६ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेल्या ‘आभासी समानता’ या आनंद पवार यांच्या लेखाला स्त्री आणि पुरुष वाचकांचाही भरघोस प्रतिसाद लाभला. अर्थात सगळीच्या सगळी पत्रे सविस्तर घेता येणे शक्य नसल्याने संपादित पत्रे प्रसिद्ध करीत आहोत. सगळ्याच वाचकांनी प्रामाणिकपणे आपली मते मांडताना पारंपरिक कुटुंब रचनेच्या, सामाजिक मानसिकतेच्या, कायद्याच्या मर्यादांवर बोट ठेवत  स्त्री-पुरुष समानता ही आता काळाची गरज आहे हे ठळकपणे व्यक्त केले आहे. खेद इतकाच की बहुतांशी पत्रांमध्ये काय करायला हवे हाच उपदेश आहे. मी किंवा आम्ही स्त्रीपुरुष समानतेसाठी काय प्रयत्न करतो आहोत, करणार आहोत हे फारच अभावाने आले आहे. मात्र संस्कारांची सुरुवात घरापासूनच हवी, बदल होतो आहे आणि समानता दूर नाही हा आशावादही अनेकांनी व्यक्त केला आहे. प्रत्येकांनी स्वत:पासून या बदलाला सुरुवात केली तरी या लेखाचे उद्दिष्ट साध्य होईल, असे म्हणता येईल.

 

स्त्रीने ठरवले तर..

आजच्या आधुनिक काळातही आपल्या समाजात स्त्रीची समानता आभासीच आहे. जी काही थोडीफार समता व स्वातंत्र्य स्त्रीला दिलेले दिसते, ते शिक्षणाने आलेल्या समाजभानामुळे, स्त्रीला झालेल्या तिच्या मानवी हक्कांच्या जाणिवेमुळे व कायद्यामुळे आणि एकंदर जगातच वाहणाऱ्या स्वातंत्र्य, समता इत्यादी तत्त्वांच्या विचारप्रवाहामुळे. परंतु मुळात जाऊन पाहिले तर सरंजामी वृत्तीतून येणारी पुरुषी वर्चस्वाची मानसिकता व त्यातून निपजणारी विवेकहीनता बदललेली नाही. उलट अंत:करण हेलावून टाकणाऱ्या प्रसंगी ती वाढलेलीच दिसते आणि तिने नृशंस हिंसेचे रूपही घेतलेले दिसते.

आपल्या समाजातील परंपरागत धारणांमुळे पुरुषी वर्चस्वाच्या मानसिकतेचा परिपोष तर होतोच पण त्यातून स्त्रीबद्दल पुरुषांच्या ठायी असूया निर्माण झाली आहे ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. स्त्री तिला लाभलेल्या कायदेशीर स्वातंत्र्यामुळे, शिक्षणामुळे व अंगच्या गुणवत्तेमुळे जे नेत्रदीपक यश मिळवत आहे ते पुरुषांना आपल्या वर्चस्वाला बसलेला धक्का वाटतो. मी पुरुषांकडून स्त्रीच्या गुणवत्तेविषयी आदराऐवजी असूयेने भरलेली व स्त्री-स्वातंत्र्याच्या संतापाने खदखदणारी अनेक विधाने ऐकली आहेत. या रोषाचे प्रकटीकरण पुरुषी वर्चस्व जिथे हमखास दाखविता येईल अशा बलात्कारात व स्त्रीवरील हिंसाचारात होते.

यावरील उपायांची सुरुवात स्त्रीने स्वत:पासूनच करायला हवी. पुरुषांनी केलेल्या विविध अन्याय व अत्याचारांपुढे ती मान का तुकवते? मुलांना घडविण्याचे काम स्त्रियांच्या हातात असते. तिने ठरवले तर पुरुषी वर्चस्वाची मानसिकता ती आपल्या कुटुंबात बदलू शकते. मात्र त्यासाठी स्वत:च्या मनातून ही पुरुषी वर्चस्वाची मानसिकता  पुसून टाकावयाला हवी.

– डॉ. सुरेखा बापट, नागपूर

 

सगळी जीवनशैलीच बदलावी!

