डॉ. स्मिता दातार
अनेक बाबांसाठी आपली मुलगी ‘परी’ असते. पण जेव्हा ती मुलगी धाडस, साहस, मृत्यूशी सामना करायला लागणाऱ्या आव्हानात्मक जगात जाऊ पाहते, तेव्हा तेच बाबा मनावर दगड ठेवून खंबीरपणे तिच्या मागे उभे राहातात. सैन्य असो, पोलिसी क्षेत्र असो, अग्निशमन दल असो की आधुनिक मेट्रो वाहतूक. अशाच या काही ‘मुलीं’च्या धाडसी इच्छेला आभाळ देणाऱ्या बाबांची कहाणी उद्याच्या (१५ जून) ‘फादर्स डे’च्या निमित्ताने…
मुलांसाठी आई धरणी असेल तर वडील आभाळ असायला हवेत. मात्र ती लेक असेल तर हे समंजस आभाळ जेव्हा तिला बळ देतं, तेव्हा ती पंख पसरून निर्धोकपणे उंच भरारी घेते. स्त्रियांच्या सक्षमीकरणातला पुरुषांचा असलेला किंवा नसलेला सहभाग हा विषय हल्ली चर्चेचा झालाय, पण काही बाबांनी काळाच्या पुढे जाऊन, आपल्या लेकींना पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात जायला पाठिंबा दिला आणि आकाशाच्या पटलावर तळपल्या काही विद्याुतशलाका.
‘प्रिटिंग प्रेस’मध्ये काम करणाऱ्या जगन्नाथ सुर्वे यांनी, लहानपणी लेकीला खांद्यावर बसवून, दरवर्षी शिवाजी पार्कची पोलीस परेड दाखवली. त्याच लेकीला अर्थात सहायक पोलीस आयुक्त (एसीपी)ज्योत्स्ना रासम. यांना पोलिसी गणवेशात परेड करताना पाहून बाबांची छाती अभिमानानं फुलून आली. गणवेशाची गोडी त्यांना बाबांनीच लावली. लेकीची ‘एनसीसी’, ‘कॅम्पिंग’सारखी साहसी आवड त्यांनी जपली. दहावी झाल्यावर दार्जिलिंगच्या कॅम्पसाठी लेकीवर विश्वास ठेवून एकटे पाठवणारे बाबा, पुढे ती परीक्षा बुडवून ‘कॅम्प’ला गेली तेव्हा, मी आल्यावर परीक्षा देईन, असं वचन तिच्याकडून कागदावर लिहून घ्यायला विसरले नाहीत. मुलांना अट एवढीच की, ‘तुम्ही शिक्षण पूर्ण केलंच पाहिजे’. इथंच ज्योत्स्ना यांच्यावर प्रामाणिकपणा आणि ध्येयपूर्तीचे संस्कार झाले. १९८९ च्या दरम्यानच्या काळात स्त्रिया पोलीस दलात जाऊ लागल्या होत्या. सुर्वे यांची एक मुलगी कर्करोगाने नुकतीच मरण पावली होती. तरीही काळजावर दगड ठेवून त्यांनी ज्योत्स्ना यांना पोलीस प्रशिक्षणासाठी घरापासून दूर शिकायला पाठवलं. इगतपुरी मोहिमेच्या वेळी ज्योत्स्ना यांना ‘रिव्हर क्रॉसिंग’ करताना खोल दरीवरून ‘रोप’च्या साहाय्याने जायचे होते. तिथे दोन पुरुष अधिकारी आणि त्या एकट्याच स्त्री अधिकारी होत्या. त्यांचे आई-बाबा त्यांच्यासोबत होते. त्या दरीची खोली उरात धडकी भरवणारी होती. बाबा त्यांच्या आईला काळजीनं म्हणाले, ‘‘हे फार जोखमीचं काम आहे.’’ पण लेकीला तसे न दर्शवता ते म्हणाले, ‘‘तू हे करू शकतेस.’’ पुढे उत्तम गिर्यारोहक झालेल्या ज्योत्स्ना रासम यांनी हिमालयात ‘हनुमान टिब्बा’सह सरासरी १८,००० फुटांवरच्या तीन शिखरांवर चढाई केली.
