छत्रपती संभाजीनगर – बाहेर धो धो पाऊस सुरू असला तरी राज्य परिवहन महामंडळाच्या बसही तुम्हाला भिजण्यापासून रोखू शकत नाहीत, मध्येही काही प्रवाशांना छत्री घेऊन प्रवास करावा लागण्याची वेळ आली. पाटोदा-बीड-परभणी (एमएच-१४ – बीटी-२६१५) या बसमध्ये अनेक ठिकाणी पावसाच्या धारा, थेंब टपकत सुरू असल्याचे शनिवारी सकाळी पाहायला मिळाले.
काही प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार ही बस पाटोदा आगराची असून, नियमितपणे बीड-माजलगाव मार्गे परभणीला जाते व याच मार्गे परतीचा प्रवास करते. शनिवारी सकाळी १० च्या सुमारास पाटोद्यातून निघालेली ही बस सकाळी ११ च्या सुमारास बीडमध्ये पोहोचली. तेथून पुढे प्रवासी निघाली असताना बसमध्ये गळतीने अनेक आसने ओली झालेली होती. काही प्रवासी छत्री घेऊन बसलेले दिसून आले.
राज्यात जवळपास सर्वत्रच दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढलेला आहे. त्यात प्रवाशांना बसमध्येही भिजावे लागेल, अशा गळती लागलेल्या बस विविध मार्गावर धावत असल्याने प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
या संदर्भात पाटोदा येथील परिवहन महामंडळाचे अधिकारी श्रीनिवास खेडकर यांच्याशी अनेकवेळा संपर्क साधला असता त्यांचा मोबाईल फोन बंद येत होता. तर बीडच्या विभाग नियंत्रक अनुजा दुसाने यांनी सांगितले की, गळती लागलेली बस कुठल्या आगाराची आहे, त्याची माहिती घेतली जाईल. गळतीच्या संदर्भाने आवश्यक त्या सूचना देण्यात येतील.