छत्रपती संभाजीनगर : जायकवाडी धरणाच्या क्षेत्रात शनिवारी रात्रभर पाऊस झाल्याने पूरस्थिती आणखी गंभीर झाली असून झाली आहे. धरणातून सध्या १ लाख ५० हजार प्रतिसेंकद घनफूट वेगाने पाणी सोडले असून काही तासात हा विसर्ग दोन लाखापर्यंत जाऊ शकतो असे जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे पैठण शहरात पाणी घुसू शकते, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. दरम्यान जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हेही पैठण येथे काही वेळात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील दोन गावात पाणी घुसले. नारायणपूर आणि गोपाळवाडी येथील नागरिकांना बाहेर काढण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. तर वैजापूर शहरातील २० कुटुंबाना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. जायवाडी धरणातून नियमित व आपतकालीन दरवाज्यातून एक लाख २५ हजार विसर्ग करण्यात आला आहे. पुढे पाण्याची आवक अशीच राहिली तर दुपारपर्यंत पैठण शहरातही पाणी येऊ शकते, असा इशारा देण्यात आला आहे. माजलगाव धरणातूनही पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आल्याने बीड जिल्ह्यातील अनेक गावातील पूरस्थितीत वाढ झाली आहे. पाणी शेतशिवारामध्ये पसरते आहे. छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी म्हणाले, वैजापूरमधील दोन गावातील स्थिती लक्षात घेऊन काही कुटुंबाना सुरक्षित स्थळी आणले आहे. प्रशाासन सतर्क आहे. काेणीही घाबरू नये, आवश्यकता वाटली की प्रशासनाशी संपर्क साधवा.’
पंरडा तालुक्यातील सिना कोळेगाव प्रकल्पातून पुन्हा पाणी सोडण्यात आले. अहिल्यानगर, कडा, आष्टी, जामखेड या भागात झालेल्या पावसामुळे ५९४०० प्रतिसेकंद घनफूट वेगाने विसर्ग सुरू आहे. त्यामुळे परंडा व भूम तालुक्यातील पूरस्थिती कायम आहे. रविवारी रात्री झालेल्या पावसामुळे नांदेडच्या विष्णुपुरी धरणातून सकाळी दहा वाजता १६ दरवाज्यातून दोन लाख ९७ हजार ७६८ प्रतिसेकंद घनफूट वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यातील पूरस्थितीची भीषणता वाढत आहे.
१९८ मंडलात अतिवृष्टी
मराठवाड्यात गेल्या २४ तासात १९८ मंडलात अतिवृष्टी नोंदविण्यात आली आहे. सकाळी सहा वाजता पावसाचा जोर अधिक होता. विविध भागात झालेल्या पावसामुळे जायकवाडी धरणात दोन लाख ३० हजार क्युसेक वेगाने पाणी येऊ शकते असा अंदाज असल्याने पूरपरिस्थिती अजून गंभीर होईल असे सांगण्यात येत आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनीही पूरस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक त्या भागातून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे आदेश दिले आहेत.