पुरुषी वर्चस्वाची सुरुवात अगदी नवरा बायको एकमेकांना निवडतात तेथूनच होते. नोकरी करणारी स्त्री कायम घर आणि संसारही सांभाळते. या परंपरेला छेद दिला तरच पुरुषी वर्चस्वाची मानसिकता बदलू शकेल. त्यासाठी संपूर्ण जीवनशैलीच बदलली पाहिजे. घरातील मुलींना त्यांच्या आवडीचे शिक्षण दिले पाहिजे. शिवाय त्यांना शारीरिक सामथ्र्य कमावण्यासाठी, स्वत:चे संरक्षण स्वत:ला करता यावे यासाठी प्रशिक्षण दिले पाहिजे. शाळेमध्ये आठवडय़ातील काही तास पाककलेसाठी दिले पाहिजेत. रोजच्या आहारातील खाद्यपदार्थ सर्व विद्यार्थ्यांना करता आलेच पाहिजेत. हा

विषय सक्तीचा असावा. सायकल किंवा स्कूटर चालवणे, पोहणे ही कौशल्ये शाळेतच विकसित व्हावीत. त्यात मुलगा-मुलगी असा फरक केला जाऊ नये. मुलीचा व्यक्तिमत्त्व विकास झाला की तिला आपोआप समाज आदराने वागवेल. मुलाला लहानपणीच जर घरातील कामे करण्याची सवय लावली तर त्याची पुरुषी वर्चस्वाची मानसिकता आपोआप कमी होईल.

– रत्नाकर यादव धर्माधिकारी, कल्याण</strong>

 

माध्यमांतील स्त्री प्रतिमा बदलावी

प्रसारमाध्यमांमध्ये दाखवली जाणारी स्त्री प्रतिमा बदलणे ही काळाची गरज आहे असे तीव्रतेने वाटते. त्यासाठी या विषयाबद्दल संवेदनशील असलेल्या सर्वानीही ती प्रतिमा बदलण्यासाठी सतत दबाव आणत राहिले पाहिजे. टी. आर. पी. वाढविण्यासाठी परंपरागत स्त्री- प्रतिमेचे उदात्तीकरण करण्याचे प्रयत्न हाणून पाडायला हवेत.

– मेधा रानडे, पुणे

दुटप्पी भूमिका नष्ट व्हावी

सावित्रीबाई फुले, पंडिता रमाबाई आदी अनेक विदुषींवरील परंपरा तोडण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांवर झालेल्या जहरी टीका व मानसिक प्रहार हे पुरुषसत्ताक मानसिकतेचे विकृत स्वरूप सिद्ध करतात. हीच पद्धत थोडय़ाफार फरकाने आजही दिसून येते. हेच कर्तबगार स्त्रियांच्या चारित्र्यावर करण्यात येणाऱ्या टीकेवरून लक्षात येते. स्त्रीला उडण्यासाठी आकाश उपलब्ध करून दिलं गेलं तरी पक्षी म्हणून भरारी मारू देण्यापेक्षा पतंग बनवून त्याच्या दोऱ्या स्वत:च्या हातात ठेवण्याचा दुटप्पीपणा हे या पुरुषप्रधान समाजाचे वैशिष्टय़ जणू. नमूद करण्याची गोष्ट म्हणजे फक्त पुरुष हेच पुरुषप्रधान संस्कृतीचे घटक नसतात, तर या पुरुषप्रधान संस्कृतीला बळकट करणारा प्रत्येक घटक हा पुरुषप्रधानच असतो. म्हणूनच स्त्रियासुद्धा पुरुषप्रधान वृत्तीच्या असू शकतात. स्त्रियांचा लढा, त्यांचे प्रश्न याकडे केवळ स्त्रीवादी दृष्टिकोनातून न पाहता मानवतावादी दृष्टीने पाहिले तरच शोषण थांबून खरी समानता प्रस्थापित होईल.

