सामान्य अध्ययनाची प्रश्नपत्रिका पाहिली तर त्याचा आवाका आपल्या लक्षात येईल. अनेक विद्यार्थी पूर्व व मुख्य परीक्षेला या घटकात कमी पडतात व अपयशी ठरतात. या वर्षी यूपीएससी मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम बदलला आहे. नवीन अभ्यासक्रमावर एक नजर टाकली तर सामान्य अध्ययनाचे महत्त्व आपल्या लक्षात येईल. पूर्वपरीक्षेत सामान्य अध्ययनाच्या (सी-सॅट १) पेपर हा वस्तुनिष्ठ स्वरूपाचा बहुपर्यायी अशा प्रकारचा असतो. मात्र मुख्य परीक्षेत मोठी निबंधासारखी उत्तरे लिहावयाची असतात. मुख्य परीक्षेत एक प्रश्न किती गुणांसांठी आहे, हे मात्र सांगता येत नाही. काही प्रश्न २० गुणांसाठी, काही १५ गुणांसांठी तर काही १०, ५, ३, २ गुणांसाठी विचारले जातात. त्यातही शब्दमर्यादेचे बंधन असते. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सामान्य अध्ययनाचा अभ्यास हा पूर्वपरीक्षेच्या तयारीपासूनच केल्यास जास्त फायदा असतो. पूर्वपरीक्षेचा अभ्यास हा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम डोळ्यासमोर ठेवूनच करावा. उदा.- पूर्वपरीक्षेसाठी इतिहास अभ्यासताना, मुख्य परीक्षेच्या सामान्य अध्ययनाचा पेपर – १ मधील इतिहास भारतीय संस्कृती या सामायिक घटकांची तयारी विस्तृत व सखोल करावी, म्हणजे मुख्य परीक्षेच्या वेळी जास्त धावपळ करण्याची गरज पडत नाही व पूर्वपरीक्षेत काही मूलभूत व अवघड प्रश्नही विचारलेत तर आपण त्यांचीही उत्तरे देऊ शकतो. शक्यतो इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र व काही मूलभूत संकल्पना यांच्या आधीच नोट्स काढून ठेवल्यास त्याचा उपयोग परीक्षेच्या शेवटच्या टप्प्यात जास्त होतो.

नोट्स कशा काढाव्यात?

