देशाच्या सीमांचे रक्षण करणे हे आपल्या सेनेचे प्रमुख काम. मात्र, त्यासोबत विकासात्मक आणि देशहिताच्या दृष्टीने मोलाची ठरणारी असंख्य कामे सैन्यदले निभावत असतात. कर्तव्याची परिसीमा गाठणाऱ्या सैन्यदलांच्या या मुलखावेगळ्या कामांचा हा परिचय-
से नेचं प्रमुख काम म्हणजे सीमांचं रक्षण करणं. सीमेवर गस्त घालणारी, घुसखोरी रोखणारी, दहशतवादाचा बीमोड करणारी ही माणसं. म्हणूनच सैन्यदले म्हटली की डोळ्यांसमोर येतात, शस्त्रास्त्रे, रणगाडे, बंदुका, रॉकेट्स, चकमकी, हल्ले-प्रतिहल्ले! मात्र, हेच निधडय़ा छातीचे शूरवीर उत्तराखंडसारख्या आपत्तीच्या वेळेस नागरिकांचे रक्षणकर्ते बनतात. अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवणे, रस्ते-पूल दुरुस्ती, स्थानिकांचे पुनर्वसन अशी अनेक कामे ते हाती घेऊन निभावतात.
अशा अस्मानी संकटाबरोबर जी सुल्तानी संकटे देशावर कोसळतात- मग ते दंगे असोत, दहशतवादी हल्ले असो, समुद्रीचाच्यांनी ओलीस ठेवलेल्या व्यक्तींची सुटका असो.. अशा विविध आपत्कालीन परिस्थितीत कधी फायटिंग फोर्स तर कशी पीसकीपिंग फोर्स म्हणून देश-परदेशात आपली सेना महत्त्वाची भूमिका बजावताना दिसते.
लेह, लडाख, काश्मीरसह ईशान्य भारताच्या सीमावर्ती भागात दहशतवाद्यांचा सामना करण्यासोबत तिथल्या लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी ‘ऑपरेशन सद्भावना’सारख्या असंख्य योजना आपली सेना गेली कित्येक वर्षे राबवीत आहे. त्या भागात तैनात असलेल्या ब्रिगेड वा डिव्हिजनवर ही जबाबदारी असते. स्वयंपूर्ण युनिट, डॉक्टर, अभियंता, मेकॅनिक्स, तंत्रज्ञ, सुतार, लोहार, वाहन चालक यांसारखे कुशल कामगार त्यांच्यासोबत असतात. रस्ते, पूल बांधणं, शाळा बांधणं- चालवणं, संपर्क यंत्रणा प्रस्थापित करणं, पाणीपुरवठा योजना, हीटिंग सिस्टिम्स पुरवणं, व्यावसायिक प्रशिक्षण देणं, औषधपाण्याची सुविधा, आरोग्याची निगा, तिथल्या मुलांना, युवापिढीला देशाच्या अन्य भागाचे दर्शन घडवून मैत्रीचा पूल बांधणं अशा कितीतरी कामांचा यात समावेश असतो. आज नागालँडमध्ये नांदणारी शांतता हे या प्रयत्नांचंच उत्तम उदाहरण आहे. लेहला असलेल्या सेनेच्या रुग्णालयाचा लाभ स्थानिकांना मिळतो. कित्येकदा अत्यवस्थ रुग्णांना चॉपरने उचलून तिथे आणले जाते. काश्मीर खोऱ्यातील गावागावांत सुरू केलेली व्यवसाय प्रशिक्षण केंद्रे, रस्ता बांधणीची कामे जवानांच्या असीम प्रयत्नांचीच साक्ष देतात.
सेनेची ही अधिकची जबाबदारी उचलण्याची परंपरा आधीपासूनची. १९७१ च्या रणसंग्रामात पश्चिम सीमेवर आपण पाकचा जो भाग जिंकला, तिथे भारतीय सेनेने दीड-दोन वर्षे मुक्काम केला. तिथल्या शाळा दुरुस्त करणं, मशिदींची रंगसफेदी करणं अशी असंख्य कामे भारतीय सेनेने केली. पूर्वेला बांगलादेश मुक्तिसंग्रामात सहभागी होऊन बांगलादेश निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावली. तो देश मुक्त झाल्यावर सेना माघारी फिरली, मात्र प्रशासनाचा गाडा सुरळीत चालावा, यासाठी तिथल्या प्रशासनाने आपल्या अनेक अधिकाऱ्यांना तिथे सन्मानाने काही काळ थांबवले.
सैन्यदलाचं आणखी एक महत्त्वाचं काम म्हणजे मॅन मेकिंग. एनडीए, आयएमए, ओटीएसारख्या प्रशिक्षण संस्थांमध्ये खडतर प्रशिक्षणात सैनिकांचे शारीरिक, मानसिक बळ दुणावते. सैन्यातील विविध पदभार स्वीकारलेला- डॉक्टर, इंजिनीअर, पुजारी, खानसामा असा कुणीही सर्वप्रथम सैनिक असतो. अशा पदांद्वारे सेनेत थेट प्रवेश करणाऱ्यांसाठी प्रशिक्षण केंद्रेही सेनाच चालवते.
सेना स्वत: किंवा इतर संस्थांच्या सहकार्याने विविध प्रकारचे संशोधन प्रकल्प हातात घेते. संरक्षण सामग्रीची निर्मिती- अगदी स्क्रू, बुलेटपासून रणगाडे, विमान, अग्निबाणांची निर्मिती, सुधारणा, देखभाल यामध्येही सेनेचं मोठं मनुष्यबळ गुंतलेलं असतं.