– सोनाली पाटील, कोल्हापूर

इंटरनेटचा अतिरेक

स्त्री-पुरुष असमानतेसारख्या गोष्टीला जबाबदार आमची सडकी शिक्षणव्यवस्थाही आहे. तिथे फक्त आहे जीवघेणी स्पर्धा. शिक्षण दिले जाते फक्त नोकरी मिळविण्यासाठी. कुणालाही इथे शिकण्यासाठी, मानसिकता बदलण्याची गरज वाटत नाही. आता तर इंटरनेटचे युग आले आहे. चांगली गोष्ट आहे. पण त्याचा अतिरेक झाला आहे. यासंदर्भात एका संस्थेचं सर्वेक्षण बोलकं आहे. हायस्कूलचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत मुलं २० हजार तास इंटरनेट/ टीव्हीवर असतात. त्यात ते अंदाजे १५ हजार खून पाहतात. १२ हजार बलात्कार व  १ लाखाच्यावर पोनरेग्राफी, ड्रग्ज किंवा अल्कोहोलशी संबंधित विपणन पाहतात आणि मन विचलित करून घेतात. या गोष्टींचा मुलांवर परिणाम होतच नसेल का? शाळा-कॉलेजात लैंगिक शिक्षणाचा कुठलाही गंध नाही. घरातही लैंगिकतेवर बोललं जात नाही. जिथे आमच्या आई-बहिणीला चार दिवस मासिक पाळीच्या काळात दूर ठेवले जाते, तिची काळजी घेण्याचं शिक्षण दिले जात नाही तिथे हे सगळं बदलायचं असेल तर शैक्षणिक अभ्यासक्रमात बदल झाला पाहिजे.

– गणेश सानप, सिन्नर, नाशिक

 6-2स्त्रीनेच स्वत:ला वाढवत न्यावं

समानता म्हणजे स्पर्धात्मक बरोबरी नाही तर घरातील आर्थिक, समाजिक व कौटुंबिक निर्णय जे आत्तापर्यंत फक्त पुरुष घेत होता, त्या सर्व निर्णयांमध्ये स्त्रीचा सहभाग असणे. नोकरी केली, पुरुषांच्या बरोबरीने सर्व कामे केली. त्यांच्यासारखे कपडे घातले, पार्टीत दारू, सिगरेटही घेतली म्हणजे समानता येत नाही. बहुतांशी पुरुषांना निर्णय घेताना ‘मी किती शहाणा’ हे दाखवून द्यायचे असते. पण स्त्रीच्या कर्तृत्वावरही त्यांनी विश्वास दाखविला पाहिजे. स्त्रियांनीही स्वत:ची बौद्धिक क्षमता वाढवावी. प्रत्येक  अनुचित घटनेसाठी मेणबत्त्या पेटतातच असे नाही आणि प्रत्येक पीडितेला न्याय मिळतोच

असे नाही.

– संध्या गावीत, पुणे

 

मूल्याधारित शिक्षणाचे महत्त्व

पुरुषी वर्चस्व कमी करायचं असेल तर आपली मूल्ये, संस्कार मुलांमध्ये रुजवणे गरजेचे आहे. घरातील आजी-आजोबा मूल्याधारित शिक्षणाचे उत्तम स्रोत असतात. त्यांनी ही जबाबदारी आवडीने घेतली पाहिजे. तसेच त्यांना ती घेऊ दिली पाहिजे. मुलांचा संबंध शाळा व त्यामुळे समाज याच्याशी येतो. तिथे मुलांवर लोकशाहीनिष्ठ संस्कार केले जातात. स्वाभिमान, देशाभिमान, धर्मनिरपेक्षता, वैज्ञानिक दृष्टिकोन, संवेदनशीलता, समायोजकता आदी मूल्यांची जोपासणूक फक्त शाळेत न होता ती समाजातून पण झाली पाहिजे. ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या उमेदीच्या काळात आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेली असते. त्याचा उपयोग या संस्कारक्षम गटासाठी सजगपणे प्रभावीपणे केला पाहिजे. या संस्कारक्षम गटात पेराल ते उगवेल या उक्तीप्रमाणे चांगले संस्कारक्षम अनुभव मुलांना दिले पाहिजेत. विविध उपक्रम नृत्य नाटय़, पथनाटय़, सहली, क्षेत्रभेटी, विविध तऱ्हेच्या स्पर्धा यातून लोकशाही मूल्ये स्वातंत्र्य, समता, बंधूभाव मुलांच्या मनावर बिंबवली पाहिजेत.

– विजय चौधरी, मुंबई

 

पुरुषांचा पुढाकार महत्त्वाचा

पुरुषांनीही स्वत:ची मानसिकता तपासायला हवी. आपल्या वागण्यातील गफलत शोधायला हवी, स्वीकारायला हवी. स्त्रियांना दुय्यम, कमी समजण्याची मानसिकता बहुतांश पुरुषाच्या मनात लपलेली आहे. हे प्रथम कबूल करून बदलण्याचा प्रयत्न व्हायला हवा. पुरुषांची वर्चस्वाची मानसिकता बदलण्यासाठी अनेक पुरुषच पुढे येणे खूप महत्त्वाचे. स्त्रीकडे एक माणूस म्हणून, स्वतंत्र व्यक्ती म्हणून बघण्याचा दृष्टिकोन कमावला पाहिजे.

