देशातील सुमारे ७१ टक्के शेअर दलालांनी तंत्रज्ञानावर आधारित नव्या प्रारूप आणि कार्यपद्धतीकडे वळण्याचा आणि त्यावर वाढीव गुंतवणुकीसह, माहिती-तंत्रज्ञान मनुष्यबळही वाढवण्याचा ते विचार करत आहेत, असे दलालांच्या संघटनेने तिच्या ९०० सदस्यांमध्ये केलेल्या सर्वेक्षणातून पुढे आले आहे.

असोसिएशन ऑफ नॅशनल एक्स्चेंज मेंबर्स ऑफ इंडिया अर्थात ‘ॲन्मी’ने या संघटनेने शेअर दलाली उद्योगातील वित्तीय-तंत्रज्ञानाची भूमिका आणि योगदान निश्चित करण्यासाठी गेल्या महिन्यात हे सर्वेक्षण केले. सर्वेक्षणानुसार, २०२२-२३ या वर्षात तंत्रज्ञानामध्ये सरासरी ३० टक्के अतिरिक्त गुंतवणूक अपेक्षित आहे. कारण तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ग्राहक आणि इतर व्यवसाय दोघांसाठी उत्पादने आणि सेवांची विस्तृत श्रेणी प्रदान करता येण्याबाबत या उद्योग क्षेत्रात विश्वास दिसून येत असल्याचे सर्वेक्षणाचे निरीक्षण आहे.

हेही वाचा – ॲमेझॉनकडून नोकरकपातीला सुरुवात; अमेरिका, कॅनडा आणि कोस्टारिकामधील कर्मचाऱ्यांना नारळ

सायबर हल्ल्यांचे वाढते प्रमाण पाहता त्यापासून संरक्षणाकडे दलालांमध्ये वाढता कलही दिसून आला आहे. अत्याधुनिक दलाली पेढ्या व वित्तीय संस्थांना अशा धोक्यांपासून स्वतःचे आणि ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी तंत्रज्ञानामध्ये अधिक गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले जात आहे, असाही सर्वेक्षणाचा निष्कर्ष आहे.

शुक्रवारी जाहीर झालेल्या या ‘स्टॉकटेक सर्वेक्षणात’ असेही दिसून आले की, सुमारे ६१ टक्के दलाली पेढ्यांना गेल्या वर्षी माहिती-तंत्रज्ञानाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागला नाही, तर या क्षेत्रात कार्यरत केवळ ३९ टक्के कंपन्यांना तंत्रज्ञानाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागला. शिवाय, ट्रेडिंग अर्थात व्यवहार सुलभ करणाऱ्या पायाभूत सुविधांचे कमी किमतीतील तांत्रिक अद्ययावतीकर हे या व्यवसायाच्या वाढीला चालना देणारा प्रमुख घटक राहिला आहे. प्रत्येक जण तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करत आहे आणि आघाडीच्या दलाली पेढ्या नवीनतम तंत्रज्ञानासह त्यांच्या बॅक-एंड आणि फ्रंट-एंड दोन्हीमध्ये या आघाडीवर पुढचे पाऊल टाकताना दिसल्या आहेत, असे सर्वेक्षणाने नमूद केले आहे.

हेही वाचा – परकीय गंगाजळी पाच महिन्यांतील उच्चांकासह ५७२ अब्ज डॉलरवर

आगामी वाढीचा मुख्य चालक तंत्रज्ञानच आहे आणि त्यायोगेच गुंतवणूकदार ग्राहकांना सेवा पुरविल्या जात आहेत. हे करोना साथीच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात दिसून आले आहे. हे तंत्रज्ञान आणि डिजिटायझेशनमुळे गुंतवणूकदारांना करोनाकाळात घर किंवा कार्यालयातून अखंडपणे सेवा देण्यात मदत झाली, असे ‘ॲन्मी’चे अध्यक्ष कमलेश शहा म्हणाले.

सर्वेक्षणानुसार, शेअर दलालांच्या ३३ टक्के व्यवसाय प्रक्रिया भौतिक पद्धतीकडून डिजिटल धाटणीकडे वळल्या आहेत आणि डिजिटल प्रक्रियेकडे वळल्याने कार्यक्षमता आणि गती वाढण्यासह, सुलभता आणि खर्चदेखील कमी करता आलेला आहे. केवळ तंत्रज्ञानामुळे महासाथीसारख्या अनिश्चित काळातही या उद्योगाची भरभराट होऊ शकल्याचे या क्षेत्राने पाहिले आहे.

हेही वाचा – Gold-Silver Price on 21 January 2022: सोन्याचा दर वधारला, तर चांदीच्या किंमतीत किंचित वाढ, जाणून घ्या आजचे दर

सर्वेक्षणात सहभागी ९२ टक्क्यांहून अधिक प्रतिसादकर्त्यांना आशावाद व्यक्त करताना, नवीन सायबर सुरक्षा नियम हे त्यांच्या व्यवसायांना सायबर हल्ल्यांविरुद्ध अधिक मजबूत संरक्षण प्रदान करतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(पीटीआय, नवी दिल्ली)