 यूपीएससी परीक्षेतील सामान्य अध्ययनाचा आवाका फारच मोठा आहे. त्यामुळे या विषयाच्या स्वत तयार केलेल्या नोट्सचा फायदा परीक्षेच्या शेवटच्या टप्प्यात अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतो. कितीही दिवस आधीपासून तुम्ही तयारी सुरू केली तरी परीक्षेच्या शेवटी तुम्ही आत्मविश्वासाने म्हणू शकत नाहीत की, तुमचा अभ्यास पूर्ण झाला. अशा वेळी अभ्यासाची उजळणी पटकन व्हावी यासाठी नोट्सचे महत्त्व आहे. शाळेत असल्यापासून आपल्याला एका गोष्टीचे सर्वात जास्त आकर्षण असते, ते म्हणजे िपट्रेड पद्धतींच्या नोट्स. परीक्षा जवळ आली की, आपल्या अभ्यासाच्या खोलीत अशा नोट्सचा ढीग जमा होतो. परंतु अशा प्रकारच्या नोट्सपेक्षा आपण स्वत तयार केलेल्या हाताने, लिहिलेल्या टिपणांचे महत्त्व अधिक असते. लहानपणी आमच्या गुरुजींनी आम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगितली होती. ती अशी की, हजार वेळा बोलण्यापेक्षा एकदा लिहिले तर ते जास्त लक्षात राहते. नोट्स कशा तयार कराव्यात, याचा काही ठरलेला नियम नाही, प्रत्येकाने अभ्यासलेल्या विषयाची कमी वेळात उजळणी करता यावी व तो विषय समजून डोक्यात बसावा एवढे महत्त्वाचे आहे. शक्यतो नोट्स खालील प्रकारे काढल्यास त्याचा जास्त फायदा होईल. सर्वप्रथम ज्या विषयाच्या नोट्स तयार करावयाच्या आहेत, त्या विषयांसंदर्भात एक-दोन पुस्तकांचे वाचन करून घ्यावे. महत्त्वाच्या मुद्दय़ांना अधोरेखित करावे. दुसऱ्या वेळी हा अधोरेखित मजकूर एकदा वाचून घ्यावा, म्हणजे पुन्हा पुन्हा पुस्तक वाचण्याची गरज पडत नाही व नंतरच टिपणं काढायला सुरुवात करावी. शक्यतो ज्या कागदावर लिहिणार आहात, त्या कागदाच्या डाव्या किंवा उजव्या बाजूस मोठा समास सोडून लिहावे, म्हणजे काही दिवसांनी एखादा मुद्दा आठवला किंवा वाचण्यात आला तर तो मुद्दा तुम्ही त्या समासात लिहू शकतात. नोट्स तयार करताना वेगवेगळ्या रंगांचे पेन तसेच विविध आकृत्या, वेगवेगळे नकाशे यांचा वापर केल्यास नोट्स तयार करणे रंजक ठरते व अभ्यास परिपूर्ण होण्यास मदत होते. आजकाल यूपीएससी परीक्षेत नकाशावर आधारित काही प्रश्न विचारले जातात. त्यांचाही अभ्यासही व्हायला मदत होते. नोट्स तयार करताना एक नकाशा बरोबर असणे आवश्यक आहे. म्हणजे दैनिक वृत्तपत्रातील एखादी बातमी वाचली तर त्यासंबंधी नोट्स तयार करताना ते ठिकाण नकाशावर कोठे आहे, ते प्रथम पाहावे; म्हणजे तो भाग लक्षात ठेवण्यासाठी जास्त सोपा जातो. इतिहासासंबंधी वाचन करताना, एखादी घटना इतिहासात कोठे घडली, कधी घडली हे वाचतानाच ते ठिकाण जगाच्या किंवा देशाच्या नकाशात आज कोठे आहे, तेदेखील पाहून घ्यावे; म्हणजे ती घटना दीर्घकाळ लक्षात राहते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण तयार केलेल्या नोट्सचे वाचन वेळोवेळी पुन्हा पुन्हा करावे, तरच नोट्स तयार केल्याचा उपयोग होतो.

पूर्वपरीक्षेचा अभ्यास करताना सर्वात मोठी अडचण म्हणजे कोणत्या पुस्तकांचा वापर करावा? जर पुस्तके घेण्यासाठी बाजारात गेलात तर आजकाल संपूर्ण बाजारभर स्पर्धापरीक्षेची विविध पुस्तके, रंगीबेरंगी आकर्षक पृष्ठांच्या स्वरूपात बाजारात दिसतात. काही विद्यार्थ्यांचा सर्वात जास्त वेळ पुस्तके जमविण्यात व नोट्स गोळा करण्यात जातो. शक्यतो जास्त पुस्तके वाचण्यापेक्षा या परीक्षेसाठी आवश्यक असणारी कमी पुस्तके जास्त वेळ वाचावीत. पूर्वपरीक्षेचा किंवा मुख्य परीक्षेचा अभ्यास सुरू करताना सातवी ते बारावीपर्यंतची ‘एनसीइआरटी’ची पुस्तके एकदा वाचून ती समजून घ्यावीत. एखादा विषय समजून घेण्यासाठी त्याच्या मूलभूत संकल्पना समजून घेणे आवश्यक असते. त्याशिवाय अभ्यासाची इमारत उभी राहू शकत नाही व या मूलभूत गोष्टी ‘एनसीइआरटी’च्या पुस्तकांतून समजून घेणे सोपे असते, तसेच पूर्वपरीक्षेत जे काही प्रश्न विचारले जातात, त्यातील काही प्रश्नांची उत्तरे या अभ्यासाच्या जोरावर आपण देऊ शकतो.

पूर्वपरीक्षेसाठी पुस्तके :

१) इतिहास :

पूर्वपरीक्षेसाठी इतिहासाच्या अभ्यासक्रमात फक्त भारताचा इतिहास व भारताची स्वातंत्र्य चळवळ एवढेच नमूद केले आहे. प्राचीन भारताचा इतिहास ,मध्ययुगीन भारताचा इतिहास व आधुनिक भारताचा इतिहास यांचा स्वतंत्र अभ्यासक्रम नमूद केलेला नाही. त्यामुळे अभ्यास करताना कोणत्या घटकाला किती महत्त्व द्यावे व कोणकोणती पुस्तके वाचावीत याविषयी गोंधळ होऊ शकतो. या घटकाचा अभ्यास करताना आधुनिक भारताचा इतिहास व भारताचा स्वातंत्र्य लढा याचा सविस्तर अभ्यास करावा.