मग नेमकं काय करता येईल..?

पुरुषप्रधान व्यवस्थेचं वास्तव सर्व स्त्रियांना समजणे आवश्यक असून ते प्रत्येक स्त्रीपर्यंत पोहचवण्याची स्त्री संघटनांची जबाबदारी महत्त्वाची.   अन्यायग्रस्त स्त्रियांसाठी आधारगृहे काढण्याऐवजी त्यांच्यावर अन्याय अत्याचार होणारच नाहीत अशी समाजव्यवस्था असावी.

निसर्ग नियमानुसार नर-मादी वर्तनसंबंधाचा अभ्यास होणे आवश्यक.

मुलगा म्हणजे तो कसाही वागला तरी चालते ही मानसिकता प्रत्येक मातेने बदलायलाच हवी.

वयाच्या पहिल्या वर्षांपासून ते १६ वर्षांपर्यंत मुलामुलींसाठी लैंगिक शिक्षण देण्याचा अभ्यासक्रम बनवून ते देण्याचा धाडसी पण अतिशय आवश्यक प्रयत्न तातडीने होणे महत्त्वाचे. तसेच कुटुंबातील नातेसंबंध, स्त्रीजीवन, समाजातील परस्परसंबंध याचाही अभ्यासक्रमात समावेश करून तो सहृदयतेने नवीन पिढीपर्यंत पोहचवण्याची जबाबदारी आपली नाही का?

– नलिनी जुगारे, कोल्हापूर

 

पुरुषांचंही कौतुक

लिहायला घेतलं.. आणि बातमी आली, पी. व्ही. सिंधूने ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक कमावलं.. अगदी मनापासून अभिनंदन तिचं!! तसंच साक्षी मलिकचंसुद्धा! अर्थात बऱ्याच जणांना दीपा..साक्षी..ललिता या कोण असा प्रश्नही पडला असेल. पण त्याने त्यांना काहीच फरक पडलेला नाही, कारण त्यांच्या मागे उभे होते आणि आहेत.. अगदी कणखर मानसिकता असलेले पुरुष..हो पुरुष!!

पुलेला गोपीचंद.. गुरू असावा तर असा!! तीन महिने मोबाइलबंदी.. एक गुरूच करू शकतो.. पी.व्ही. रमन्ना, सिंधूचे वडील त्यांनी तर आपल्या मुलीसाठी आठ महिन्यांची सुट्टी घेतली. तिची तयारी चांगली व्हावी म्हणून. सुखबीर मलिक..साक्षीचे वडील.. ते तर डीटीसीमध्ये कंडक्टर..सगळ्यांचा विरोध झुगारून त्यांनी मुलीला कुस्तीपटू बनवलं.. असे किती आणि केवढय़ा पुरुषांची नावं घेऊ?  ज्यांच्या योगदानामुळे आज आपल्या देशातल्या मुली देशाचे नाव जगात गाजवताहेत.. हे सर्व मुलींनी ध्यानात घ्यावे. मी माझा ‘पुरुषी’ हात पुढे केला आहेच..मानसिकता बदलण्यासाठी तुम्हीदेखील करणार ना?

गालिबसुद्धा सांगून गेलाय..

उमर भर गालिब यही भूल करता रहा,

धूल चेहरे पे थी और आइना साफ करता रहा!!

– केतन धामणस्कर

दरी नक्की कमी होईल

प्रथमपासून महिलांना संरक्षणाचे धडे देणे, खेळांसाठी प्रोत्साहन देणे, राजकारणाचे प्रशिक्षण देणे, सध्या जसे रेशनकार्डावर स्त्रियांचे नाव प्रथम आहे तसेच ७/१२ वर करणे, शहरातली घरं नवरा-बायकोच्या नावावर असणे आवश्यक आहे. ‘चतुरंग’मधून प्रसिद्ध होणाऱ्या ‘तिच्या केबिनमधून’ अधिकारी स्त्रियांनीही आपले अनुभव सांगून आवश्यक ती मदत करून महिला उद्योजिका घडवाव्यात. तसेच अशी झेप घेऊ पाहणाऱ्या स्त्रियांना घरच्यांनीही सहकार्य करावे. स्त्री-पुरुषांमधील दरी हळूहळू नक्की कमी होत जाईल.