‘स्त्री-भ्रूणहत्ये’विरोधात प्रबोधन म्हणून ११ दिवसांत १३ राज्यांत, चारचाकी वाहन चालवून, सर्वात कमी वेळेत सर्वाधिक वेगवान प्रवासाचा ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंदवलेला जागतिक विक्रम केला. परदेशातून कुख्यात आरोपींना पकडून आणलं, क्राइम ब्रांच अर्थात गुन्हे शाखेची अतिशय गुंतागुंतीची प्रकरणे सोडवली. सर्व कठीण कामांच्या वेळी जगन्नाथ सुर्वे लेकीला हिंमत द्यायचे आणि पदक स्वीकारतानाचे तिचे फोटो बघून डोळ्यांतून कौतुकाचा वर्षाव करायचे. पण एकदाही त्यांनी लेकीला भीती घातली नाही.
ज्योत्स्ना यांनी नंतर ‘लैला खान हत्या प्रकरण’, ‘मुद्रांक घोटाळा प्रकरण’, ‘दुबईहून चकमा देणारी रोशन अन्सारी प्रकरण’, २०२१चे ‘साकीनाका बलात्कार व हत्या प्रकरण’ अशी अनेक प्रकरणे निडरपणे हाताळून आरोपी पकडून दिले. या त्यांच्या शौर्यासाठी त्यांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’, ‘केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक’ असे अनेकविध पुरस्कार मिळाले. पराक्रमी मर्दानीच्या बाबांनी, लेकीला जिद्दीने आणि मेहनतीने आपल्या क्षमता विस्तारण्याचे बळ दिले.
*
अशीच एक विद्याुतशलाका डॉ. अस्मिता कुलकर्णी. ‘एमबीबीएस’ झाल्यावर त्यांना वेध लागले लष्करात जाण्याचे. कुटुंबात सैन्याची कुठलीही पार्श्वभूमी नसताना, लेकीचा मनोनिग्रह पाहून बँकेत व्यवस्थापक असलेल्या महादेव कुलकर्णी यांनी त्यांना केवळ पाठिंबाच दिला नाही, तर शक्य असेल तिथे लेकीसोबत स्वत:ही जाऊन आले. २००८ मध्ये अस्मिताचे पहिलेच पोस्टिंग काश्मीरमधील बारामुल्ला या संवेदनशील भागात झाले. लेकीच्या काळजीने रोज जीव जळत असताना, ते स्वत: एकदा बारामुल्लाला तिला भेटायला गेले. महादेव कुलकर्णी विमानतळावरून लेकीच्या घरी जात असताना त्यांच्या गाडीच्या मागच्या ताफ्यात मोठा बॉम्बस्फोट झाला. काश्मीरच्या बाबतीत टीव्हीवर दिसणारी परिस्थिती त्यांनी प्रत्यक्ष अनुभवली. बाबांना घरी सोडून लगेच जखमींना वाचवण्यासाठी रुग्णालयामध्ये धाव घेतलेल्या लेकीच्या रोजच्या तलवारीच्या धारेवरच्या आयुष्याची त्यांना कल्पना आली. मेजर अस्मिता कुलकर्णी- ठाकूरदास पुण्याच्या पोस्टिंगला जाणार म्हणून त्यांच्या सहा महिन्यांच्या बाळाला सांभाळणारे, सैन्य दलातून निवृत्त झाल्यावर लेकीचं नेत्रतज्ज्ञाचं पदव्युत्तर शिक्षण पार पडावं म्हणून तिच्या इतर जबाबदाऱ्या उचलणारे आई-वडील मेजर अस्मितांना लाभले. सैन्यात मेजर असलेली लेक, हवाई दलातील पायलट जावई यांचा सार्थ अभिमान बाळगणारे महादेव कुलकर्णी त्यांचं मोजकंच कौतुक इतरांसमोर करतात. मात्र लेकीला आवडणारे पदार्थ ती कुठेही असली तरी आटापिटा करत पोचते करून आपलं प्रेम व्यक्त करतात.
