संकेत पै
‘मी प्रयत्नांची पराकाष्ठा केली… मी आत्मविश्वासाच्या बळावर यश खेचून आणलं,’ वगैरे आत्मस्तुतीपर बोल आपण अनेकदा ऐकतो. पण खरोखर एखादी व्यक्ती केवळ स्वत:च्या जिवावर कायम यश मिळवू शकेल का? कधी प्रयत्न कमी पडतात, कधी आत्मविश्वास डळमळतो… मग काय करायचं? अशा बिकट वाटेवर कुणी तरी दुसऱ्यानं आपल्यावर दाखवलेला दृढविश्वास प्रोत्साहन देतो. त्या वेळी कुटुंब आपला आधार बनू शकतं. आपल्या माणसांचं ‘असणं’ गरजेचं असतं, मात्र त्यासाठी ती नाती जोपासणं महत्त्वाचं.

विक्रांतनं पायांत शूज चढवले आणि सकाळच्या थंड हवेत तो बाहेर पडला. दृढनिश्चयाची एक लहर त्याच्या धमन्यांतून दौडत गेली! तो रविवार त्याच्यासाठी खास होता. डोंगरातल्या पायवाटेवरून धावत ‘हाफ मॅरेथॉन’ पूर्ण करण्यापुरता तो मर्यादित नव्हता… तर स्वत:च्या सीमा विस्तारत नेऊन अडथळ्यांवर मात करत जाणं, जीवनात नवी उंची गाठणं, अशा ध्येयानं झपाटलेला तो दिवस होता.

तोपर्यंत धावपटू विक्रांतनं फार खडतर मार्गावरून प्रवास केला होता. अंत पाहणारे अनेक अडथळे सामोरे येऊन गेले होते. आजारपण, पालकत्वाच्या जबाबदाऱ्या, या सर्व प्रवासात विक्रांतच्या आयुष्यात अशा काही घटना घडल्या होत्या, की ध्येयापर्यंत पोहोचण्याच्या आपल्या क्षमतेविषयीच त्याच्या मनात शंका निर्माण होऊ लागली होती. विक्रांत परदेशात राहात असे आणि ज्या वळणवाटांवर त्यानं धावण्याचं प्रशिक्षण घेतलं होतं, सराव केला होता, त्या अचानक बर्फानं आच्छादल्या जात. मग विक्रांतची परिस्थिती बिकट व्हायची.

हेही वाचा : सांदीत सापडलेले… : खरी परीक्षा!

एके दिवशी असाच मनासारखा सराव न झाल्यानं तो उदास झाला होता. तेव्हा त्याच्या पत्नीनं त्याला समोर बसवून यापूर्वी त्यानं कशी प्रगती साधली होती, याची आठवण करून दिली. ‘काहीही झालं तरी मी नेहमी तुझ्या पाठीशी उभी राहीन,’ अशा शब्दांत तिनं त्याला आश्वस्त केलं. तिनं दाखवलेल्या या विश्वासामुळे त्याच्या मनात प्रेरणा आणि दृढनिश्चय पुन्हा जागृत झाला. त्याच्या मित्रमंडळींनी त्यांना त्यांच्या मुलीच्या संगोपनात लागेल तशी मदत करण्याची तयारी दाखवली. तसंच ऑफिसमधल्या सहकाऱ्यांनी विक्रांतच्या कामाचा भार वाटून घेतला. या सगळ्यामुळे त्याला प्रशिक्षणास प्राधान्य देता आलं.

मॅरेथॉनला फक्त तीन दिवस राहिले आणि अचानक खराब हवामानामुळे आयोजकांना स्पर्धेचा मार्गच बदलावा लागला. मग विक्रांत आणखीनच घाबरला. जी वाट त्याला कधी ठाऊकच नव्हती, त्यावर आता एकदम चालायचं… नव्हे धावायचं होतं. स्पर्धेचा दिवस उजाडला. प्रतिकूल हवामान, धावण्याचा बदललेला मार्ग- ज्यावर वास्तविक थोडा तरी सराव करणं गरजेचं होतं, अशी सर्व आव्हानं समोर होती. पण जवळची माणसं पाठीशी उभी राहिली होती. बुलंद आत्मविश्वासाच्या जोरावर विक्रांत प्रयत्नपूर्वक पुढे जात राहिला आणि त्यानं अंतिम रेषा पार केली. गंमत अशी, की त्यानं स्वत:चाच विक्रम पाच मिनिटांनी मोडला.