– विवेक जोशी

 

धोक्याचा इशारा

कोपर्डी येथील बलात्कार व खुनाच्या घटनेने संपूर्ण समाजमन ढवळून निघत असताना पुण्यात विमाननगर येथे दोन पंधरा वर्षांच्या शाळकरी मुलींनी आत्महत्या केल्यामुळे सामाजिक वातावरण सुन्न झाले. बागडण्याच्या वयात दोन्ही मुलींनी केलेल्या आत्महत्येचे कारण म्हणजे त्यांची प्रेमप्रकरणे आई-वडिलांना माहीत होणं. या आत्महत्या म्हणजे सुदृढ सामाजिक वातावरण, लैंगिक शिक्षण, संवादी कौटुंबिक वातावरण व निकोप पालकत्वाला धोक्याचा इशारा आहे. पालकांनी जाणीवपूर्वक संवेदनशील पुरुषी मनेही घडवायला हवीत.

– ममता नंदनवार, पुणे

 

उलट दिशेने प्रवास

कळप-समूह-समाज ही आजवरची कालसंक्रमणा विसरून उलट दिशेने भूक आणि वासना या आदिम प्रेरणेपर्यंत आपण प्रवास करतो आहोत, असे सद्यस्थितीवरून वाटते. बाहेरच्या रावणाची भीती घालून स्त्रीसाठी परंपरेच्या लक्ष्मण रेषा आखल्या गेल्या. मातृत्वाचे गोडवे व अन्नपूर्णेचे वरदान यांच्या अवाजवी महतीने तिला चूल व मूल यामध्येच आजन्म कैद केले. संसाराच्या गाभाऱ्यात एकदा प्रतिष्ठापना झाली की तिने आयुष्यभर देवपण ‘सोसायचं’ हा दंडकच झाला. तिची देवता म्हणून पूजा करण्याऐवजी, माणूस म्हणून आदर केला तर तिच्या अस्तित्वाला खरा अर्थ येईल.

– डॉ. निर्मळे सर्वदा कृष्णा, कोल्हापूर

 

बंधनं फक्त मुलींना का?

आपल्या समाजात मुलींना सगळी बंधने असतात. मुलग्यांना बंधने नसतात. असे व्हायला नको. सेक्सचे दमन करणे हे स्त्रीला पुरुषांच्या तुलनेने शक्य असते. (सोपे असते असे नाही) शिवाय लैंगिक भावनांचे दमन करणे, आटोक्यात ठेवणे हे मुलग्यांना आपण शिकवत नाही. आपण घरात कसे वागतो यावरून मुले शिकतातच पण बाहेरच्या मित्रांचा त्यांच्या मनावर प्रभाव पडतो हे लक्षात घ्यायला हवे. मुलाचे मित्र, नाक्यावरच्या त्यांच्या गप्पा यावर लक्ष द्यायला हवे. छेडछाड करणाऱ्या मुलांचे प्रबोधन, इतर समजूतदार मुलांकडूनही होणे जरुरीचे आहे.

– डॉ. अरुण साळुंके, धुळे

 

सवलती, अधिकारांची माहिती हवी

खेडय़ापाडय़ांतून मुलींच्या शिक्षणाबाबत अधिक जागृती व्हायला हवी. त्यासाठी शिक्षकांनी किंवा समाजातील सुजाण नागरिकांनी घरोघरी, गावोगावी जाऊन पालकांमध्ये जागृती निर्माण केली तर खेडय़ातील मुलीही अधिकाधिक शिक्षण घेऊ शकतील. शासनाने मुलींना भरपूर सवलती दिलेल्या आहेत. पण त्यांची माहिती पालकांना नसते; त्याबाबत सातत्याने पाठपुरावा केला तर नक्कीच मुलींच्या शिक्षणाबाबत जागृती होऊन समानता वाढू शकेल.

