शुभा प्रभू साटम
shubhaprabhusatam@gmail.com
जगभरातील अरण्ये पादाक्रांत करत वन्यजीवांचे देखणे छायाचित्रण करण्यासाठी कधी घनदाट जंगलात, तर कधी बर्फाच्छादित हिमशिखरावर जाणे एका बाजूला आणि दुसरीकडे वायू, खनिज तेल नेणाऱ्या वाहिन्यांचे ऑडिट व परीक्षण करण्यासाठी खोल समुद्रात किंवा खोल जमिनीत घुसणे, हे दोन्ही करणारी एकच रसना वैद्य.. खऱ्या अर्थाने समता जपणाऱ्या निसर्गात केवळ एक माणूस म्हणून जगणारी..
अथांग पाणी, नीरव शांतता, एक पक्षी तीराच्या वेगाने वरून येतो, पाण्यातून सूर मारून मासोळी उचलून वर उडतो. अवघा काही सेकंदांचा खेळ. अरण्यातील पायवाटेवरून अचानक सिंहराज, आपल्या कबिल्यासकट डौलदार चालीने झाडीत लुप्त होतो.. धवलशुभ्र हिमनगावरून मोठाले पांढरे अस्वल (पोलार बिअर) आसमंत न्याहळते आणि या सर्व घटना रसना वैद्य आपल्या कॅमेऱ्यात टिपते. घनदाट अरण्य, अंटाक्र्टिका, अलास्का, आर्क्टिक, तुम्ही कुठेही असा तुम्हाला निसर्गाचे नियम पाळावेच लागतात हे रसनाचे ठाम मत आहे.
अगदी लहान वयात तिच्या हाती तिच्या छायाचित्रकार वडिलांनी कॅमेरा दिला. तेव्हापासून रसना वैद्य कॅमेऱ्याने बोलतेय. २००९ मध्ये तिने वन्यजीवन छायाचित्रणाला खरी सुरुवात केली. कामानिमित्त आणि छंद म्हणून तिने जगभरातील अरण्ये, समुद्र, हिमशिखरे पायाखाली घातली आहेत. कधी हाडे गोठवणाऱ्या -२५ डिग्री सेल्सीअस मध्ये पेंग्विन, वॉलरस टिपण्यासाठी ती नेम धरून तासन्तास बसलीय तर कधी कडकडीत उन्हात, गजराजाच्या तांडय़ाची, सिंहांच्या कळपाची, गोरिलांची वाट पाहात तिष्ठली आहे. कधी निळ्याभोर समुद्रात खोल सूर मारून तिथले अद्भुत विश्व तिने शब्दश: श्वास रोखून कॅमेऱ्यात बंदिस्त केले आहे.भेदक नजरेचे वाघ, वेगवेगळ्या आकाराची कासवे, हजारो जातींचे कीटक, फुलपाखरे, पक्षी, खेळकर पेंग्विन, विविध जलचर, काठावर सुस्तावून ऊन खात पडलेले अगडबंब सील, एखादी अंगठय़ाएवढी मासोळी आणि हत्तीपेक्षा मोठे व्हेल. या पृथ्वीवर जितके म्हणून पशू, प्राणी, पक्षी आहेत त्यांना रसना वैद्यने कॅमेऱ्यात टिपलेय. रसना वैद्य नॅशनल जिओग्राफिक, बी.बी.सी.साठी वन्यजीवन छायाचित्रण करते. एक्सपिडिशन्स नेते. आतापर्यंत अनेक वेळा तिने जगभ्रमण केले आहे आणि तरीही प्रत्येक अनुभव तिच्यासाठी नवा असतो.
माणूस किती क्षुद्र आहे हे निसर्गाच्या जवळ गेल्यावर कळते. पाठीवर २० किलोची सॅक बांधून रसनाने सलग आठ ते दहा तास पायपीट केलेली आहे आणि ठरावीक शॉट मिळण्यासाठी एका जागेवर ती तासन्तास सोडा अनेक दिवस बसली आहे. रसनाच्या मते, निसर्ग तुम्हाला संयम शिकवतो. इथे तुमच्या पदव्या, शिक्षण, करिअर, पगार, सामाजिक स्तर काहीही लागू पडत नाही. इथल्या प्राण्यांना तुम्ही त्यांचा मान द्यावाच लागतो. विषय संपला! वन्य छायाचित्रे काढताना रसनाला अनेक अनुभव आलेत, पोलर बिअरसाठी ती दोन दिवस -२० सेल्सीअस डिग्रीत वाट पाहात होती. अशा वेळी खूप शांतपणे वाट पाहावी लागते, घाई करून चालत नाही.