विक्रांतच्या या अनुभवावरून आपण काय शिकायला हवं? त्याचा प्रवास धावण्याच्या शर्यतीपुरता किंवा काही ध्येय निश्चित करण्यापुरता मर्यादित नाहीये. त्याला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या लोकांची त्यानंही कदर करणं हा या गोष्टीतला गाभा आहे. यश कधी एकट्यानं मिळवता येत नाही. आपल्या माणसांच्या आधाराचा अदृश्य हात पाठीमागे नक्कीच असतो. मग ती कुणीही व्यक्ती असो… मार्गदर्शन करणारे गुरू, प्रेरणेचं स्फुल्लिंग चेतवणारे शिक्षक, आपला आनंद साजरा करणारा मित्र, आपल्यातले चांगले गुण हेरणारा आणि ते लक्षात ठेवणारा सहकारी, नेहमी साथ देणारा जोडीदार किंवा प्रोत्साहन देणारी कोणीही व्यक्ती… आपल्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक आयुष्यात या सर्व भूमिकांमधल्या व्यक्तींचं योगदान अमूल्य असतं.

हेही वाचा : स्वतंत्र संसार थाटण्याचा निर्णय : समंजस की असमंजस?

‘आत्मविश्वास हीच यशाची आधारशीला आहे,’ असं एक वचन आहे. त्याच्या थोडं विरुद्ध जाऊन मी म्हणतो, की आपल्या जीवनात अशी एखादी व्यक्ती हवी, जिचा आपल्यावर आपल्याहीपेक्षा जास्त विश्वास असेल. म्हणजे आत्मविश्वास हवाच, पण प्रतिकूल परिस्थितीत तो डळमळीत होऊ शकतो, स्वत:बद्दल शंका निर्माण होऊ शकते… अशी काही आव्हानात्मक परिस्थिती आली, तर आपल्या क्षमतेवर अढळ विश्वास असणारी व्यक्ती एक प्रोत्साहन देणारा ऊर्जास्राोतच ठरते.

‘८३’ हा १९८३ च्या विश्वचषक क्रिकेट सामन्यावर आधारित चित्रपट प्रसिद्ध आहे. यातलं एक दृश्य अगदी पाहावं असंच. अपयशाच्या मालिकेनं निराश झालेला भारतीय संघ बसमध्ये आहे, तर बाहेर वेस्ट इंडीजच्या संघाचे समर्थक जल्लोष करताहेत. या निराशाजनक वातावरणात त्यांना एक मुलगा त्याच्या वडिलांबरोबर उभा दिसतो. भारतीय संघाच्या समर्थनार्थ तो तिरंगा फडकवतोय! सिनेमांमध्ये नाट्याचा भाग असतोच, पण तरी या प्रसंगात मला जे सांगायचंय ते दिसतं. त्या क्षणी तो मुलगा भारतीय संघाला प्रोत्साहन देणारा जणू दीपस्तंभ ठरला. जेव्हा आपल्या संघाला स्वत:च्या क्षमतेवर विश्वास ठेवणं कठीण जात होतं, तेव्हा तिरंगा फडकवणारा तो मुलगा मात्र त्यांच्यावर विश्वास दाखवत होता.

आता सिनेमातलं हे दृश्य तुमच्या आयुष्यात कोणत्या तरी संदर्भात घडतंय अशी कल्पना करून पाहा. तुमच्यापुढे खडतर आव्हानं आहेत. तुमचं स्वत:च्या नजरेतलं स्थान डळमळीत झालंय. अशा वेळी तुम्ही नकारात्मक विचार करू लागलात, की मार्ग सापडणं अवघड होऊन बसतं. मग चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता वाढते. तसं झाल्यास आधीच असलेल्या तणावात भर पडते. या प्रसंगी तुमच्या जवळची, तुमच्यावर तुमच्याहून अधिक, दृढ विश्वास असणारी व्यक्ती अधोगतीकडे जाण्यापासून वाचवू शकते.

हेही वाचा : ‘ती’च्या भोवती..! हिमालयाएवढी खंबीर!

