पदवी शिक्षण घेताना त्याला पूरक असे क्रमिक अभ्यासापलीकडचे एखादे प्रशिक्षण पूर्ण केले तर करिअरला एक दिशा मिळू शकते. पदवीनंतर काय, याचा विचार पदवी शिक्षण घेतानाच कसा करता येईल, याचे मार्गदर्शन-
पहिल्या पदवीचे कौतुक आता इतिहासजमा झाले आहे. अलीकडे संपादन केलेली पहिली पदवी हा शिक्षणाचा पाया मानला जातो. पहिली पदवी प्राप्त करण्यासाठी विद्यार्थी पाच ते सहा वर्षे अभ्यास करत असतो. दरम्यानच्या काळात शिकणाऱ्याने केवळ अभ्यास केला की त्यासोबत आणखी काही विषयांचे ज्ञानार्जन केले, वा अनुभव घेतला, हे आज महत्त्वाचे ठरते. कारण विद्यार्थ्यांने केलेला हा अधिकचा अभ्यास त्याला पदवीनंतरच्या वाटचालीसाठी उपयोगी पडतो.
पदवी प्राप्त केल्यानंतर पदवीशिक्षणाच्या पाच-सहा वर्षांत काय कमावले वा गमावले याचा विचार न करता जे विद्यार्थी पुन्हा एखाद्या नव्या अभ्यासक्रमाच्या मागे लागतात त्यांना यश हाती लागेलच, याची शाश्वती नसते. हे लक्षात घेत कोणत्याही पदवीधराने करिअरचा पुढचा प्रवास आखताना आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे.
कौशल्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारचे करिअर करणाऱ्या प्रत्येकालाच काही महत्त्वाच्या गोष्टी करता येणे अत्यावश्यक आहे. काही गोष्टी पंचेचाळिशीपर्यंत पटकन शिकता येतात. नव्या गोष्टींची अभ्यासाने सवय करून घ्यावी लागते, तरच त्या करताना एक प्रकारची सहजता येते. पूर्वीच्या काळी निमशहरी भागात किंवा गावात राहणाऱ्याला गाव सोडून इतरत्र नोकरीसाठी, कामासाठी, व्यवसायासाठी जायची वेळ क्वचित यायची. याउलट, अलीकडच्या काळात शिक्षण, नोकरीसाठी आपले गाव सोडून इतरत्र जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. स्वत:चे गाव सोडले की, भाषा बदलते, माणसे बदलतात, हवामान बदलते. या तिन्हीशी जुळवून घेणे महत्त्वाचे ठरते. बदललेल्या वातावरणात तरण्यासाठी, समोरच्या व्यक्तींशी संवाद साधणे महत्त्वाचे ठरते. यासाठी संवादकौशल्ये अंगी बाणवायला हवीत. यात वेगवेगळ्या विषयांची माहिती असणे, ती योग्य पद्धतीने मांडता येणे आणि समोरच्या व्यक्तींचे म्हणणे ऐकून घेणे महत्त्वाचे ठरते.
संपर्कासाठी लेखी आणि बोली भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक असते. उदाहरणार्थ एम.बी.ए. (मार्केटिंग) अभ्यासक्रम पूर्ण केलेला एखादा विद्यार्थी जेव्हा कोकणात त्याच्या उत्पादनविक्रीच्या कामासंदर्भात तिथे जातो, तेव्हा त्याला तिथल्या स्थानिकांशी त्यांच्या भाषेत संवाद साधावा लागतो आणि रोज रात्री ऑफिसला इंग्रजीतून कामाचा अहवाल पाठवावा लागतो. यासाठी त्याने बहुभाषिक असणे आवश्यक आहे.
एखाद्याने पदवी शिक्षण घेतानाच दुचाकी, चारचाकी, व्यावसायिक वापराची वाहने चालवण्याचे परवाने मिळवले तर त्याचा अनेक व्यवसायांमध्ये अप्रत्यक्षरीत्या उपयोग होतो. ट्रॅव्हल अॅण्ड टुर्स, इव्हेंट मॅनेजमेंट, इन्शुरन्स या व्यवसायात असा परवाना असलेल्या पदवीधराला झुकते माप मिळते. याउलट, केवळ हा परवाना हातात नाही म्हणून संधी दवडलेल्यांचीही उदाहरणे आपल्याभोवताली बघायला मिळतील. ज्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशी जायचे आहे, जी.आर.ई., जी.मॅटसारख्या परीक्षा द्यायच्या आहेत, त्यांना परदेशी जाण्यासाठी आवश्यक त्या काही कागदपत्रांची तयारी करणे आवश्यक आहे. पासपोर्ट काढण्यासारखी कामे पदवी शिक्षण घेताना करून ठेवणे महत्त्वाचे ठरते. त्यासोबत अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माध्यमेही नीट हाताळता यायला हवीत. त्यासाठी आवश्यक ठरणाऱ्या मॅनरिझमची माहिती असायला हवी. उदा. आपला बायोडेटा पाठवताना मसुदा कसा लिहावा, नेमक्या आणि योग्य शब्दांचा वापर कसा करावा इत्यादी.
