असते, की त्यावर पक्षी बसतही नाहीत. जनावरे सावलीसाठीही थांबत नाहीत. त्यामुळे नायगावच्या डोंगर उतारावरील ही झाडे तोडण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. हे झाड पुन्हा येऊ नये म्हणून ते अगदी मुळापासून उखडून टाकावे लागणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उताराच्या भागावर असणारी ही झाडे काढल्यानंतर त्या जागी फळांची आणि सावली देणारी झाडे लावावी लागणार असल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले. आमदार सुरेश धस हेही या कामासाठी पाठपुरावा करत असल्याचे सांगण्यात आले.