डॉ. वैशाली बिनीवाले
वंध्यत्व ही वैद्यकीय समस्या आहे, मात्र आजही एखाद्या स्त्रीला बाळ झालं नाही तर तिला मानसिक त्रास दिला जातो. आज जगामध्ये साधारणत: १५ ते १७ टक्के जोडप्यांमध्ये वंध्यत्वाची समस्या आढळते. वंध्यत्वाची समस्या का निर्माण होते, याविषयी…
साधारणत: ३०-३५ वर्षांपूर्वीची गोष्ट. त्या वेळी मी ‘ससून’ रुग्णालयामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत होते. संध्याकाळची वेळ होती. ‘ससून’च्या प्रसूती कक्षामध्ये नेहमीप्रमाणे गडबड चालू होती. प्रसूतीसाठी आलेल्या स्त्रिया, त्यांचे नातेवाईक, डॉक्टर आणि परिचारिकांची वर्दळ सुरू होती आणि अशातच एका पस्तिशीच्या स्त्रीला तिचे नातेवाईक घेऊन आले. त्यांनी सांगितल्यानुसार गर्भारपणाचा चौथा महिना सुरू होता आणि अचानकच दुपारी रक्तस्राव होऊन गर्भपात झाला होता. त्या स्त्रीने स्वत: बरोबर पडलेला गर्भ कापडात गुंडाळून आणला होता. तिच्या लग्नाला १४-१५ वर्षं झाली होती. बाळ व्हावं यासाठी त्यांचे खूप प्रयत्न चालू होते. वैद्याकीय उपचार, व्रत-वैकल्ये, गंडे-दोरे सर्व काही करून झालं होतं, पण कशालाच यश येत नव्हतं. आणि चमत्कार झाला. पाळी चुकल्याचे तिने सगळ्यांना सांगितले. सगळ्यांनाच खूप आनंद झाला. पुढील काही दिवसांत ती डॉक्टरांकडे तपासायला जाणारच होती, पण ‘अचानक’ तिचा गर्भपात झाला. ती खूपच दु:खात होती.
तपासताना डॉक्टरांच्या लक्षात आलं की ही स्त्री खरं तर गरोदरच नव्हती. खोलात जाऊन चौकशी केल्यावर ती ढसाढसा रडायला लागली. तिने हा गरोदरपणाचा सगळा बनाव रचला होता. लग्नानंतर इतकी वर्षं होऊनही मूल न झाल्याने तिला वांझ म्हणून हिणवलं जायचं. कोणत्याही धार्मिक, कौटुंबिक कार्यक्रमाला जायला तिला बंदी होती. तिच्या सान्निध्यात येणाऱ्या स्त्रियांना मूल-बाळ होणार नाही असं बोललं जायचं. एक प्रकारे तिला समाजाने वाळीतच टाकलं होतं. या सगळ्यापासून सुटका व्हावी म्हणून तिने नाइलाजाने गरोदर असल्याची बतावणी केली होती. आणि अखेर कुठल्या तरी मांसाचा एक तुकडा आणून गर्भ पडल्याचे ती भासवत होती. घरच्यांना सत्य सांगू नका, अशी गयावया करत विनंती करत होती. स्वत:वर असलेला वांझपणाचा शिक्का तिला पुसायचा होता. समाजात मानाने राहायचं होतं.
ही घटना जरी ३०-३५ वर्षांपूर्वीची असली, तरी आजकालच्या आधुनिक युगातील परिस्थिती काय आहे?
वैद्याकीय क्षेत्रात इतकी वर्षं असल्याने हे जाणवतं की, वंध्यत्वाची समस्या असणाऱ्या जोडप्याला विशेषत: स्त्रीला आजही अनेकदा वाईट वागणूक मिळते. नाटक, चित्रपटात दाखवल्या जाणाऱ्या घटना साधारणत: समाजातील विचारांचं प्रतिबिंब असतात. नुकताच मी एक मराठी चित्रपट पाहिला. या चित्रपटातसुद्धा वंध्यत्वाची समस्या असणाऱ्या स्त्रीला भावाच्या लग्नासारख्या आनंदाच्या प्रसंगात धार्मिक गोष्टीत सहभाग घेण्यापासून वगळलं जातं. दुर्दैवाने आजही मूल न होणं हा समाजात कलंक समजला जातो, वंध्यत्व हा स्त्रीमधील कमीपणा समजून तिला अतिशय असंवेदनशीलतेने वागवलं जातं. तिला टोमणे मारले जातात. अशा स्त्रियांबाबत भेदभाव केला जातो. त्यांना सोडून दिलं जातं, घटस्फोट दिला जातो. कधी कधी तर त्यांना कौटुंबिक हिंसाचाराला सामोरं जावं लागतं.