आज कुठल्याही क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला संगणकासंबंधीचे मूलभूत ज्ञान असणे अनिवार्य ठरते. नेमून दिलेले काम आपल्याला संगणकाच्या सहाय्याने करता येण्याची वा शिकता येण्याची क्षमता उमेदवारापाशी असायला हवी. संगणकातील आवश्यक प्रोग्राम्स हाताळता येणे, मग ते काम कदाचित वाणिज्य शाखेच्या पदवीधरांसाठी टॅली अकाउंटिंगचे असू शकते किंवा मानसशास्त्रज्ञ वा अर्थशास्त्र पदवीधरांसाठी एक्सेलमधील स्प्रेडशीटमधून माहितीचे विश्लेषण करण्याचे असू शकते. मुख्य म्हणजे कॉम्प्युटरमधील एखादा प्रोग्राम हाताळणे, त्याचा वापर करून काम करणे हे जमायला हवे.
पदवी शिक्षण पूर्ण होईपर्यंत तरुणाईचा पेहराव हा शक्यतो जीन्स-टीशर्ट असा असतो. अशा मुलांनी कुठल्या प्रसंगी कोणत्या पेहराव परिधान करायचा, हे समजून घ्यायला हवे. अनेक नोक ऱ्यांमध्ये पेहराव ही गोष्ट महत्त्वाची मानली जाते.
देहबोली ही आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे. आपले म्हणणे सांगतानाचा आविर्भाव, दुसऱ्याचे ऐकून घेतानाचा चेहरा, एखाद्याच्या म्हणण्यावर उमटणाऱ्या प्रतिक्रिया हे सारे कुठलेही काम करताना महत्त्वाचे ठरते.
पदवी शिक्षण घेत असताना ही सारी कौशल्ये संपादन करण्यावर भर द्यायला हवा. किमान पदवी प्राप्त केल्यानंतर पुढील शिक्षण घेताना या बाबतीत आपण किती प्रगती केली, हे जोखून पाहावे.
ज्ञानाचा प्रत्यक्ष वापर
माहिती, ज्ञान, शहाणपण या तीन टप्प्यांतून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण व्हावे अशी अपेक्षा असते. सगळ्यांचेच तिन्ही टप्पे पार पडतात, असे नव्हे. पण कोणत्याही टप्प्यापर्यंत पोचलेल्या पदवीधारकाने शिकलेल्या विषयाचा व्यवहाराशी संबंध जोडायला शिकणे महत्त्वाचे असते. शिक्षणाचा दैनंदिन जीवनाशी खूप निकटचा संबंध आहे. पण तसा विचारच मनात न रुजल्याने ‘पुस्तकी पदवीधर’ तयार होतो. प्रत्येक विषयाशी निगडित उपयोगाचे, महत्त्वाचे असे काहीतरी असतेच. ते आत्मसात करणे, वाढवणे हा पदवीनंतरचा पहिला टप्पा ठरतो.
हे सर्व विविध घटना, बातम्या, येणारे अनुभव यांच्या निरीक्षणांतून सहजशक्य असते. मात्र, सतत जागरूक राहून भोवतालच्या गोष्टी न्याहाळल्या तर त्या उलगडत जातात. ज्याला बी. एड्. करावेसे वाटते त्याला त्याचा पदवीचा विषय समजताना, शिकताना विद्यार्थी कुठे, का अडतात याचा विचार करता यायला हवा. त्याचा उपयोग तो शिक्षक बनेल, तेव्हा होऊ शकतो. पदव्युत्तर शिक्षण घ्यायचे मनात असेल तर मूळ विषयाचे विविध विद्याशाखांमध्ये रूपांतर कसे व का होत गेले आहे, हे समजणे गरजेचे ठरते.
गेल्या काही वर्षांत बहुतांश पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा सुरू झाली आहे. पदवीचा अभ्यास त्यासाठी पुरेसा ठरत नाही. संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित बहुपर्यायी प्रश्नपद्धती या परीक्षेत असते. त्यासाठी ज्ञानाचा प्रत्यक्ष वापर करण्याच्या पद्धतीचा वापर करावा.
प्रवेश परीक्षा, स्पर्धा परीक्षा यांचा नेमाने अभ्यास केल्याने विविध विषयांचे चौफेर ज्ञान वाढते. ज्यांना राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा द्यायच्या असतात, त्यांनी पदव्युत्तर शिक्षण जरूर पूर्ण करावे. पदवीच्या विषयाचा संदर्भ असलेले तांत्रिक कौशल्य वाढवण्यासाठीसुद्धा पदवी शिक्षणाच्या कालावधीचा उपयोग होऊ शकतो. उदा. भूगोल विषय घेऊन पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांने संगणकातील संबंधित कौशल्य प्राप्त केले तर तो पुढे जिओमॅपिंग क्षेत्रात प्रवेश करू शकतो. पदार्थविज्ञानशास्त्राचा पदवीधर अॅप्लाइड मेडिकल टेक्नॉलॉजी, ऑप्टोमेट्री इनस्ट्रमेंटेशन अशा विषयात पदव्युत्तर शिक्षण घेऊन उत्तम नोकरी मिळवू शकतो.
पदवीशिक्षणाशी फारकत घेऊन पुढे यशस्वी करिअर करणारेही अनेक असतात. मात्र, पदवी शिक्षणाचा आणि ते घेतानाच्या वर्षांचा उपयोग केला तर करिअरची दिशा निश्चित होते आणि त्यात वेगाने प्रगती करता येऊ शकते.
संग्रहित लेख, दिनांक 18th Nov 2013 रोजी प्रकाशित
पदवीनंतर काय?
पदवी शिक्षण घेताना त्याला पूरक असे क्रमिक अभ्यासापलीकडचे एखादे प्रशिक्षण पूर्ण केले तर करिअरला एक दिशा मिळू शकते.
First published on: 18-11-2013 at 07:41 IST
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Guidence for career after degree education