मुलाखत –  सतीश मेनन, कार्यकारी संचालक, जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस

देशाचा भांडवली बाजार सार्वकालिक उच्चांकावर आहे, मध्यावधीत चढ-उताराच्या शक्यता गृहीत धरल्या तरी बाजाराचा दीर्घकालीन कल सकारात्मकच आहे. तथापि जगभरात मंदीचे उठलेले काहूर आणि बाह्य धोके पाहता, आगामी काळात गुंतवणूकदारांनी परताव्याच्या अपेक्षांना आवर घालतानाच, पोर्टफोलिओच्या संतुलनाबाबत दक्ष राहणे तितकेच आवश्यक बनले आहे, असा जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे कार्यकारी संचालक सतीश मेनन यांचा गुंतवणूकदारांना सल्ला आहे. त्यांच्याशी झालेल्या बातचीतीचा हा सारांश…

बाजार आणि निर्देशांकांबाबत तुमचा दृष्टिकोन काय?

  • आमचा दृष्टिकोन आशावादीच आहे. बाह्य वातावरण जरी अस्थिर आणि अनिश्चितचा दर्शवत असले तरी देशांतर्गत अर्थव्यवस्थेबाबत चिंता सोडाच, एकूण वाटचाल आश्वासकच दिसून येते. रिझर्व्ह बँक आणि तिच्या पतविषयक धोरणाची कठोरता कायम आहे. त्यासाठी खाद्यान्न महागाई हे महत्त्वाचे कारण आहे. तथापि देशांतर्गत महागाई दराने शिखर बिंदूला गाठल्यानंतर आता उताराकडे प्रवास सुरू केल्याचेही दिसून येते. त्यामुळे महागाईवर नियंत्रणाची आक्रमकता कमी होणे हेदेखील भारतीय बाजाराला सुखावणारे ठरेल.

हेही वाचा – बाजार-रंग : अर्थसंकल्पातील आकडेमोड जुळवताना

निर्देशांकांची वर्षअखेर पातळी काय असेल, तुमचे भाकीत काय?

  • एकंदरीत सकारात्मकता असली तरी वर्षअखेरीस निर्देशांकांच्या पातळीबाबत भाकीत करणे तूर्त टाळलेलेच बरे. याला देशी घटकांपेक्षा, बाह्य घडामोडी आणि त्यांचे प्रतिकूल संकेत अधिक जबाबदार आहेत. आपल्या बाजाराच्या उच्च-मूल्यांकनाबाबत ओरड सुरू आहे आणि बाजार नियामकांनी त्यासंबंधाने अलीकडे वारंवार इशारे दिले आहेत. तथापि उत्तरोत्तर नवनवीन कंपन्या ‘आयपीओ’मार्फत बाजारात दाखल होत आहेत, त्या परिणामी एकंदर बाजाराचे मूल्यांकन आपोआप संतुलितदेखील होत आहे. तरी नजीकच्या काळात बाह्य जोखमीतून बाजारात मोठे चढ-उतार दिसून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. सरलेल्या आठवड्यात सोमवारी झालेल्या पडझडीने हेच दाखवून दिले. दुसरीकडे सार्वकालिक उच्चांकावर असणाऱ्या निर्देशांकांची उच्चांकी घोडदौड मध्यावधीत सुरू राहील, असा आशावादही आहे. दोन्ही पैलूंचा परिणाम पाहता, येत्या काळात गुंतवणूकदारांनी मोह आणि परताव्याच्या अपेक्षांना आवर घालणेही तितकेच महत्त्वाचे आहे. माफक अशा १४-१५ टक्क्यांच्या इच्छित परताव्याचा दृष्टिकोन या काळात गुंतवणुकीसाठी यथोचित ठरेल. प्रचलित महागाई दराला मात देणारा हा तरीही सर्वोत्तम परतावा असेल.

‘आयपीओ’ अर्थात प्राथमिक बाजारपेठेबद्दल तुमचा दृष्टिकोन काय आहे?