– सुनेत्रा गायकवाड, पुणे

 

स्वत:च जागरूक राहावं

बलात्काराच्या गुन्ह्य़ासाठी फाशीच्या शिक्षेची मागणी जोर धरू लागली आहे, पण मग बलात्काराला आणि खुनालाही फाशीच मग पीडितेला संपवलेलंच बरं ही मानसिकता सध्या वाढू लागली तर शिक्षेचा धाक कसा राहणार? या सर्वातून हेच दिसतं की, अशी कृत्यं करण्यास धजू पाहणाऱ्यांची मानसिकता बदलण्याची शक्यता कमी असते. हे कटू सत्य पचवून समाजानं स्त्रियांना सुरक्षित जीवन जगण्याचा समान हक्क अबाधित राखण्यासाठी जे करता येईल ते केलं पाहिजे. पालकांनी आपल्या मुलीच्या सुरक्षेसाठी स्वत:च जास्तीत जास्त जागरूक राहण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी मार्गदर्शन करणं, शाळेत जाईपर्यंतची सुरक्षित वाहतूक व्यवस्था, सुरक्षित शौचालयं, यांची सोय शाळांना पालकांच्या सहकार्यानं करायला लावणं, योग्य ठिकाणी सीसीटीव्ही बसवणं बंधनकारक करणं, विनयभंग, लैंगिक छळाच्या तक्रारींची दखल घेऊन त्यांची नि:पक्षपातीपणे शहानिशा करण्यासाठी विशेष समिती नेमणं, प्रतिबंधक उपायांच्या अंमलबजावणीसंबंधात अहवाल तपासणं हे सारं करणं ही काळाची गरज ठरली आहे. खरं म्हणजे लैंगिक अत्याचार प्रतिबंध करणारा कायदा बालकल्याण समितीपुढे अत्याचाराचं प्रत्येक प्रकरण आणण्यास बंधनकारक करणारा आहे, पण बालकल्याण संरक्षण अधिकारी, महिला बालविकास खातं यांच्यात नसलेल्या साहचर्यामुळे त्याची अंमलबजावणी थंडावली. लैंगिक छळ प्रतिबंधक २०१३चा कायदा शाळकरी मुलींच्या बाबतीत लागू असल्याचं किती जणांना माहीत असेल कुणास ठाऊक? त्यासाठी जलदगती न्यायालये आवश्यक आहेत.

– श्रीपाद पु. कुलकर्णी, पुणे

भावनिक सक्षमता हवी

समानतेचा विचार रुजवण्यासाठी शाळांची भूमिका महत्त्वाची ठरते. हा विषय तिसरी-चौथीपासूनच घ्यावा असे मला वाटते. आजच्या मुलांचा बुद्धय़ांक मोठा असतो, पण भावनांक (ई.क्यू.) मोठा नसतो. समाजाच्या पुढच्या पिढय़ा भावनिकदृष्टय़ा सक्षम बनवायच्या असतील तर त्याची सुरुवात शाळेपासूनच व्हायला हवी.

– स्मिता मदन, पुणे

आदर्शाची कल्पना बदलायला हवी!

आपल्याकडे आदर्श पुरुष व आदर्श स्त्री यांच्या संकल्पना अगदी विरोधाभास दाखवणाऱ्या आहेत. ज्या पुरुषाकडे नेतृत्व कौशल्य आहे, आत्मविश्वास, धडाडी आहे तो आदर्श पुरुष व स्त्री मात्र खाली मान घालून जगणारी, वडीलधाऱ्यांचे ऐकणारी, कुटुंबासाठी खपणारी ती आदर्श. खरं तर स्त्रिया या पुरुषांची प्रेरणा ठरतात, जेणेकरून त्यांना जग जिंकायला स्फुरण मिळते. स्त्रीला स्वातंत्र्य हवे ते नेमके कोणापासून? पिता, पती, संसार की समाज? म्हणजेच स्त्रियांनी स्वत:च्या स्वातंत्र्याच्या अपेक्षांची निश्चिती करायला हवी. समाजाच्या मानसिकतेत बदल महत्त्वाचा आहे. जोपर्यंत मानसिकता बदलत नाही तोपर्यंत आपण मानलेली अथवा जाणलेली समानता प्रत्यक्षात येणे अवघड आहे. समानता म्हणजे दोघांनी एकमेकांच्या प्रगतीसाठी पोषक वातावरणनिर्मितीचा प्रयत्न करणे व निर्भेळ सहजीवन अनुभवणे. प्रत्येक स्त्री व पुरुषाने असे करण्याचा प्रयत्न केला तर खऱ्या अर्थाने समानता अस्तित्वात येईल.