पुरुषी वर्चस्व असलेल्या लष्करासारख्या क्षेत्रात डॉक्टर असूनही तुम्हाला तुमची योग्यता सिद्ध करावी लागते. तरच तुमचे पुरुष सहकारी तुम्हाला मान देतात, जिवाला जीव देतात. बंदुकीच्या गोळ्यांनी विद्ध सैनिकांवर उपचार करत, बॉम्बचे धमाके ऐकत रुग्णसेवा देणाऱ्या, अस्थिर वातावरणात आपलं मनोबल टिकवणाऱ्या मेजर अस्मिता यांना वडिलांनी ही अनवट वाट चोखाळू दिली नसती तर त्या हे यश मिळवू शकल्या नसत्या. बापूराव कान्हेकर, एक धैर्यवान बाबा. ज्यांनी त्यांच्या लेकीला स्वत: एका पुरुषांसाठी असणाऱ्या महाविद्यालयात घातलं. ते महाविद्यालय होतं नागपूरचं ‘नॅशनल फायर सर्विस महाविद्यालय’. अग्निशमन महाविद्यालयाची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झालेली, तिथे मुलाखत देण्यासाठी महाविद्यालयाचा जिना वडिलांसोबत चढलेली ती पहिली मुलगी होती, हर्षिणी कान्हेकर.
फायर ऑफिसर अर्थात अग्निशमन दलातील अधिकारी होण्याचा त्यांचा हा प्रवास खडतर होता, शारीरिक क्षमतांना आव्हान देणारा होता. पाण्याचे अवजड होज पाइप, सक्शन पाइप, डमी पुतळे उचलणारी हर्षिणी, २०० मुलगे असलेल्या परेडलादेखील वेळेवर हजर राहायची. मुलगी म्हणून कुठल्याही सवलती तिने कधी घेतल्या नाहीत. इथे दिवस-रात्र आगीशी खेळावं लागतं, तुला जमणार नाही, असे ऐकवणारे लोक आसपास असतानाही तिच्या बाबांनी तिला हिंमत दिली आणि ‘अग्निशमन महाविद्यालया’च्या इतिहासात प्रथमच ‘Miss’ हे शब्द निकालपत्रावर टाइप करण्यात आले. तिथे प्रथमच स्त्री अग्निशमन अधिकारीसाठी गणवेश तयार केला गेला. २००६ मध्ये हर्षिणी कान्हेकर पहिल्या स्त्री अग्निशमन अधिकारी झाल्या तेव्हा बाबांचा आनंद गगनात मावेना. हर्षिणीचा पहिलाच ‘कॉल’ दिल्लीतील गॅस सिलिंडर स्फोटाचा होता, जिथे आपल्या सहकाऱ्यांसह जाऊन त्यांनी यशस्वीपणे आग विझवली. ‘दिल्ली बूट फॅक्टरी’च्या अग्नितांडवात सहा तास त्यांनी शर्थीची झुंज देऊन, आगीने तडे गेलेल्या इमारतीतून अनेकांची सुटका करून आग आटोक्यात आणली. नंतर केवळ आगच नाही तर पूर, इमारत कोसळणं, जंगली श्वापदांचा हल्ला, यातून त्यांनी अनेक लोकांचे जीव वाचवले. एक दिवाळी सण तर त्यांनी आगीचे सहा कॉल घेत साजरा केला, पण ‘कर्तव्य हाच सण’, हे त्यांना वडिलांनीच शिकवलं होतं. नंतर हर्षिणी ओएनजीसी – गुजरात, मेहसाणाला तेल आणि वायू उत्खनन विभागात अग्निशमन अधिकारी म्हणून दाखल झाल्या. ‘ऑफशोअर’ (समुद्राच्या आत) कर्तव्य बजावणारी पहिली स्त्री अधिकारी होण्याचा मानही हर्षिणी यांच्याकडेच जातो. तोपर्यंत एकही स्त्री हेलिकॉप्टरमध्ये बसून ‘ऑफशोअर’ गेली नव्हती.
वडिलांनी पूर्ण केलेली लेकीची धाडसाची इच्छा आणि त्यांच्या लेकीने केलेलं दुर्दम्य साहस यामुळे हर्षिणी कान्हेकर यांनी स्त्रियांना अग्निशमन दलाचे दरवाजे खुले करून दिले. ‘Transforming Women of India’, ‘फर्स्ट लेडी पुरस्कार’, ‘राष्ट्रपती पुरस्कार’ असे अनेक पुरस्कार मिळवणाऱ्या हर्षिणी यांनी लेह-लडाख खारदुंगला पास या जगातल्या सर्वात उंच रस्त्यावर बाइक चालवण्याचा विक्रम केला आहे. वडिलांच्या पाठिंब्यामुळे आगीची झळ लागलेल्यांचे जीव वाचवण्यासाठी या अग्निकन्येने स्वत:साठी अग्निपथ निर्माण केला.