‘वंध्यत्व’ ही खरं तर एक वैद्याकीय समस्या. वंध्यत्व म्हणजे नक्की काय? जेव्हा एखादे जोडपे कोणतेही गर्भनिरोधक न वापरता नियमित लैंगिक संबंध ठेवून गर्भधारणेसाठी प्रयत्न करते व प्रयत्नानंतरही त्यांना गर्भधारणा होत नाही त्याला वैद्याकीय भाषेत ‘वंध्यत्व’ म्हणतात. गर्भधारणेस विलंब होण्याचा कालावधी साधारणत: एक वर्षाचा मानला जातो. जोडप्यामधील स्त्रीचं वय ३५पेक्षा जास्त असेल तर हा कालावधी सहा महिन्यांचा असतो. वंध्यत्व दोन प्रकारचे असते. प्राथमिक वंध्यत्वामध्ये (Primary Infertility) स्त्रीला कधीच गर्भधारणा होऊ शकलेली नसते, तर दुय्यम प्रकारच्या वंध्यत्वामध्ये (Secondary Infertility) यापूर्वी गर्भधारणा झालेली असते, मात्र आता गर्भधारणेस विलंब होतो. जगामध्ये साधारणत: १५ ते १७ टक्के जोडप्यांमध्ये वंध्यत्वाची समस्या आढळते.
वंध्यत्वाची अनेक कारणं आहेत. काही कारणं स्त्रियांमध्ये तर काही पुरुषांमध्ये आढळतात. कधी कधी दोघांच्यातही काही दोष आढळतात. काही वेळेस मात्र कोणताच दोष आढळत नाही, पण गर्भधारणेस मात्र विलंब होतो. वंध्यत्वाची समस्या का होते याची कारणमीमांसा आपण या लेखात करणार आहोत. गर्भधारणेस विलंब होण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे गर्भधारणेच्या प्रक्रियेची शास्त्रीय माहिती नसणं. गर्भधारणेसाठी इच्छुक असणाऱ्या अनेक जोडप्यांना गर्भधारणा कशी होते? महिन्यातील कोणता काळ त्यासाठी अनुकूल असतो याची काहीही माहिती नसते.
गेले सहा महिने मेघना गर्भधारणा व्हावी यासाठी प्रयत्न करते आहे. पण अजूनही तिला त्यात यश मिळाले नाही. याविषयीचा सल्ला घेण्यासाठी ती डॉक्टरांकडे गेल्यावर तिला प्रजननक्षम काळाची (Fertile Period) माहिती मिळाली. या मार्गदर्शनामुळे गर्भधारणा होण्यासाठी तिला मदत झाली.
स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या साधारणत: आठव्या दिवशी एका बीजांडकोशातील एक स्त्रीबीज निवडलं जातं व त्याची झपाट्याने वाढ सुरू होते. दर महिन्याला अगदी नियमित मासिक पाळी येणाऱ्या स्त्रियांमध्ये १४ ते १६व्या दिवशी हे स्त्रीबीज परिपक्व होतं व बीजांडकोशातून बाहेर पडतं. याला ‘ओव्ह्युलेशन’ (Ovulation) म्हणतात. हे स्त्रीबीज साधारणत: १२ ते २४ तास जिवंत असतं. या काळात स्त्री व पुरुषामध्ये लैंगिक संबंध आल्यास शुक्राणू स्त्रीबीजाचे फलन करतात व गर्भधारणा होते. नियमित मासिक पाळी येणाऱ्या स्त्रियांमध्ये मासिक पाळीचा १२ ते १८ दिवसांचा कालावधी हा गर्भधारणेसाठी अनुकूल समजला जातो. गर्भधारणेसाठी इच्छुक जोडप्यांना या काळात दररोज किंवा किमान दिवसाआड लैंगिक संबंध ठेवण्याचा सल्ला दिला जातो. ‘ओव्ह्युलेशन’ कधी होते हे बघण्यासाठी बाजारात अनेक किट्स व उपकरणे उपलब्ध आहेत. सोनोग्राफीच्या सहाय्याने (Follicular Monitoring) ‘ओव्ह्युलेशन’चे अचूक निदान करता येते.
वंध्यत्वाची समस्या घेऊन प्रतीक्षा व तिचा नवरा आले होते. त्यांच्या लग्नाला तीन वर्षं पूर्ण झाली आहेत. गेले वर्षभर बाळ होण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. पूर्वी नियमित येणारी प्रतीक्षाची मासिक पाळी गेले वर्षभर अनियमित झाली आहे. कधी दीड महिन्याने येते, तर कधी कधी २-३ महिने झाले तरी येत नाही. सध्या प्रतीक्षाचं वजनही खूप वाढलंय. प्रतीक्षाच्या तक्रारींवरून असं लक्षात येतंय की बीजनिर्मिती व ‘ओव्ह्युलेशन’च्या प्रक्रियेमध्ये काही तरी दोष निर्माण झालाय.
