प्रत्येकामध्ये स्वत:चं वेगळं स्वप्नं साकार करण्याचं निसर्गदत्त सामर्थ्य असतं. अगदी आदिमानवापासून आजवरच्या प्रगत माणसानं अशक्य कोटीतली स्वप्नं पाहिलीच नाहीत तर साकारही केलीत.
असं म्हणतात, ‘प्रत्येक मूल आपल्या बंद मुठीतून जगावेगळं स्वप्न घेऊन जन्माला आलेलं असतं’. ते स्वप्न साकार करण्यासाठी लागणारी बुद्धिमत्ता, गुणवत्ता, कल्पकता, विचारशक्ती आणि सर्जनशीलता प्रत्येकाकडे असतेच. फक्त त्यासाठी दृष्टी आणि स्वत:कडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन असायला हवा.
एक व्यक्ती म्हणून आवड, क्षमता, सुप्तगुण, स्वभाव, मर्यादा, दोष यांचं भान हवं. सर्वात महत्त्वाचं स्वत:ला सर्वाधिक कोणत्या गोष्टीमध्ये ‘आवड’ आहे, ते निश्चित करायला हवं. एकावेळी अनेक गोष्टी आवडू शकतात. परंतु, अशी एकमेव आवड असू शकते, ती आपल्या स्वभावाचा वा अवघ्या जगण्याचा भाग असते. ते नेमकेपणानं हेरायला हवं, कळायला हवं. आयुष्यात कोण बनायचं?
एकदा दिशा ठरली की, ध्यास घेऊन स्वप्नाचा प्रवास सुरू होतो.  ताणतणाव, शंका, अडीअडचणी, अपयश आणि अशक्य हे अडसरच मग नाहीसे होतात. प्रचंड मेहनत, सराव, अभ्यास याचा ध्यास असावा लागतो. त्याकरिता स्वप्न साकार झाल्याचा दिवस बघण्यासाठी कित्येक रात्रींचे ‘दिवस’ करावे लागतात; हेच खरं. भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम म्हणतात- ‘आपण झोपेत पाहतो; ते खरं स्वप्न नसतं तर आपली झोप उडवतं, ते खरं स्वप्न असतं.’