अशा प्रशिक्षणातून आणि समृद्ध अनुभवातून घडलेल्या फौजीला निवृत्तीपूर्वी क्षमता आणि रुचीनुसार प्रशिक्षण घ्यायचं असेल तर त्याला भरपगारी रजा मिळते. निवृत्तीनंतर काहीजण नोकरी स्वीकारतात, तर काही स्वत:चे उद्योग, स्वयंसेवी संस्था सुरू करतात. पर्यावरण रक्षण, गिर्यारोहण, लष्करप्रवेश, स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीसाठी प्रशिक्षण केंद्र, अपंगांच्या पुनर्वसनाचे काम अशी विविध क्षेत्रे त्यांना खुली होतात. अंतराळ मोहिमा (राकेश शर्मा, हवाई दल), शिडाच्या होडीतून विश्वसागर परिक्रमा (दिलीप दोंदे, अभिलाष टॉमी, नौदल), रायफल शूटिंग (ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवणारे कर्नल राठोड, भूदल) याशिवाय अंटाक्र्टिक मोहीम, महत्त्वाच्या गिर्यारोहण मोहिमा, नद्यांची परिक्रमा यात संरक्षण दलातील व्यक्तींचा सहभाग खूप मोठा आहे.
सेना दलात माणुसकी आणि नाती जिवापाड जपली जातात. खासगी क्षेत्रातील ‘हायर अॅण्ड फायर’च्या तत्त्वांचा इथे लवलेश नसतो. या पेशात अपघात, मृत्यूचं प्रमाण लक्षणीय असल्यामुळे साऱ्यांना सेना आर्थिक, मानसिक बळ पुरवते. आर्थिक, वैद्यकीय मदत, पुनर्वसनाची जबाबदारी स्वीकारते. स्वेच्छानिवृत्ती स्वीकारणारे अशा तऱ्हेने स्थिरावतात की, ते इतरांचे आदर्श बनतात. सैन्यातील ज्या कर्मचाऱ्यांची घरे दुर्गम परिसरात आहेत, त्यांना कायमस्वरूपी घर-वसाहत सेना उभारते. निवृत्तीनंतर तिथे कुणी व्यवसाय उभारतात, कुणी स्वत:चा व्यवसाय करतात. कुणी वर्कशॉपमध्ये काम करतात. अपघात वा मृत्यू – तो कुणालाच टाळता येत नाही. ते ज्या कारणाने येतं ते महत्त्वाचं असतं. आसपास काळजी घेणारी माणसं असतील तर सोसण्याचं बळ वाढतं.
शहिदांचे आई-बाबा, पत्नी, मुलं यांना सेना कधीही अंतर देत नाही. त्या शहिदाचं युनिट आणि कुटुंब यांचं खास नातं असतं. सैनिक कल्याण केंद्रासारखं स्वतंत्र खातं त्यांची काळजी घेण्यासाठी कार्यरत असतं. दरवर्षी रेझिंग डेला आवर्जून निमंत्रण येतं. अपडेट्स कळवले जातात. माझा मुलगा कॅप्टन विनायक गोरे याला शहीद होऊन १८ वर्षे होतील. मात्र, आजही सैन्यदलाकडून मला समारंभाचे आमंत्रण नियमाने मिळते. युनिटमधल्या सहकाऱ्यांचे, कोर्समेटचे फोन येतात. मुंबईत आल्यावर आवर्जून ते संपर्क करतात. जमल्यास घरी येतात. त्यांना भेटून विनू भेटल्याचा प्रयत्य येतो.
खरे तर ते सीमेवर असतात, म्हणून आपण इथे निर्धास्तपणे जगतो, जगण्याचा आनंद लुटतो. अशा वेळी सेनेतील व्यक्तींबद्दल कृतज्ञता बाळगावी, म्हणून हा लेखप्रपंच. यानिमित्ताने काही प्रश्न आपण स्वत:ला विचारूयात-
० कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपण त्यांच्या कामात सहभागी होऊ शकतो का? असा विचार आपल्यापैकी कितीजणांच्या मनात डोकावतो?
० आपल्या घरातील मुलामुलींना सैन्यात दाखल करण्यास आपण तयार आहोत का?
० किमान १९४७ ते आजपर्यंतच्या युद्धकथा आणि त्यातील वीरांच्या शौर्यकथा मुलांना सांगतो का?
० सैनिक कल्याण निधीला नियमितपणे किमान काही रक्कम देऊ शकतो का?
० एखादी वस्तू केवळ स्वस्त आहे, मग ती चिनी बनावटीची असो वा पाकची, आपण खरेदी करतो का?
० बरेचदा इथलाच पैसा हवालामार्फत परदेशात अतिरेकी कारवायांसाठी पुरवला जातो, हे समजल्यावर आपण काय करतो? नुकत्याच मॅचफिक्सिंग प्रकरणात इथल्या बुकींचा संबंध थेट दुबई वा पाकशी अथवा बॉम्बस्फोटाच्या सूत्रधाराशी असतो, हे उघडकीला आल्यानंतर आपण असे सामने बघण्यापासून स्वत:ला परावृत्त करू शकतो का?
० एखादी मोठी ट्रंक घेऊन युनिफॉर्ममधला सैनिक रेल्वे फलाटावर दिसला तर तो कोठून आला असेल, कधी निघाला असेल, त्याला त्याच्या गावी पोहोचायला किती वेळ लागेल, हा विचार करून एखादा चहाचा कप त्याला ऑफर करू शकू का?
० प्रार्थना करताना दोन शब्द त्यांच्यासाठी म्हणू शकतो का?
ही यादी आणखीही बरीच वाढू शकते, पण तूर्तास थांबते..