छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात मंगळवारी पावसाचा जोर कायम होता. लातूर, जालना, बीड, नांदेड जिल्ह्यांत कमी वेळात मोठा पाऊस झाल्याने गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागेल एवढा पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात मनाठा परिसरामध्ये एका नाल्यात तिघी जणी वाहून गेल्या. एका महिलेचा मृतदेह सापडला असून दोघींचा शोध सुरू आहे.
लातूर शहरात आज १७ व्या दिवशीही मोठा पाऊस झाला. पावसाचा जोर एवढा होता की पाऊस थांबल्यानंतर दोन तासांनीही शहरातील अनेक भागांतून पाण्याचा निचरा होऊ शकला नाही. शहरातील अनेक घरांत पाणी गेल्याचे वृत्त आहे. दुचाकी गाड्या वाहून जाण्याचे प्रकारही शहरातील तेलगल्ली भागात झाला.नांदेड जिल्ह्यात अवकाळी पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. मंगळवारी सकाळी हदगाव तालुक्यात सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू झाला.
हदगाव तालुक्यातील वरवट येथून अरुणाबाई बळवंत शक्करगे (वय ३७), दुर्गा बळवंत शक्करगे (वय १०) व समृद्धी विजय शक्करगे (वय ८) या तिघी गावाजवळील रस्त्यालगत असलेल्या नदीच्या पुलावरून घरी परतत होत्या. शेतामध्ये रोजंदारीची हळद लावण्यासाठी त्या गेल्या होत्या. पुलावरून पाणी वाहत असल्याचा अंदाज न आल्याने व पाण्याचा ओघ जास्त असल्यामुळे दुर्गा शक्करगे, समृद्धी शक्करगे या दोघी पुरामध्ये वाहून जात होत्या. अरुणाबाई शक्करगे हिने वाचविण्याचा प्रयत्न केला आणि त्या दोन मुलींसोबत तीही वाहून गेली. काही वेळानंतर दुर्गा शक्करगे हिचा मृतदेह सापडला पण अरुणाबाई शक्करगे व समृद्धीचा शोध सुरू होता.
बीड शहरासह जिल्ह्यात पडलेल्या पावसामुळे जालना रोडवर एका बाजूने दुसरीकडे जाता येणार नाही, एवढे पाणी साचले. या पावसामुळे वाहतूक पूर्णत: विस्कळीत झाली. अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले. शहरातील सखल भागात पाणी साचलेले असल्याचे सांगण्यात आले. जालना जिल्ह्यातही दिवसभर पावसाळी वातावरण होते. मात्र, पावसाचा जोर फार नव्हता. छत्रपती संभाजीनगरमध्येही दुपारनंतर आभाळ भरून आले होते. लातूर, बीडमध्ये वीज पडून जनावरे दगावल्याचे वृत्त आहे.