*
लहानपणी झुकझुक गाडीने लेकीला फिरायला नेणाऱ्या नारायण चव्हाण यांनी लेकीचा, रुपाली चव्हाण कोरे यांचा ८ जून २०१४ मध्ये पहिली मुंबई मेट्रो चालवणारी, पहिली स्त्री पायलट म्हणून फोटो बघितला आणि त्यांचे डोळे भरून आले. ‘तू पास होणार की नापास याला न घाबरता कष्ट करून फक्त परीक्षा दे’, असं सांगणाऱ्या बाबांचा हा सल्ला आजही मेट्रो पायलट आणि ओसीसी चीफ कंट्रोलर असलेल्या रुपाली यांना मोलाचा वाटतो. बाबांनी त्यांना आवडणारा ‘ज्युडो’ खेळू दिला. सहा वर्षं शिक्षणासाठी घराबाहेर राहू दिलं, ‘इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन’ची पदवी घेतल्यावर, ट्रेन पायलट म्हणून तीनही शिफ्टची पुरुषी वर्चस्व असलेली नोकरी करायला प्रोत्साहन दिलं. प्रशिक्षणाच्या वेळी त्यांची काही चूक नसताना नोकरी जातेय की काय अशा कठीण प्रसंगी त्यांनी रुपालीला धीर दिला आणि सांगितलं, ‘‘एक नोकरी गेली तर दुसरी मिळेल, तू पुढे चल. चूक झाली नसेल तर ठीकच, पण चुकलीस तरी हरकत नाही, त्यातूनच तू शिकणार आहेस’’, असा आत्मविश्वास देणारे बाबा होते ते. अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी हातमिळवणी करून, रोज १५०० प्रवाशांना सुखरूप घेऊन जाणं, गाडीच्या वेगाशी आपली मानसिकता जोडून घेत, प्रवाशांची सुरक्षितता सांभाळणं, यासाठी पायलटचा धीरोदात्तपणा, एकाग्रता आणि शक्ती लागते. गाडीच्या पायलटची एक छोटीशी चूक प्रवाशांच्या जिवावर बेतू शकते. म्हणून मेट्रो पायलट होण्यासाठी उमेदवाराला कठीण शारीरिक आणि मानसिक चाचण्या पार कराव्या लागतात. अत्यंत कठोर अशी वैद्याकीय चाचणीही उत्तीर्ण व्हावं लागतं. लेकीला खंबीर बनवणारे बाबा, रुग्णालयामध्ये तिला उपाशीपोटी कराव्या लागणाऱ्या वैद्याकीय चाचणीच्या दिवशी स्वत:ही तिच्यासोबत बारा तास उपाशी राहिले. इयत्ता सहावीच्या ‘बालभारती’च्या पुस्तकात आपल्या लेकीवरचा ‘सफर मेट्रोची’ हा धडा असो की वृत्तपत्रात तिच्यावर आलेला लेख असो, ते सगळ्यांना कौतुकाने दाखवायचे. मेट्रोच्या वेगावर स्वार होणाऱ्या रुपालीच्या प्रगतीच्या वेगाचं नियंत्रण नारायण चव्हाण यांनी कधीही केलं नाही, म्हणून हे यशस्वी आणि चाकोरीबाहेरचं धाडसी करिअर त्या करू शकल्या.
स्वप्नपूर्तीच्या खडतर वाटेवर लेकीला बोट पकडून चालायला शिकवायचं आणि तिने आत्मविश्वासाने पावलं टाकायला सुरुवात केली की तिचं बोट सोडून फक्त पाठीशी उभं राहायचं, तिने हाक मारली तर ‘ओ’ द्यायची, असं वागणारे बाबा, लेकीचं आभाळ होतात. असे बाबा प्रत्येक लेकीला लाभले तर या विद्याुल्लता भारताचा वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ उजळून टाकतील, यात शंका नाही.
drsmitadatar@gmail.com