मोफत अभियांत्रिकी शिक्षण, शिवाय निवास, भोजन , पुस्तकेही मोफत व शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मानाची आणि दीड लाख रुपये महिना पगाराची नोकरी निश्चित देऊ शकणारे महाविद्यालय भारतात आहे यावर कदाचित विश्वास बसणार नाही.
बारावीनंतर अभियांत्रिकी शाखेकडे विद्यार्थ्यांचा वाढता ओढा आहे. मात्र यासाठी भरमसाठ फी देऊनही हव्या त्या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळेल का नाही याची चिंता विद्यार्थी आणि पालकांना सातत्याने भेडसावत असते. आणि त्यानंतरही चांगली नोकरी मिळेल का याचीही काळजी सतावत असते. या सगळ्या पार्श्वभूमीवर मोफत अभियांत्रिकी शिक्षण, शिवाय निवास, भोजन, पुस्तकेही मोफत व शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मानाची आणि दीड लाख रुपये महिना पगाराची नोकरी निश्चित देऊ शकणारे महाविद्यालय भारतात आहे यावर कदाचित विश्वास बसणार नाही. भारतीय भूदलामध्ये लागणारे अभियंते घडवण्यासाठी सैन्यदलांमार्फत हे महाविद्यालय चालवले जाते. या महाविद्यालयाचे नाव आहे कॉलेज ऑफ मिलीटरी इंजिनीअरिंग. पुणे, महू ( मध्यप्रदेश) आणि सिकंदराबाद या तीन ठिकाणी ही महाविद्यालये आहेत.
एकूण कोर्स चार वर्षांचा असून पहिली तीन वर्षे पुणे / महू किंवा सिकंदराबाद येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात मूलभूत लष्करी प्रशिक्षण व अभियांत्रिकी शिक्षण दिले जाते. त्यानंतर चौथ्या वर्षी इंडियन मिलिटरी अॅकेडमी, डेहराडून येथे मूलभूत लष्करी प्रशिक्षण व अभियांत्रिकी शिक्षण दिले जाते. या चौथ्या वर्षी विद्यार्थ्यांना ५६,१०० रुपये महिना एवढे विद्यावेतन दिले जाते. चार वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना भूदलात लेफ्टनंट म्हणून सामावून घेतले जाते. त्यांना लेफ्टनंट म्हणून सुरुवातीचा पगार दीड लाख रुपये महिना मिळेल. या महाविद्यालयात प्रवेशासाठी जाहीरात प्रसिध्द झाली आहे. www. joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावरून ऑनलाइन पध्दतीने १२ जूनपर्यंत अर्ज करता येतील.ज्या विद्यार्थ्यांची जन्मतारीख २ जुलै २००६ आणि १ जुलै २००९ या दरम्यान आहे असे विद्यार्थी ( फक्त मुले ) यासाठी अर्ज करू शकतील.
ज्या विद्यार्थ्यांना बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत फिजिक्स केमिस्ट्री व मॅथेमॅटिक्स या तीन विषयात मिळून किमान ६० गुण असतील ते हा अर्ज भरू शकतील. आलेल्या सर्व अर्जांची छाननी करून जेईई मेन्सच्या मार्कांच्या आधारावर राष्ट्रीय पातळीवर गुणवत्ता यादी तयार केली जाईल यासाठीचे कट ऑफ मार्क जुलै च्या पहिल्या आठवड्यात जाहीर केले जातील. निवडलेल्या विद्यार्थ्यांना ऑगस्ट / सप्टेंबर २०२५ मध्ये मुलाखतीसाठी बोलावले जाते.
या महाविद्यालयातील प्रवेशासाठी मुलाखत, ज्याला SSB interview म्हणतात , हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. ही मुलाखत प्रदीर्घ म्हणजे पाच दिवसांची असते , त्यात दोन टप्पे असतात. पहिल्या टप्प्यामध्ये विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता चाचणी आणि मानसिक चाचणी होते, यातून निवडलेल्या विद्यार्थ्यांनाच दुसऱ्या टप्प्यातील चाचणीमध्ये प्रवेश मिळतो. यामध्ये वैयक्तिक आणि ग्रुप टास्क च्या परीक्षा होतात, यात शेवटी वैयक्तिक मुलाखत होऊन फायनल निवड यादी जाहीर होते. SSB मुलाखतीत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीचा आढावा घेतला जातो. यात यशस्वी होण्यासाठी प्रामुख्याने इंग्रजी भाषेवर व संभाषणावर प्रभुत्व मिळवणे, सामान्यज्ञान वाढवणे, आत्मविश्वासपूर्वक वागणे, बोलणे आवश्यक असते.
या मुलाखतीतून तावून सुलाखून निघालेल्या विद्यार्थ्यांची वैद्याकीय तपासणी केली जाते. पळणे, जोर, बैठका, पोहणे यासंबंधी विद्यार्थ्यांची बेसिक क्षमता काय अपेक्षित आहे याचा खुलासा संकेतस्थळावरील जाहिरातीमध्ये आहे तो विद्यार्थ्यांनी बघून घेणे आवश्यक आहे. मेडिकलनंतर निवडलेल्या विद्यार्थ्यांना या महाविद्यालयांत प्रवेश दिला जातो. कोर्स १ जानेवारी २०२६ ला सुरू होईल.
विनामूल्य शिक्षण, उत्तम पगाराची व सोयीसुविधांची नोकरी आणि त्याचबरोबरीने देशसेवेची उत्तम संधी मिळवून देणार्या या पर्यायाचा विद्यार्थ्यांनी जरुर विचार करावा. अशाच प्रकारची संधी भारतीय नौदलादेखील आहे, त्याविषयी आपण पुढील भागात जाणून घेऊ. (पूर्वार्ध)
vkvelankar@gmail.com