या लेखात आपण यूपीएससी मुख्य परीक्षेतील ‘जीएस ४’ या पेपरबाबत जाणून घेणार आहोत. २०१३ पासून यूपीएससीने नीतिशास्त्र म्हणजेच ‘जीएस ४’ हा पेपर मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केला. यूपीएससीद्वारे निवडले जाणारे भावी प्रशासकीय अधिकारी हे नैतिकदृष्ट्या समृद्ध असणे आयोगाला अपेक्षित आहे.

उमेदवाराचे व्यक्तिमत्त्व जाणून घेण्याच्या उद्देशाने ‘जीएस ४’ या पेपरचा अभ्यासक्रम आयोगाने ठरवला असून त्यानुसारच प्रश्न विचारले जातात.

या पेपरबद्दल आयोगाचे स्पष्टीकरण :

या अंतर्गत समाविष्ट असलेले प्रमुख विषय म्हणजे नीतिशास्त्र, सचोटी आणि योग्यता. या पेपरमध्ये उमेदवारांची सचोटी, सार्वजनिक जीवनातील समंजसपणा आणि समाजाशी व्यवहार करताना त्याला सामोरे जाव्या लागणाऱ्या विविध समस्या आणि संघर्षाबाबतच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टिकोनाशी संबंधित समस्यांबाबत उमेदवारांची वृत्ती आणि दृष्टिकोन तपासण्यासाठीच्या प्रश्नांचा समावेश असेल. यावरील प्रश्नांमध्ये पैलू निश्चित करण्यासाठी घटना अभ्यास (केस स्टडी) याचा वापर केला जाईल. पुढील स्थूल क्षेत्रांचा समावेश केला जाईल.

आयोगाद्वारे दिलेला अभ्यासक्रम

नीतिशास्त्र आणि मानवी परस्पराभिमुखताः मानवतेच्या नीतिमत्तेचे सार, निर्धारक आणि परिणाम. नैतिकतेचे परिमाण, नीतिशास्त्र: खाजगी आणि सार्वजनिक संबंधांमधील, मानवी मूल्ये, महान नेते, सुधारक व प्रशासक यांचे जीवन आणि शिकवण यांपासून धडे, मूल्ये रुजविण्यासाठी कुटुंब, समाज व शैक्षणिक संस्था यांच्या भूमिका.

नोट- इथे आयोगाने नेते, सुधारक व प्रशासक यांची नावे दिलेली नाहीत. परंतु गतवर्षीच्या प्रश्नांवरून आपण नेमका कुणाचा अभ्यास करावा याचा अंदाज बांधता येतो. उदा. गांधीजींबाबत त्यांनी सांगितलेली ‘सात सामाजिक पापे’, त्यांची सुभाषिते यावर आयोगाने प्रश्न विचारले आहेत.

अभिवृत्तीः घटक, संरचना, कार्य; त्याचा प्रभाव आणि विचार व वर्तन यांच्याशी संबंध. नैतिक आणि राजकीय अभिवृत्ती, सामाजिक परिणाम व पाठपुरावा.

नागरी सेवेसाठी अभियोग्यता आणि मूलभूत मूल्ये: सचोटी, निःपक्षपातीपणा आणि पक्षीय निरपेक्षता, वस्तुनिष्ठता, सार्वजनिक सेवेसाठी समर्पण, सहानुभूती, सहिष्णुता आणि दुर्बल घटकांप्रती सहानुभूती.

भावनिक बुद्ध्यांक – संकल्पना आणि त्याची उपयोगीता, प्रशासन आणि कारभारामध्ये त्यांची उपयुक्तता आणि उपयोजन.

भारत आणि जगातील नैतिक विचारवंतांचे आणि तत्त्वज्ञांचे योगदान.

नोट- इथेही आयोगाने भारत आणि जगातील नैतिक विचारवंतांची नावे दिलेली नाहीत. गतवर्षीच्या प्रश्नांवरून आपणास अभ्यासाची दिशा मिळते. २०२४ च्या मुख्य परीक्षेतील पुढील ३ सुभाषिते बघा.

प्र. खाली महान विचारवंतांचे तीन उद्धरण दिले आहेत. सध्याच्या संदर्भात या प्रत्येक उद्धरणातून तुम्हाला काय कळते?

