रोहिणी शहा राज्य सेवा पूर्वपरीक्षा एप्रिलमध्ये प्रस्तावित आहे. या परीक्षेतील पेपर एकमधील घटक विषयांच्या तयारीबाबत चर्चा करत आहोत. या लेखापासून अर्थशास्त्र घटकाच्या तयारीची चर्चा करण्यात येत आहे. या लेखामध्ये या घटकावर मागील तीन वर्षांमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नांचे विश्लेषण आणि त्या आधारे तयारी करताना लक्षात घ्यावयाचे मुद्दे पाहू. प्रश्नातील योग्य उत्तराचा पर्याय ठळक करण्यात आलेला आहे. * प्रश्न १. भारताने स्वीकारलेल्या नियोजनाच्या धोरणातील सुरुवातीच्या काळात खालीलपैकी कोणत्या तीन बाबी होत्या? अ. दीर्घकालीन वृद्धी प्रक्रियेची सुरुवात करण्यासाठी सुयोग्य पाया तयार करणे. ब. विकास प्रक्रिया जेव्हा सुरू होईल तेव्हा कारखानदारी क्षेत्राला प्राथमिकता (प्राधान्य) देणे क. भांडवली उत्पादन क्षेत्रावर भर ड. उपभोग्य वस्तू उत्पादन क्षेत्रावर भर पर्यायी उत्तरे १) फक्त अ, ब आणि क २) फक्त अ, क आणि ड ३) फक्त ब, क आणि ड ४) फक्त अ, ब आणि ड * प्रश्न २. जून २०१२ मध्ये फ्र +20 घोषणापत्रासंदर्भात शाश्वत विकास उद्दिष्टे (SDG) ठरविण्यात आली. त्यानुसार पुढीलपैकी कोणते/ती वैशिष्टय़/टय़े ठरविण्यात आलेले नव्हते? अ. गरिबीचे उच्चाटन, असमानतेविरुद्ध संघर्ष, लिंगभाव समानता ब. आरोग्य व शिक्षण सुधारणा, महासागर व जंगल संरक्षण क. अविरत विकासासाठी जागतिक भागीदारी, पाठपुरावा आणि समीक्षासाठी प्रभावी संरचना विकास ड. अतिरेकी संघटनांवर बंदी, परआक्रमणावर बंदी पर्यायी उत्तरे १) फक्त क आणि ड २) फक्त अ, ब आणि क ३) फक्त ड ४) फक्त अ * प्रश्न ३. दारिद्रय़ घटविण्याच्या कोणत्याही धोरणात स्वयंरोजगार आणि वेतनाधिष्ठित रोजगार या दोन्ही गोष्टींचा समावेश होणे गरजेचे आहे. कारण.. अ. ग्रामीण भागात स्वयंरोजगार हा जास्त प्रचलित आहे. ब. वेतन रोजगारावरील अवलंबित्व हे मालकांवरील (employer) अवलंबित्व वाढविते. क. असे केले नाही तर श्रीमंत व गरिबांमधील दरी वाढेल. ड. श्रीमंतांची मालमत्ता संसाधने वाढतील. पर्यायी उत्तरे १) फक्त अ अणि ब २) फक्त ब आणि क ३) फक्त क आणि ड ४) वरील सर्व * प्रश्न ४. लोकसांख्यिकी लाभांश यामुळे मिळतो. अ. कमी होणारा जन्मदर आणि त्या अनुषंगाने होणारे वयोगटांच्या संरचनेत होणारे बदल ब. कमी होणारा जन्मदर आणि त्या अनुषंगाने होणारे काम करण्यायोग्य वयोगटांच्या संरचनेत होणारे बदल\ क. कमी होणारा मृत्यू दर पर्यायी उत्तरे १) फक्त ब २) फक्त अ ३) फक्त क ४) फक्त ब आणि क * प्रश्न ५. अन्न सुरक्षा कायदा, २०१३ च्या संदर्भात पुढीलपैकी योग्य विधान/ने निवडा. अ. हा कायदा ७५% ग्रामीण आणि ५०% शहरी लोकसंख्येला अन्न सुरक्षेचा लाभ उपलब्ध करून देतो. ब. लाभार्थ्यांना दरमहा प्रति किलो रु. ३ प्रमाणे तांदूळ, प्रति किलो रु. २ प्रमाणे जाडे भरडे धान्य व प्रति किलो रु. १ प्रमाणे गहू उपलब्ध होणार आहे. १) दोन्ही अ आणि ब बरोबर २) दोन्ही अ आणि ब चूक ३) फक्त अ बरोबर ४) फक्त ब बरोबर * प्रश्न ६. भारत सरकारने पुढीलपैकी कोणते कार्यक्रम हे सामाजिक सुरक्षा या उदेशाने सुरू केले आहेत? अ. आम आदमी विमा योजना ब. राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना क. राष्ट्रीय सामाजिक साहाय्य कार्यक्रम पर्यायी उत्तरे १) फक्त अ अणि ब २) फक्त ब आणि क ३) फक्त क ४) वरील सर्व वरील प्रातिनिधिक प्रश्नांच्या आधारे प्रश्नांचे स्वरूप समजून घेऊन तयारी करण्यासाठी पुढील मुद्दे लक्षात घेणे आवश्यक आहे * बहुविधानी प्रश्नांची संख्या जास्त आहे/असली तरी सन २०१९ मध्ये पर्याय विस्ताराने कमी/ एक -दोन शब्दांचे असलेले दिसतात. * योजनांबाबतच्या प्रश्नांमध्ये पर्यायांबाबत नेमकी माहिती असणे आवश्यक असलेले दिसते. योजना/ धोरणे यांबाबत तरतुदी, कालावधी, उद्देश अशा सर्व बाबी विचारण्यात आल्या आहेत. * आर्थिक नियोजन / पंचवार्षिक योजना या घटकाचा अभ्यासक्रमामध्ये उल्लेख नसला तरी त्यावर दरवर्षी किमान एक प्रश्न त्यावर विचारलेला आहे. * दारिद्रय़, लोकसंख्या, महागाई या मुद्दय़ांमधील संकल्पनात्मक बाबींवर जास्त भर आहे, पण याबाबतच्या चालू घडामोडी आणि अद्ययावत आकडेवारी यांचीही माहिती असणे आवश्यक आहे. * सध्या शाश्वत विकास लक्ष्ये गाठायची असली तरी सहस्रक विकास लक्ष्यांवरही प्रश्न विचारलेले दिसतात. त्यामुळे शाश्वत विकास लक्ष्ये आणि सहस्रक विकास लक्ष्ये यांची तुलनात्मक टिपणे काढून तयारी करणे जास्त फायदेशीर ठरते.