अनेकदा तर गमतीशीर अनुभवही येतात. एकदा अशीच रसना अन्य छायाचित्रकाराबरोबर हिमनग उतरत होती. बाकीचे पुढे निघून गेले आणि ती थोडी मागे पडली. बर्फ नुकताच पडून गेला होता आणि अशा वेळी नवीन बर्फातून चालताना फार सावधानता बाळगावी लागते. अनवधानाने टाकलेला कुठलाही पाय पार खाली तळाशी नेऊ शकतो. जड कॅमेरा आणि शरीरावरचे २० किलो वजनाचे गरम कपडे सांभाळत ती उतरत होती. अचानक एक पेग्विंन तिच्या बाजूला अवतरला. त्यालासुद्धा त्या बर्फातून चालणे कठीण होत होते. तो एक-दोनदा धडपडला आणि मग चक्क तो बर्फात बैठक मांडून घसरगुंडीसारखा उतरला आणि रसनाला युक्ती सुचली. त्याच्यामागोमाग ती पण तशीच उतरली. आफ्रिकेच्या अरण्यात चंदेरी पाठीचे गोरिला असतात. एखाद्या माणसाप्रमाणे त्यांच्या भाव-भावना अतिशय तीव्र असतात. एकावेळी एक गोरिला का कोण जाणे रुसून पाठ करून बसला होता, पण रसना चिकाटीने थांबून राहिली. बऱ्याच वेळाने तो वळला आणि छातीवर बुक्का मारून मोठय़ाने ओरडला.. माझा राग संपलाय.. आता काढ किती फोटो काढायचेत, असेच जणू त्याने रसनाला सांगितले आणि रसनाने मनमुरादपणे त्याच्या विविध भावमुद्रा सफाईने टिपल्या. एकदा पर्यटकांच्या मूर्खपणामुळे सिंहाचा छावा रस्त्याच्या एका कडेला अडकला आणि त्याची आई व भावंडे दुसऱ्या बाजूला राहिली. आता ते पिल्लू येणार कसे? अशा वेळी प्राणी घाई करत नाहीत. सिंहीण पूर्णवेळ वेगवेगळ्या आवाजात सूचना देत होती आणि ते पिल्लू देखील दुसऱ्या बाजूने प्रतिसाद देत होते. सुदैवाने पर्यटकांनीसुद्धा संयम दाखवला आणि पिल्लू हळूहळू आईकडे आले. रसनाला हा प्रसंग कायमचा लक्षात राहिलेला आहे. तिच्यामते प्राणी, पक्षी, जलचर या सर्वाची नैसर्गिक जाणीव अत्यंत तीव्र असते. त्यांना कसे जगायचे याची उपजत जाणीव असते. जोपर्यंत निसर्गात माणूस ढवळाढवळ करून ते पार दूषित करत नाही तोपर्यंत ती जैविक साखळी व्यवस्थित राहते असे रसनाचे मत आहे.
जगभरात प्राण्यांची तस्करी, शिकार ही फार गंभीर गोष्ट आहे. हस्तिदंत, गेंडय़ाची शिंगे, वाघाची कातडी यासाठी वन्यजीवांची बेसुमार हत्या होते. पण सुदैवाने आंतरराष्ट्रीय पातळीवर या गोष्टीची बऱ्यापैकी दखल घेतली जाऊन त्याला आळा घालण्यात यश येत आहे. स्वत: रसना तेथे काम करणाऱ्या अनेक स्वयंसेवी संघटनांशी संलग्न आहे. स्थानिक लोकांना वन्यजीवनाचे महत्त्व उमजावून देऊन त्यांना पर्यावरणपूरक रोजगार देणे आणि बेकायदेशीर प्राणी हत्या करण्यापासून त्यांना थांबवणे हे
काम रसना अनेक निरनिराळ्या संस्थांसोबत करत आहे.
वडील छायाचित्रकार आणि जहाज आलेखनकार, आई चित्रकला शिक्षक त्यामुळे अचूकपणा काय असतो याचे बाळकडू रसनाला मिळाले. एम.बी.ए. फायनान्स आणि सी.एम.ए केलेल्या रसनाने वन्यजीवन छायाचित्रण क्षेत्र आवडीने निवडले. तिच्यामते पुरुषाचे आणि बाईचे क्षेत्र असे काही नसते. तुमची निष्ठा आणि इच्छा तुम्हाला यश मिळवून देते. आजही अनेक मोहिमांमध्ये जगभरातून येणाऱ्या छायाचित्रकारांच्या तांडय़ामध्ये अनेकदा रसना एकटी बाई असते. पण ती ना कुठे कमी पडत ना तिला त्रास होतो. तिच्यामते, भारतात पर्यटकांना शिस्त असणे फार गरजेचे आहे. इथे तुम्हाला वन्यजीवनाचे नियम पाळावेच लागतात. कितीही सांगून पर्यटक तिथे प्लास्टिकच्या बाटल्या, खाद्यपदार्थ नेतात, गोंगाट, आरडाओरडा करतात. अरण्यातले जीवन अनुभवण्यापेक्षा ते कॅमेऱ्यात घालून सोशल मीडियावर टाकणे याची अहमहमिका त्यांच्यात असते असे तिने खेदाने नमूद केले. बऱ्याच ठिकाणी वन्यजीवन पर्यटन हा पूर्णपणे धंदेवाईक झालेला असून त्याच्यातील अस्सलता नष्ट झालेली आहे. वन्यजीवन संवर्धन करायचे असेल तर पर्यटकांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे. त्यांच्या लालसेपायी अनेक ठिकाणच्या अरण्याचा जैविक समतोल ढासळू लागलेला आहे. मग ते अरण्य भारतातले, आफ्रिकेतले किंवा अन्य कुठलेही. तुम्हाला वनातील पक्षी बघायचे आहेत किंवा सुळे असलेला हत्ती, तुम्ही म्हणजे माणूस त्यांच्या घरात जात आहात, तुम्ही आगतुंक पाहुणे आहात त्यामुळे तुम्हाला तिथले नियम व शिस्त पाळावीच लागेल असे रसना म्हणाली.