पुस्तके :

अ)    ‘एनसीइआरटी’ची पाचवी ते बारावीपर्यंतची इतिहासाची पुस्तके.

ब)    भारताचा स्वातंत्र्य लढा  – एनबीटी प्रकाशनाची पुस्तके

क)    भारताचा स्वातंत्र्य लढा – स्ट्रगल फॉर इंडिपेन्डन्स : बिपीन चंद्रा

२) भारत आणि जगाचा भूगोल :

भूगोलाचा अभ्यास करताना नकाशा बरोबर असणे आवश्यक आहे. जर ‘यूपीएससी’च्या पूर्वपरीक्षेच्या मागच्या पाच वर्षांच्या प्रश्नपत्रिका बघितल्यास आपणास लक्षात येईल की, काही प्रश्न नकाशावर विचारलेले होते. नकाशावाचनाची सवय नसेल तर हे प्रश्न सोडवणे अवघड जाते.

 पुस्तके :

अ)    ‘एनसीइआरटी’ची पाचवी ते बारावीपर्यंतची भूगोलाची पुस्तके

ब)   A Certificate Course in Geography – Goh Cheng Leong

क)   Geography Through Maps – K. Siddhartha

ड)    ऑक्सफर्ड किंवा टी. टी. के. प्रकाशनाचा नकाशा

३) भारताचे संविधान व भारताचे शासन :

हा भाग अभ्यासण्यासाठी अत्यंत सोपा आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या घटकावर जे प्रश्न विचारले जातात, ते चालू घडामोडीशी संबंधित माहितीच्या आधारेच आपण सोडवू शकतो.

उदा. सर्वोच्च न्यायालयाने संजय दत्तला दिलेली शिक्षा राज्यपाल कमी करू शकतात का? कोणत्या कलमाच्या आधारे?

पुस्तके :

अ)‘एनसीइआरटी’ची आठवी ते बारावीपर्यंतची पुस्तके

ब) Our Parliament- Subhash kashyap

क)Our Constitution – Subhash kashyap

ड)  Indian Polity – लक्ष्मीकांत

या घटकावर पूर्वपरीक्षेसाठी काही बहुपर्यायी प्रश्न तसेच मागच्या ‘यूपीएससी’च्या पूर्वपरीक्षेत विचारले गेलेले प्रश्न सोडवावेत. त्यामुळे प्रश्नपत्रिका सोडवताना गोंधळ होणार नाही.

४) भारतीय अर्थशास्त्र व सामाजिक विकास :

या घटकाचा अभ्यास करताना या घटकाशी संबंधित मलभूत संकल्पना असलेली देशाची व जगाची आíथक स्थिती याचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

पुस्तके :

अ)    ज्या वर्षी तुम्ही परीक्षा देणार आहात, त्या वर्षांतील अर्थशास्त्राचे वार्षकि अहवाल (Economic Survey) इंटरनेटवरदेखील उपलब्ध असतात.

ब)    ‘एनसीइआरटी’ची नववी ते बारावीपर्यंतची पुस्तके

क)    भारताची अर्थव्यवस्था : दत्त आणि सुंदरम्

५) पर्यावरणासंबंधी प्रश्न :

पर्यावरण या घटकावर जे प्रश्न विचारले जातील, त्यासाठी या विषयाचे विशिष्ट ज्ञान आवश्यक नाही, असे अभ्यासक्रमातच नमूद केले आहे. गेल्या दोन वर्षांत जे प्रश्न विचारले गेलेत त्यांचा अभ्यास केल्यास लक्षात येते की, या घटकावर जे प्रश्न विचारले गेलेत ते चालू घडामोडींशी संबंधित असतात.

पुस्तके : ‘एनसीइआरटी’चे पर्यावरण संबंधित (अकरावीचे पुस्तक याशिवाय) रोजचे दैनिक वृत्तपत्र आणि इंटरनेटचा वापर करावा.