काही स्त्रियांमध्ये संप्रेरकांमधील असंतुलन व बिजांडकोषाच्या आजारामुळे बीजनिर्मिती व ‘ओव्ह्युलेशन’च्या प्रक्रियेमध्ये समस्या निर्माण होतात. वंध्यत्वाचे हे एक महत्त्वाचे कारण आहे. स्त्रियांमधील वंध्यत्वाच्या कारणांपैकी सुमारे २५ ते ४० टक्के वेळा ही समस्या कारणीभूत असते. पीसीओडी, थायरॉइड व प्रोलॅक्टीनसारख्या संप्रेरकांमधील असंतुलनामुळे बीजनिर्मितीच्या प्रक्रियेत दोष निर्माण होतात. मानसिक ताण-तणाव, स्थूलपणा, वजन अचानक वाढणे किंवा कमी होणे याबरोबरच वाढणाऱ्या वयामुळे कमी होणारी प्रजननक्षमताही यासाठी कारणीभूत असते. रक्तामधील संप्रेरकांची पातळी मोजून व सोनोग्राफीच्या सहाय्याने बीजनिर्मितीमधील दोषांचे निदान करण्यात येते.
बीजनिर्मितीची प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी चांगली जीवनशैली अंगीकारायला हवी. संप्रेरकांमधील असंतुलन कमी करण्यासाठी नियमित व्यायाम करायला हवा. चौरस आहार घ्यायला हवा. वजन आटोक्यात आणायला हवं. बीजनिर्मिती व ‘ओव्ह्युलेशन’ नीट होण्यासाठी दिल्या जाणाऱ्या औषधोपचारात संप्रेरकयुक्त औषधं व इंजेक्शने वापरली जातात. अर्थात ही औषधं मर्यादित काळापुरती व वैद्याकीय सल्ल्यानेच घ्यायला हवी.
वंध्यत्व असलेल्या १० ते १५ टक्के स्त्रियांमध्ये गर्भाशयनलिका बंद असण्याची समस्या असू शकते. ‘ओव्ह्युलेशन’ वेळी – बीजांडकोशातून स्त्रीबीज बाहेर पडते व ते गर्भाशयनलिकेमध्ये (Fallopian tube) शिरतं. लैंगिक संबंधाच्या वेळी पुरुषाच्या शिश्नातून स्त्रीच्या योनीमार्गात शुक्राणू सोडले जातात. हे शुक्राणू शेपटीच्या सहाय्याने योनीमार्गातून गर्भाशयात व नंतर गर्भाशयनलिकेत पोहोचतात. गर्भाशयनलिकेत स्त्रीबीज व शुक्राणू एकत्र येतात. शुक्राणू स्त्रीबीजाचे फलन करतात व गर्भधारणा होते. गर्भाशयनलिका बंद असल्यास शुक्राणूंच्या मार्गात अडथळा निर्माण होतो, त्यामुळेे स्त्रीबीज व शुक्राणू एकत्र येऊ शकत नाहीत. जंतुसंसर्ग, एन्डोमेट्रीओसिससारखे आजार व पूर्वी झालेल्या शस्त्रक्रियांमुळे गर्भाशयनलिकेमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो, याचे निदान क्ष-किरण तपासणीमार्फत किंवा लॅप्रोस्कोपीने करता येते. गर्भाशयनलिकेत अडथळा सापडल्यास तो काढण्यासाठी शस्त्रक्रिया करतात अथवा कृत्रिम गर्भधारणेच्या तंत्राने (आयव्हीएफ-इन विट्रो फर्टिलायझेशन) गर्भधारणा करण्यात येते.
गर्भाशयातील फायब्रॉइड किंवा पॉलीपसारख्या गाठी व इतर दोष काही वेळेस स्त्रियांमधील वंध्यत्वासाठी कारणीभूत असतात. सोनोग्राफी, क्ष-किरण तपासणी व एमआरआयच्या सहाय्याने याचं निदान केलं जातं. औषधं आणि शस्त्रक्रियेद्वारे हे दोष दूर केले जातात. जननसंस्थेचा जंतुसंसर्ग, एन्डोमेट्रीओसिस व ऑटो इम्युन रोगासारख्या समस्यांमुळे गर्भधारणेस विलंब होऊ शकतो. यासाठी वेळीच उपचार करायला हवेत. वंध्यत्वाविषयीच्या काही बाबींची कारणमीमांसा आपण आजच्या लेखात केली. उर्वरित कारणं व वंध्यत्वाच्या आधुनिक उपचार पद्धतीविषयीची माहिती पुढील लेखात घेऊ या.
vaishalibiniwale@yahoo.com