महाराष्ट्र दिनानिमित्त आज ( १ मे ) छत्रपती संभाजीनगर येथे पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. त्यानंतर संदीपान भुमरे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. पण, ‘पालकमंत्री घटनाबाह्य आहेत. त्यांचं भाषण कोण ऐकतं?’ अशी टीका शिवसेना ( ठाकरे गट ) नेते, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी भुमरे यांच्यावर केली आहे.

नेमकं काय म्हणाले चंद्रकांत खैरे?

प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीने संदीपान भुमरे यांचं भाषण ऐकलं का? असा प्रश्न चंद्रकांत खैरेंना विचारला. त्यावर खैरेंनी म्हटलं, “पालकमंत्री घटनाबाह्य आहेत. त्याचं भाषण कोण ऐकतं? मागीलवेळी सुद्धा ऐकलं नाही. किती दिवस ते पालकमंत्री आहेत,” असा खोचक सवाल खैरेंनी उपस्थित केला. याला आता संदीपान भुमरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.

हेही वाचा : “…तर विजय वडेट्टीवारांनी चंद्रपूर लोकसभा लढवावी”, खासदार बाळू धानोरकरांचं आव्हान

“चंद्रकांत खैरेंना युतीचं सरकार आल्याचं पाहावलं जात नाही. कोणत्याही पालमंत्र्यांचा संदेश ऐकायला हवा. पण, युतीचा पालकमंत्री झालेला खैरेंना पचेना झालंय,” असं संदीपान भुमरेंनी म्हटलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

“संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीच्या ताब्यात एक बाजार समिती गेल्याची दाखवा. मग कसली ‘वज्रमूठ’? ७ पैकी ६ समितीचे निकाल हाती आली आहे. याठिकाणी युतीचे उमेदवार निवडून आले आहेत. ही ‘वज्रमूठ’ विधानसभेपर्यंत टिकणार नाही,” असेही संदीपान भुमरेंनी सांगितलं.

हेही वाचा : राजकीय भूकंपाची तारीख जवळ आली? अजित पवारांच्या बंडखोरीबाबत शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अजित पवार कुठं आहेत? त्यांना ‘वज्रमूठ’ सभेत खुर्ची देणार नाही, अशी चर्चा सुरू असल्याचा प्रश्न संदीपान भुमरेंना विचारला. त्यावर भुमरे म्हणाले, “याबद्दल अजित पवारांनाच विचारलं पाहिजे, तुम्ही कुठंय? तुम्हाला महत्व आहे की नाही? धुसफूस खूप दिवस झाली चालू आहे. कधीतरी हा स्फोट होणार आहे. अजित पवार आमच्याकडं आले, तर स्वागतच आहे,” असेही भुमरेंनी म्हटलं.