१. “इतरांकडून जे काही चांगले आहे ते शिका, पण ते आत्मसात करा आणि तुमच्या स्वतःच्या पद्धतीने ते आत्मसात करा, इतर बनू नका.” – स्वामी विवेकानंद

२. “शक्तीअभावी श्रद्धा निरर्थक आहे. कोणतेही महान कार्य साध्य करण्यासाठी श्रद्धा आणि ताकद दोन्ही आवश्यक आहेत.” – सरदार पटेल

३. “कायद्याच्या दृष्टीने, जेव्हा एखादा माणूस इतरांच्या हक्कांचे उल्लंघन करतो तेव्हा तो दोषी असतो. नीतिमत्तेच्या दृष्टीने, जर तो असे करण्याचा विचार करतो तर तो दोषी असतो.” – इमॅन्युएल कांट

लोक प्रशासनातील सार्वजनिक / नागरी सेवा मूल्ये आणि नैतिकताः स्थिती व समस्या, सरकारी व खासगी संस्थांमधील नैतिक चिंता आणि कोंडी; नैतिक मार्गदर्शनाचे स्रोत म्हणून कायदे नियम, विनियम व सद्सद् विवेकबुद्धी, उत्तरदायित्व आणि नैतिक शासन; शासनामध्ये नैतिकता आणि नैतिक मूल्यांचे बळकटीकरण; आंतरराष्ट्रीय संबंध आणि निधीकरणामधील नैतिक समस्या; निगम प्रशासन.

प्रशासनातील सभ्यताः लोकसेवेची संकल्पना; प्रशासन व सभ्यता यांचा तत्वज्ञानात्मक आधार, माहितीची देवाण-घेवाण आणि सरकारमधील पारदर्शकता, माहितीचा अधिकार, नीतिसंहिता, आचारसंहिता, नागरिकांची सनद, कार्यसंस्कृती, सेवाप्रदानाचा दर्जा, सार्वजनिक निधीचा विनियोग, भ्रष्टाचाराची आव्हाने.

वर दिलेल्या अभ्यासक्रमावर १० गुणांचे १३ प्रश्न विचारले जातात. ज्यांची उत्तरे प्रत्येकी १५० शब्दांत लिहिणे आवश्यक आहे.

वरील अभ्यासक्रमावरील घटना अभ्यास (केस स्टडी): यात २० गुणांच्या ६ केस स्टडी विचारल्या जातात, ज्यांची उत्तरे प्रत्येकी २५० शब्दांत लिहिणे आवश्यक असते. २०२४ च्या मुख्य परीक्षेत विचारलेली खालील केस स्टडी बघा –

प्र. यावर्षी उन्हाळा अत्यंत तीव्र असल्याने, जिल्ह्यात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. जिल्हा पिण्याच्या पाण्याच्या तीव्र संकटात अडकू नये म्हणून जिल्हाधिकारी त्यांच्या अधीनस्थ अधिकाऱ्यांना उर्वरित पाणीसाठ्याचे संवर्धन करण्यासाठी एकत्रित करत आहेत. पाणी वाचवण्यासाठी जागरूकता मोहिमेसोबतच भूजलाचा अतिरेकी उपसा थांबवण्यासाठी कडक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. गावांमध्ये दौरे करण्यासाठी आणि खोल बोअरवेल किंवा नदीच्या जलाशयातून सिंचनासाठी पाणी घेणाऱ्या शेतकऱ्यांना शोधण्यासाठी दक्षता पथके तैनात करण्यात आली आहेत. अशा कृतीमुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. शेतकऱ्यांचे एक शिष्टमंडळ त्यांच्या समस्या घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना भेटले आणि तक्रार केली की त्यांना त्यांच्या पिकांना सिंचनाची परवानगी दिली जात नसली तरी, नदीजवळील मोठे उद्योग त्यांच्या औद्योगिक प्रक्रियेसाठी खोल बोअरवेलमधून मोठ्या प्रमाणात पाणी घेत आहेत. शेतकऱ्यांचा आरोप आहे की त्यांचे प्रशासन शेतकरीविरोधी आणि भ्रष्ट आहे, त्यांना उद्योगांकडून लाच दिली जात आहे. शेतकऱ्यांनी दीर्घकाळ आंदोलन करण्याची धमकी दिल्याने त्यांना शांत करणे आवश्यक आहे. त्याच वेळी, उद्योग बंद करता येणार नाही कारण यामुळे मोठ्या संख्येने कामगार बेरोजगार होतील.

(अ) जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हा दंडाधिकारी म्हणून उपलब्ध असलेल्या सर्व पर्यायांवर चर्चा करा.

(ब) भागधारकांच्या परस्पर सुसंगत हितसंबंधांना लक्षात घेऊन कोणती योग्य कारवाई करता येईल?

(क) जिल्हाधिकाऱ्यांसाठी संभाव्य प्रशासकीय आणि नैतिक दुविधा काय आहेत?

संदर्भ साहित्य :

स्पॉटलाईट नोट्स.

लेक्सिकन.

२ रा प्रशासकीय सुधारणा आयोग अहवाल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

sushilbari10@gmail.com