|| - सीमा सावंत Where were you born? Where is your home? Where are you going? What are you doing? Think about these questions once in a while and watch your answers change. लेखक रिचर्ड बाख म्हणतात तसे हे प्रश्न स्वत:ला विचारायला हवेत अधूनमधून. मला मात्र या प्रश्नांवर विचार करायला थोडा उशीरच झाला. बालपण ते लग्न होईपर्यंतचा काळ निवांत, तर पुढे लग्नानंतर घर-ऑफिस येथील कामांची, ज्येष्ठांची, मुलाची, या विविध जबाबदाऱ्यांच्या गराडय़ात सापडल्यावर ‘मी का जगतेय?’ असा प्रश्न पडायला आणि पडलाच तर क्षणभर थबकून विचार करायलाही वेळ नव्हता. हळूहळू आयुष्यात सर्वच आघाडय़ांवर स्थैर्य येऊ लागलं, तसं त्या दिशेनं विचारमंथन सुरू झालं. मला वाटतं, की जगतात तर सगळेच. म्हणजे जन्माला आल्यावर स्वत:चं आयुष्य जगण्याची धडपड, सुखदु:ख, ते मृत्यू हा प्रवास सारेच प्राणिमात्र करतात. सर्वात बुद्धिमान अशा मनुष्यप्राण्यानंही तो प्रवास तसाच करत फक्त ‘स्वान्त: सुखाय’ जगायचं का? माझ्यापुरतं तरी या प्रश्नाचं उत्तर ‘नाही’ असंच आहे. म्हणजे पैसा महत्त्वाचा आहे, पण त्याचा हव्यास नसावा. मला माणसं वाचायला, नाती जपायला; लेखन, पेंटिंग, निसर्गात भटकंती करायला मनापासून आवडतं. मात्र याबरोबरच समाजासाठी काही चांगलं काम करायचं हे ठरलेलंच होतं. हे करताना प्रपंचही नेटका करायचा होता. दरम्यान, नवऱ्याची बदली मुंबईबाहेर झाली. मुलगाही शिक्षणानिमित्त मुंबईबाहेर असल्यानं मला माझी मुंबई महानगरपालिकेची नोकरी सोडणं शक्य होतं. मराठी पुस्तकांचं ब्रेल भाषांतर मी आधीपासूनच करत होते. याबरोबर दृष्टिबाधित मुलांना शिकवण्याचं आणि त्यांच्यासाठी पुस्तकांचं रेकॉर्डिग करण्याचं कामही चालू होतं. मुंबईबाहेर गेल्यावर यांप्ंौकी शिकवण्याचं काम थांबलं, तरी बाकीची कामं चालूच राहिली. तुमची इच्छा असेल तर मार्ग सापडतोच हा आजवरचा अनुभव आहे. मी जिथे जिथे गेले, तिथे तिथे मला काही ना काही सापडत गेलं. नांदेडला तीन महिन्यांच्या वास्तव्यात दृष्टिबाधित शिक्षिकेसाठी रीडर म्हणून काम करताना ब्रेल लिहा-वाचायला शिकले. पुण्याला ‘दिशा इन्स्टिटय़ूट’मध्ये मुलांचं एक वेगळं विश्व मला समजलं. या मुलांनी मला खूप काही शिकवलं. नाशिकला भारती ठाकूर यांचा परिचय झाला. मध्यप्रदेशातील मुलांसाठी महान कार्य करत असणाऱ्या भारतीताईंचं अतिशय मृदू आणि कसलाच अहंभाव नसलेलं व्यक्तिमत्त्व, त्या आणि ‘नर्मदालया’तील त्यांचे तळमळीनं काम करणारे सहकारी, या साऱ्यांत मी कधी सामावले गेले ते मलाच कळलं नाही. तर औरंगाबादमध्ये ‘विद्यादान सहाय्यक मंडळ’ या गरजू, गुणवंत विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या संस्थेच्या कुटुंबाचा भाग झाले. ‘बुकलेट गाय’ अमृत देशमुखच्या ‘मेक इंडिया रीड’ या अभियानाशीही जोडले गेले. या साऱ्या कामात आनंद मिळत होता, पण तरीही आपल्याला अजून काही तरी हवं, ही जाणीव सतत होत होती. रिचर्ड महोदयांचे प्रश्न पुन्हा एकदा स्वत:ला विचारायची वेळ आली होती. याच दरम्यान जगभर पसरलेल्या करोना महासाथीनं वाढलेलं मनावरचं दडपण, विचार यांपासून दूर राहण्यासाठी ज्ञानेश्वरी शिकायला सुरुवात केली. स्वामी विवेकानंद, रामदास स्वामी, ब्रह्मकुमारी शिवानी यांचे आध्यात्मिक विचार ऐकायला सुरुवात केली. माझा पिंड अध्यात्माचा अजिबात नाही. अध्यात्मावर अधिकारानं बोलण्याची पात्रताही नाही. आपलं काम प्रामाणिकपणे, कुणालाही न दुखवता करावं इतकंच मला समजतं. माझ्या लेखी भारतीताई म्हणतात तसं ‘सत्याच्या मार्गानं आयुष्य जगणं हेच अध्यात्म आणि रोजचं जीवन हेच साधनेचं क्षेत्र’. अलीकडे एक निरपेक्ष शांतता मनाला मोहवते आहे. माझ्यापुरतं सांगायचं तर, भूतकाळात घडलेल्या वाईट घटना, अनुभव विसरून, भविष्यकाळाचा अति विचार न करता, फक्त वर्तमानात जगण्याचा प्रयत्न करणं, एवढंच मी करू शकते. कुठल्याच गोष्टीबद्दल कटुता बाळगायची नाही. सध्या तरी या मार्गावर चाचपडत आहे. थोर विचारवंतांचे विचार साथीला आहेतच. हे मार्गक्रमण करत असताना मला सापडलेला जगण्याचा अर्थ अधिक व्यापक होईल याबद्दल मात्र मनात कुठलीही शंका नाही. seems.5678@gmail. com