Byju Salary Crisis : डिजिटल शिक्षण क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या बायजूसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. काही महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी कंपनीला बरीच ओढाताण करावी लागत आहे. बायजूची मूळ कंपनी असलेल्या थिंक अँड लर्न प्रा. लि.ने नुकतेच जानेवारी महिन्याचे वेतन कर्मचाऱ्यांना दिले आहे. यानंतर कंपनीचे संस्थापक बायजू रवींद्रन यांनी कर्मचाऱ्यांना एक भावनिक पत्र लिहून कंपनीच्या सद्यस्थितीबाबत भाष्य केले.

बायजू आपल्या ईमेलमध्ये लिहितात, “या कठीण काळात तुम्ही कंपनीला जी साथ दिली, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. आर्थिक संकटाचा सामना करत असताना कर्मचाऱ्यांचे पगार दिले जावेत, यासाठी कंपनीचे संस्थापक आणि त्यांच्या कुटुंबियांनी आपले घरही गहाण ठेवले होते. गेल्या अनेक महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी मला अनेक अडचणींचे डोंगर सर करावे लागत आहेत. यापुढच्या काळात हा संघर्ष आणखी वाढणार आहे.”

बॉस असावा तर असा! बायजूच्या मालकाने स्वतःचं राहतं घर गहाण ठेवत १५ हजार कर्मचाऱ्यांचा दिला पगार

इथे प्रत्येकाने काही ना काही त्याग केलेला आहे. जे निर्णय घेणे कधीही आवडणार नाही, असे निर्णय प्रत्येकाने घेतले आहेत. ही लढाई लढताना प्रत्येकजण काहीसा खचला असला तरी कुणीही हार मानन्याचा निर्णय घेतला नाही, असेही रवींद्रन म्हणाले. “बायजू यांनी कर्मचाऱ्यांना धीर देताना म्हटले की, माझ्या काम करण्याच्या क्षमतांवर तुम्ही दाखविलेल्या विश्वासापेक्षा माझ्यासाठी काहीही महत्त्वाचे नाही. मी तुमच्यासाठी लढलो, तुम्ही माझ्याबरोबर लढलात. हे आपल्यातले एक पवित्र नाते आहे. या नात्यामुळेच मला प्रत्येक वादळाचा सामना करण्याचे बळ मिळाले”, असेही रवींद्रन यांनी सांगितले.

बायजू रवींद्रन पुढे म्हणाले, “माझे वडील माझे आदर्श आहेत. ते शिक्षक होते, म्हणूनच मीही शिक्षक झालो. मी एक उद्योजक होऊ शकलो कारण त्यांनी मला माझ्या स्वप्नांचा पाठलाग करण्याचे बळ दिले, प्रेरणा दिली. विद्यमान कर्मचाऱ्यांना सर्व देयके देण्यासाठी कंपनीने आपली वेळ निश्चितच पाळली आहे.” या पत्रासह रवींद्रन यांनी असेही सांगितले की, कंपनी नफा मिळवण्याच्या अगदी जवळ आली आहे.

BYJU’s च्या १००० कर्मचाऱ्यांचे नोव्हेंबरचे पगार रखडले, कंपनीनं दिलं ‘हे’ कारण

नफा मिळविण्याच्या अगदी जवळ पोहोचलो असलो तरी आपल्या डोक्यावर आधीच्या काही जबाबदाऱ्या आहेत. या जबाबदाऱ्यांचे निराकारण करून पुढील काळात कंपनीला अधिक स्थैर्य आणण्याचा आमचा प्रयत्न आहे.

बायजू कंपनी आधीच अनेक वादांना तोंड देत आहे. काही महिन्यांपूर्वी कंपनीने FEMA तरतुदींचे उल्लंघन केल्याचे समोर आले होते. सुमारे ८००० कोटी रुपयांच्या परकीय गुंतवणुकीची कागदपत्रे देण्यास कंपनीने उशीर केल्याचे ईडीने म्हटले होते. कंपनीला त्या बदल्यात शेअर्सचे वाटपही करता आलेले नाही. याबाबत ईडीने कंपनीला नोटीस पाठवली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बीसीसीआयशीही वाद

कंपनीचा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाशीही वाद सुरू आहे. ब्लूमबर्गने एका अहवालात म्हटले होते की, बायजूने प्रायोजकत्वाशी संबंधित सुमारे २० दशलक्ष डॉलरची रॉयल्टी चुकवली आहे. हे प्रकरण एनसीएलटीकडे गेले असून, २२ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. कंपनीने १.२ बिलियन डॉलरच्या मुदत कर्जावरील व्याज भरण्यातही चूक केली आहे आणि त्याबाबतही वाद सुरू आहे.