  • गेली दोन वर्षे एकंदर बाजार तेजीचा ‘आयपीओ’ अर्थात प्राथमिक बाजारपेठेलाही लाभ मिळाल्याचे दिसत आहे. देशांतर्गत बाजार आणि अर्थस्थिती ही तुलनेने दमदार असल्याचा हा सुपरिणाम आहे. नवीन व्यवसायांमध्ये गुंतवणुकीची संधी म्हणून आणि वाजवी किंमत असणाऱ्या ‘आयपीओ’ला गुंतवणूकदारांचा प्रतिसादही चांगला मिळत आहे. अनेक नवीन व बड्या कंपन्यांचा होऊ घातलेले बाजार पदार्पण पाहता, ‘आयपीओ’चा सुकाळ पुढेही सुरू राहील असे दिसून येते.

यंदाच्या अर्थसंकल्पातील रोजगार वाढ, ग्रामीण विकासावरील भर पाहता, याचा फायदा कोणत्या क्षेत्रांना होईल?

  • अर्थसंकल्पाचा भर पाहता, ग्रामीण उपभोगात वाढ आणि सरकारचा भांडवली खर्च वाढण्याची शक्यता दिसून येते. उत्पादन आणि पुरवठा साखळी वाढवून शेतीतून उत्पन्न वाढवण्याच्या प्रयत्नांमुळे ग्रामीण भागातून मागणी वाढेल, महागाई कमी होईल आणि ग्राहक क्षेत्रातील उत्पादन घटकांचा खर्चही कमी होईल. हे परिणाम पाहता, नित्योपयोगी वस्तू उत्पादने, कृषी, खते, सिमेंट, पायाभूत सोयीयुविधा, दूरसंचार आणि ग्राहकोपयोगी वस्तू आणि सेवा या क्षेत्रात कार्यरत कंपन्यांना याचा फायदा होऊ शकेल.

हेही वाचा – भांडवली नफ्याच्या अर्थसंकल्पीय तरतुदी – संभ्रम, वाद काय?

नवीन गुंतवणूकदारांची संख्या लक्षणीय वाढत आहे, पण बरोबरीने डिजिटल फसवणुकाही वाढल्या आहेत, या जोखमीकडे कसे पाहता?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
  • नवतंत्रज्ञानाधारित डिजिटल साधने आणि उपाय हे गुंतवणूक संस्कृतीच्या संवर्धनासासाठी वरदान ठरले आहेत. गेल्या काही वर्षांत डिमॅट खात्यांमध्ये झालेली लक्षणीय वाढ हेही याचेच फलित आहे. पण त्याच वेळी या नवगुंतवणूकदारांना सावज म्हणून हेरणाऱ्या डिजिटल लबाड्या व फसवणुकीचे प्रकारही वाढणे चिंताजनक आहे. एक जबाबदार दलाली पेढी म्हणून गुंतवणूकदारांना शिक्षित व सावध करण्याची जबाबदारी आम्ही पार पाडतोच. याबाबत व्यापक जागरूकतेची गरज आहे. या लबाड्या परदेशात काम करणाऱ्या टोळक्यांकडून, स्थानिक हस्तकांच्या मदतीने होत असतात. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या आणि तपास यंत्रणांना त्यामुळे फसवणूक करणाऱ्यांचा माग घेणे कठीण जाते आणि या प्रकरणात न्याय मिळवून देणे, म्हणजेच जे गमावले ते परत मिळवणे म्हणूनच बिकट बनले आहे. स्वयंशिस्त व संयम हेच यावर उत्तर आहे. गुंतवणूकदारांनी डिजिटल शिस्त, अर्ज, गुंतवणूक आणि सेटलमेंट प्रक्रियांची वैधता पाहणे, केवायसी नियम आणि त्यांचे पालन करणे आवश्यक आहे. सावधगिरीचा शब्द म्हणजे झटपट पैशाचा मोह टाळावा आणि अवाजवी परतावा किंवा तशी हमी म्हणजे जोखीम आपणहून ओढवून घेणे हे पक्के ध्यानात ठेवावे.

सचिन रोहेकर / sachin.rohekar@expressindia.com