प्रवीण चौगले

आजच्या लेखामध्ये यूपीएससी मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन-२ या पेपरमधील ‘आंतरराष्ट्रीय संबंध’ या अभ्यासघटकामध्ये अंतर्भूत असणारा घटक परदेशस्थ भारतीय (Indian Diaspora) विषयी चर्चा करणार आहोत.

भारताच्या परराष्ट्र धोरणाला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणारा घटक म्हणून त्यांचे आर्थिक योगदान लक्षात घेता परदेशस्थ भारतीय या घटकाची चर्चा करणे क्रमप्राप्त आहे. परदेशात वास्तव्य करणारे भारतीय लोक दरवर्षी फार मोठय़ा प्रमाणावर रक्कम पाठवितात. २०१८ साली इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार परदेशस्थ भारतीयांनी भारतामध्ये सुमारे साडेपाच लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम पाठविली होती.

परदेशस्थ भारतीयांसंबंधीच्या एका उच्चस्तरीय समितीच्या अहवालानुसार जगाच्या विविध भागांमध्ये स्थलांतरित झालेल्या आणि आपली स्वतंत्र भारतीय ओळख जपणाऱ्या भारतीयांचा समूह म्हणजे परदेशस्थ भारतीय अशी व्याख्या केली आहे. मिनिस्ट्री ऑफ ओव्हरसीज इंडियन अफेअर्सने परदेशस्थ भारतीयांचे अनिवासी भारतीय (NRI) आणि भारतीय वंशाचे लोक (PIO) अशा दोन वर्गामध्ये वर्गीकरण केलेले आहे. परदेशस्थ भारतीयांचे विस्तृत वर्गीकरण पुढीलप्रमाणे करता येईल.

(a) चरितार्थासाठी जाणारे

(b) वसाहती कालखंडामध्ये शेतमळ्यांमध्ये काम करण्यास फिजी, दक्षिण आफ्रिका, त्रिनिदाद व टोबॅगो, सुरीनाम इ. देशांत गेलेले भारतीय, ज्यांना गिरमिटिया (Indentured) असे म्हणतात.

(c) भारतीय नागरिकत्व असणारे, परंतु परदेशामध्ये वास्तव्यास असणारे, ज्यांना ग्रीनकार्डसारख्या सवलती मिळतात.

(d) पर्यटक, संशोधन करण्यास जाणारे, अल्प कालावधीमध्ये परतणारे (फ्लोटिंग).

संयुक्त राष्ट्रसंघाच्या २०१५ च्या पाहणीनुसार, परदेशात गेलेल्यांच्या जगातील एकूण स्थलांतरितांच्या संख्येपैकी भारतीयांची संख्या अधिक आहे. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने प्रादेशिक सार्वभौमत्वावर दिलेल्या भरामुळे परदेशस्थ भारतीयांकडे दुर्लक्ष झाले. परिणामी, परदेशस्थ भारतीयांची परराष्ट्र धोरणाला आकार देण्यातील भूमिका मर्यादित राहिली.

१९९१ नंतर अनिवासी भारतीयांच्या अर्थव्यवस्थेतील सहभागाबाबत विचार केला गेला.

२००० साली तत्कालीन एन.डी.ए. सरकारने परदेशस्थ भारतीयांच्या समस्या जाणून घेण्यासाठी एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली. या समितीच्या शिफारशींवरून व्हिसारहित व्यवस्थेकरिता PIO कार्डचे संस्थात्मक प्रारूप, प्रवासी भारतीय सन्मान अ‍ॅवॉर्ड, प्रवासी भारतीय दिवसाचे आयोजन इ. बाबी अमलात आणल्या गेल्या. गेल्या दशकापासून प्रवासी भारतीय दिवसाचे आयोजन, परदेशस्थ भारतीयांच्या गुंतवणुकीला प्रोत्साहन, ङnow India, Study India सारख्या योजना, इंडिया कम्युनिटी वेल्फेअर फंड, प्रवासी सोशल वेल्फेअर योजना इ. कार्यक्रमांद्वारे परदेशस्थ भारतीयांशी निकटचे संबंध प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परराष्ट्र धोरण अभ्यासकांच्या मते, नवउदारमतवादी धोरणात्मक पुढाकारांना प्रोत्साहन देणारे घटक म्हणून भारत सरकारला परदेशस्थ भारतीयांच्या आर्थिक क्षमतेची झालेली जाणीव तसेच परदेशस्थ भारतीयांचा सॉफ्ट पॉवर म्हणून वापर यामुळे परदेशस्थ भारतीयांबाबतच्या सरकारच्या दृष्टिकोनामध्ये बदल घडून येण्यास मदत झाली.