६) सामान्य विज्ञान :

इतिहासाप्रमाणेच सामान्य विज्ञान या घटकाचा आवाका फारच मोठा आहे. उदा. जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र त्याचप्रमाणे विज्ञान आणि तंत्रज्ञान, त्यातही जे विद्यार्थी विज्ञान शाखेतील असतील, त्यांना या घटकाचा अभ्यास करताना फारशा अडचणी येत नाहीत, मात्र ज्या विद्यार्थ्यांना या विद्याशाखेची शैक्षणिक पाश्र्वभूमी नाही, त्यांनी मात्र या घटकाचा व्यवस्थित अभ्यास करावा. जर पूर्वपरीक्षा व मुख्य परीक्षा या दोघांचा विचार केल्यास या घटकावर बरेच प्रश्न विचारले जातात.

पुस्तके : 

१) ‘एनसीइआरटी’ची पाचवी ते दहावीपर्यंतची पुस्तके

२) दर महिन्याला येणारे ‘सायन्स रिपोर्टर’ हे मासिक

३) विज्ञान आणि तंत्रज्ञान – wizhard िप्रकाशानाची पुस्तके

७) चालू घडामोडी :

भारत व जगासंबंधी खरे तर पूर्वपरीक्षेच्या अभ्यासक्रमात हा पहिलाच मुद्दा नमूद केला आहे. या घटकाची व्याप्ती प्रचंड मोठी आहे. मात्र व्यवस्थित रणनीती तयार करून याचा अभ्यास केल्यास हा घटक फारसा अवघड जात नाही. यासाठी नियमितपणे वृत्तपत्रांचे वाचन करणे आवश्यक आहे. आघाडीच्या वृत्तपत्रांचे वाचन करून महत्त्वाच्या घटनांची वहीमध्ये रोजच्या रोज तारखेनुसार नोंद करीत जावी व दर आठवडय़ाला आपण जे वहीत लिहिले आहे त्याचे वाचन करावे. याचा फायदा पूर्वपरीक्षेला तर होतोच, मात्र सर्वात जास्त फायदा मुख्य परीक्षेमध्ये होतो. २०११ व २०१२च्या ‘यूपीएससी’च्या मुख्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास केल्यास लक्षात येते की, जो विद्यार्थी वृत्तपत्रांचे नियमित वाचन करून टिपणं काढत होता, त्यांना या प्रश्नांची उत्तरे देणे सोपे जाते. ‘चालू घडामोडी’ या घटकासाठी एका स्वतंत्र वहीत नियमित घडणाऱ्या आणि परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या घटनांची रोज नोंद करून ठेवावी, रोज दैनंदिन बातम्या ऐकाव्यात किंवा पाहाव्यात. त्यात परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा असेल तर त्याची वहीत नोंद करून ठेवावी. दूरचित्रवाणी वाहिन्यांवर रोज कोणत्या ना कोणत्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा पाहायला मिळते. त्यातील महत्त्वाच्या मुद्दय़ांचेदेखील संकलन करून ठेवावे, मात्र हे करताना लक्षात ठेवा. एखाद्या विषयावर संपादकीय लेख वाचला तर तो तसाच कॉपी करून लिहू नये. कारण ती लेखकांनी मांडलेली त्यांची मते असतात. आपण परीक्षार्थी म्हणून त्या घटनेचा सर्व बाजूंनी विचार करून परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे आपल्या वहीत लिहून ठेवावेत. याचा उपयोग पूर्वपरीक्षेला तर होतोच, परंतु या सवयींचा उपयोग मुख्य परीक्षेच्या सामान्य अध्ययनाचा पेपर लिहिताना व निबंधाचा घटक लिहिताना होतो.

परीक्षेच्या ऐन मोसमात बाजारात चालू घडामोडीवर विविध पुस्तके येतात. त्या पुस्तकांचा अभ्यास केल्यानंतर आपणास अभ्यास केल्याचे समाधान लाभते. परंतु त्याचा विशेष उपयोग होत नाही.

काही महत्त्वाची मासिके 

योजना, सायन्स रिपोर्टर, कुरूक्षेत्र, सिव्हिल सíव्हसेस टाइम्स / क्रॉनिकल. ज्या वर्षी परीक्षा देणार आहात, त्या वर्षी पब्लिकेशन विभागाने प्रकाशित केलेले इंडिया इयर बुक वाचणे आवश्यक आहे.     ल्ल