वन्य जीवन छायाचित्रण हा प्रांतच वेगळा आहे. तुम्हाला प्राणी आणि अरण्य यामधलेच एक होऊन राहावे लागते. ही स्टुडिओ फोटोग्राफी नाही. प्राण्यांच्या मर्जीप्रमाणे राहून, निसर्गाचा आदर करून, त्याचे नियम पाळून काम केले तरच यश मिळते. हे काम करताना तिच्यावर अनेकदा आणीबाणीचे प्रसंग ओढावलेत. सापांचे छायाचित्रण करताना रात्रीची वेळ उत्तम. पण तिथे टॉर्च मारून चालत नाही. नाइट व्हिजन लेन्सेसने फोटो काढावे लागतात. संध्याकाळच्या सुमारास जाऊन बस्तान ठोकणे आवश्यक असते आणि सापाची संवेदन क्षमता अतिशय तीव्र असल्याने श्वासावरही नियंत्रण ठेवावे लागते. एका अशाच छायाचित्रणाच्या वेळी रसनाला मनासारखे फोटो मिळाले पण अंगावर भरपूर जळवाही चिकटल्या, डासांनी फोडून खाल्ले ते वेगळेच. आणखी एकदा शॉटस् घेऊन ती परत येत होती आणि वाटेत वेगळ्या तऱ्हेची अळंबी उगवलेली दिसली. रसनाने जमिनीवर झोपून पटापट त्यांना टिपले आणि वळली, क्षणार्धात एक सिंह तिकडून जाता झाला. दोन मिनिटांचा जरी उशीर होतो तरी जिवावर बेतले असते. अर्थात माणूस जसा पशूंना घाबरतो तसेच पशूही माणसाला घाबरतात आणि आपणहून ते तुमच्यावर हल्ला करत नाहीत. तुमचे ओरडणे, हातवारे, किंचाळणे यामुळे त्यांच्या वन्य मेंदूला धोक्याचा इशारा मिळून मगच त्यांच्याकडून हल्ला केला जातो.
छायाचित्रणासोबत रसना आणखीन एक काम करते. ते म्हणजे वायू, खनिज तेल नेणाऱ्या ज्या वाहिन्या असतात त्यांचे ऑडिट व परीक्षण. या वाहिन्या समुद्रात असतात वा जमिनीखाली. त्याची स्थिती पाहणे, त्यांच्या जोडकामांचे (वेल्डिंग) परीक्षण करणे? हे सर्व रसना वैद्य शास्त्रोक्त पद्धतीने पार पाडते. कधी खोल समुद्रात तर कधी जमिनीखाली. ती गमतीने या कामाला पाइप्सचा एम.आर.आय. (MRI) म्हणते. हे काम अतिशय महत्त्वाचे आहे. पाइप गंजणे, वायुगळती होणे असे अनेक धोके संभवू शकतात. त्यामुळे डोळ्यात तेल घालून तपासणी करावी लागते. रसनाने सी-डायिव्हगचा शास्त्रोक्त अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे. समुद्रात जेव्हा तुम्ही खोल उतरता तेव्हा तुम्हाला एकदम सूर मारून चालत नाही, तसे झाले तर तुमच्या कानाचे पडदे क्षणभरात फाटू शकतात आणि एकदम वर येऊन देखील चालत नाही. फुप्फुसावर प्राणवायूचा अतिरिक्त ताण येऊ शकतो. त्यामुळे टप्प्याटप्प्याने काम करावे लागते. थोडक्यात छायाचित्रण असो अथवा पाइप तपासणी.. सबर का फल मिठा होता है.
रसनाच्या म्हणण्यानुसार स्त्री म्हणून तिला अजूनपर्यंत कुठल्याही मर्यादा जाणवल्या नाहीत. निसर्गात खरी समता असते. तिथे फक्त माणूस आणि श्वापदे असतात. बाई आणि पुरुष नाही. रसना निसर्गात अशी माणूस म्हणून जगते..