परदेशस्थ भारतीयांनी ते ज्या देशात राहतात तेथे केवळ आर्थिक विकासातच नव्हे तर तेथील राजकीय प्रक्रिया व एकंदर विकासातही योगदान दिलेले आहे. बऱ्याच भारतीयांनी राजकारणात चांगला ठसा उमटवला आहे. उदा. अनिरुद्ध जगन्नाथ- मॉरिशस, महेंद्र सिंग चौधरी- फिजी, लिओ वराडकर- आर्यलड आणि नुकत्याच कमला हॅरीस या अमेरिकेच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अशा भारतीयांचा एक दबावगट तयार करता येईल का, याची चाचपणी करणे आवश्यक ठरते. कारण अशा दबावगटाच्या माध्यमातून भारताचा आंतरराष्ट्रीय राजकारणात दबदबा निर्माण करता येईल, तसेच भारतामध्ये गुंतवणूक, तंत्रज्ञान हस्तांतरण इ. बाबींचा ओघ वाढण्यास मदत होईल. सध्या भारत सरकारचे बहुचर्चित कार्यक्रम डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया यांनाही फायदा होऊ शकतो.

परदेशस्थ भारतीयांना भारत सरकार विविध मार्गानी भारताशी जोडण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, त्यांना भारतामध्ये उद्योगस्नेही वातावरण निर्माण करून देण्याची निकड आहे. सध्या प्रचलित असणारे कायदे, कररचना, पर्यावरणीय मंजुऱ्या इ. बाबींमधील क्लिष्टता कमी करणे आवश्यक आहे. या घटकावर आतापर्यंत एक प्रश्न विचारण्यात आला आहे तो पुढीलप्रमाणे-

  1. Indian Diaspora has an important role to play in South-East economy and society. Appraise the role of Indian Diaspora in South-East Asia in this context. (२०१७).

भारताचे दक्षिण-पूर्व आशियाशी प्राचीन काळापासून संबंध आहेत. ब्रिटिश राजवटीदरम्यान भारतीयांना मोठय़ा प्रमाणात अनुबंधित मजुरांच्या स्वरूपामध्ये नेण्यात आले होते. उत्तरामध्ये भारतीयांनी आग्नेय आशियायी देशांमध्ये दिलेल्या योगदानाविषयी थोडक्यात लिहावे लागेल. उदा. सिंगापूरमधील माहिती तंत्रज्ञान, उद्योग, मलेशिया व म्यानमारमध्ये उद्योग, शिक्षण, नागरी सेवा, फिलिपिन्स व इंडोनेशियासारख्या देशांमधील वस्त्रोद्योगाची निर्यात. भारतीयांनी या देशांमध्ये स्वत:ला योग्य प्रकारे सामावून घेतलेले आहे. परिणामी भारतीय वंशाचे लोक आग्नेय, आशियायी देश आणि भारतीय संस्कृती व वारसा यांमध्ये दूत म्हणून कार्यरत आहेत. परदेशस्थ भारतीयांना अधिकाधिक भारताशी जोडून भारत व ते राहत असलेले देश यांच्या विकासामध्ये त्यांचे सहकार्य प्राप्त करण्याची आवश्यकता आहे.

या घटकाच्या तयारीमध्ये परदेशस्थ नागरिकांकरिता भारत सरकार राबवत असलेल्या विविध योजना, उपक्रम इत्यादींची माहिती घेणे आवश्यक आहे. उदा. प्रवासी कौशल योजना या उपक्रमाद्वारे परदेशात जाणाऱ्या कामगारांना तिकडे जाण्यापूर्वी प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यात संबंधित देशातील सामाजिक चालीरीती, समजुती, नियम व आधुनिक उपकरणे याबाबत माहिती दिली जाते. परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या नो इंडिया प्रोग्रॅम (know India programme) द्वारे आजपर्यंत विधि विदेशातील भारतीय युवक व युवतींची निवड करून त्यांना भारतातील संस्कृती, शहरे, ग्रामीण जीवन, चित्रपट, लोकांचे राहणीमान इत्यादींची ओळख करून दिलेली आहे.