‘हाऊ विल यू मेजर युअर लाईफ?’ या पुस्तकाचे लेखक क्लेटन क्रिस्टेन्सन एक मूलगामी दृष्टिकोन मांडतात. सामान्यत: आढळून येणारी एक गोष्ट ते अधोरेखित करतात, ती म्हणजे व्यावसायिक यशाच्या मागे धावताना नकळत आपल्याकडून कौटुंबिक नातेसंबंध जोपासणं मागे पडतं. मग आपल्या कुटुंबाला जरी आपल्याला पाठिंबा देण्याची इच्छा असली, तरी त्यांच्याकडे बऱ्याचदा आपलंच दुर्लक्ष होतं. ध्येयपूर्तीला आपण प्राधान्य का देतो? कारण म्हणजे आपल्या व्यावसायिक यशाला संबंधित व्यक्तींकडून तत्काळ मान्यता मिळते. आपण पुढे जात असल्याचा तो पुरावा असतो. त्यामुळे मग जेव्हा केव्हा आपल्याला मोकळा वेळ मिळतो किंवा सर्व काम झाल्यावर आपल्या अंगी कणभर जरी अधिक ऊर्जा राहिली, तरी आपण लगेच ती याकामी लावतो. अधिक व्यावसायिक यश मिळवण्याचा प्रयत्न करत राहतो. जोडीदाराशी आणि मुलांशी असलेलं नातं अधिक घट्ट करण्यासाठी दिलेला वेळ आणि ऊर्जेतून मात्र आपण काहीतरी प्राप्त केल्याची भावना लगेच येत नाही. त्यामुळेच मग आपलं दुर्लक्ष झालं तरी नाती असतीलच, असं आपण गृहीत धरतो. नात्यांचं महत्त्व तितक्या गांभीर्यानं घेत नाही.

आपलं कुटुंब नेहमी आपल्या पाठीशी असेल, हे गृहीत धरून अगदी टोकाचा उशीर होईपर्यंत त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं, ही कधीही दुरुस्त न होऊ शकणारी चूक आहे! क्रिस्टेन्सन सांगतात, की जीवनात कितीही काहीही मिळवायचं असेल, तरी आपल्या कुटुंबाची कदर करायला हवी. त्यांचं आपल्याबरोबर असणं शक्य होईल तेव्हा साजरं करायला हवं. इतरांकडून मिळणारी मान्यता आणि दृश्य स्वरूपातलं यश, या शोधात नकळत आपल्या कुटुंबाकडून मिळणाऱ्या अनमोल आधाराकडे दुर्लक्ष करणं काही खरं नव्हे!

कुटुंबाचं ‘असणं’ साजरं करायचं म्हणजे काय?… म्हणजे उगाच काही तरी भव्य समारंभ करणं, आपल्या प्रेमाचं सारखं प्रकटीकरण करणं नव्हे! इथे ‘साजरं करणं’ म्हणजे एकत्र घालवलेल्या क्षणांची मजा घेणं. मग ते एकत्र बसून जेवणं असो, एकमेकांत होणारे अर्थगर्भ संवाद असोत किंवा जीवनाच्या चढउतारांत एकमेकांना सोबत करणं असो…

हेही वाचा : माझी मैत्रीण : समंजस मैत्री

जेव्हा मी कॉर्पोरेटमधलं करिअर सोडून ‘लाईफ कोच’ झालो, त्या प्रक्रियेदरम्यान मला स्वत:ला कौटुंबिक नातेसंबंध जोपासण्याचं महत्त्व पटलं. माझ्या व्यावसायिक ध्येयांमुळे कौटुंबिक नातेसंबंधांना बाधा येऊ नये यासाठी कोणतीही तडजोड न करता काही मर्यादा घालून घेणं किती गरजेचं होतं हे माझ्या लक्षात आलं. हा समतोल साधणं सहजसोपं नसतं. व्यावसायिक ध्येयाकडे वाटचाल करायचीच आहे, पण कुटुंबाबरोबरचे क्षणही आनंदानं अनुभवायचे आहेत, याची मला स्वत:ला जागरूक राहून आठवण करून द्यावी लागत असे. हे नातेसंबंध जोपासताना मला एक असा कायमस्वरूपी ऊर्जास्राोत गवसलाय, जो मला भक्कम आधार, चिकाटी आणि प्रेरणा देत राहतो. त्यामुळे माझ्या आयुष्याची गुणवत्ता अनेकप्रकारे वाढली. कौटुंबिक नातेसंबंधांना प्राधान्य दिल्यानं व्यावसायिक ध्येयांकडे दुर्लक्ष होत नाही, उलट ते त्यासाठी पोषकच ठरतं.

अनेकांना असं वाटतं, की जीवनातल्या संघर्षांना एकट्यानं तोंड देणं म्हणजे यश मिळवणं! पण हे पूर्णत: सत्य नाही. आधी सांगितलेल्या विक्रांतच्या गोष्टीतही तेच दिसतं. आपल्या माणसांशी असलेले नातेसंबंध आपण अधिक मजबूत करतो, तेव्हा जीवनातले चढउतार अधिक चांगल्या पद्धतीनं हाताळू शकतो, ध्येय गाठू शकतो आणि सजग जगण्याच्या प्रवासात समाधान मिळवू शकतो.
sanket@sanketpai.com