– साईली पोखरकर, नवी मुंबई

दबावगट व्हावेत

स्त्रीवाद म्हणजे स्त्री विरुद्ध पुरुष अशी संकल्पना समाजात सहजपणे दिसून येते, सर्वप्रथम हे चित्र बदलले पाहिजे, स्त्रीवाद पुरुषांना दोष देत नाही; पुरुषसत्ताक व्यवस्थेला दोष देतो. स्त्रीवादी म्हणजे पुरुषांविरुद्ध बंड करणाऱ्या कुटुंबव्यवस्था मोडीत काढणाऱ्या शहरी व सुशिक्षित स्त्रियांची लढाई हे चित्र जाणीवपूर्वक बदलण्यासाठी नव्याने व्यूहरचना केली गेली पाहिजे. स्त्रियांचे आंदोलन म्हणजे पुरुषांविरुद्ध सूड उगवणे नाही. ही दोन गटांमधली लढाई नसून, दोघांचे हितसंबंध एकच आहेत. याचे लक्ष्य परस्परांचा सन्मान करणे असून ते समतेच्या पायावर उभे आहे.

 – मनोज वैद्य, बदलापूर

आधुनिक साधनांचा वापर

महिलांना भोगवस्तू दाखवणाऱ्या मनोरंजनात्मक कार्यक्रमांवर कडक नियंत्रणे ठेवली गेली तर स्त्री पुरुषातील समानतेचा असणारा आभास कमी होण्यास मदत होईल. शिवाय स्वत:ची शारीरिक भूक शमवण्यासाठी जी वैयक्तिक स्वरूपातली आधुनिक साधने उपलब्ध झालेली आहेत त्यांची माहिती लोकांना करून देणे हा एक उपाय दिसून येतो.

– प्रसाद भावे, सातारा

शिक्षणाची दारे उघडली जावीत

स्त्री-पुरुष समानता शिक्षणाद्वारे, टीव्ही मालिकांमधून, नाटकांद्वारे, वाङ्मयाद्वारे सतत सामोरी यायला हवी. विलंबाने का होईना परिवर्तन घडेलच, कारण मानव हा परिवर्तनशील प्राणी आहे. स्त्रियांनीही अन्याय सहन न करता संघर्ष केला पाहिजे. वेळप्रसंगी गृहत्याग करून स्वबळावर जीवन जगण्याची हिंमत बाळगली पाहिजे.  पैशांसाठी अंगप्रदर्शन करण्यावर बंदी आली पाहिजे. लग्न ठरवतानाच मुलींनी समानतेची मागणी केली पाहिजे व लग्नानंतर त्याचे पालन झाले नाही तर नवऱ्याला धडा शिकवायची हिंमत बाळगली पाहिजे.

– नलिनी सोमण, अकोला</strong>

कौटुंबिक सुसंवाद महत्वाचा

गुन्हेगारी मानसिकतेला जबाबदार फक्त अत्याचार करणारी व्यक्ती नसते तर ती मानसिकता तयार करणारा प्रत्येक घटक असते. त्यासाठी अशा मानसिकतेला समाजातील सर्व घटक शासन, न्यायव्यवस्था, कुटुंब जबाबदार असतात. म्हणून पुरुषानेच ही मानसिकता मनातून काढून टाकणे गरजेचे आहे. अर्थात यासाठी स्वत:च्या मनावर संतुलन असणे महत्त्वाचे. यासाठी मनन, चिंतन व सुसंवाद महत्त्वाचा आहे. जो कुटुंबातून नाहीसा होत आहे.

– विश्वास चंद्रकांत कांबळे

कल्याणकारी योजना वाढवाव्यात

समाजमन मुलांच्या बाबतीत झुकतं असल्यामुळे मुलांची मानसिकता मुलींच्या प्रगतीच्या आड येऊन मुलींचा द्वेष करणं, सूड उगवणं आदी नकारात्मक राहिली आहे. यावर उपाय म्हणून आपल्याला या प्रश्नाच्या मुळाशी जावं लागेल. मुलींसाठी कल्याणकारी योजना राबवताना आपल्याला त्यांच्या मातापित्यांनाही कल्याणकारी योजनेचे लाभ मिळतील हे पाहावं लागेल. त्यांना नोकरीत पदोन्नतीसाठी प्राधान्य, धंद्यासाठी कर्ज मिळताना प्राधान्य, वृद्धपणात सुरक्षित भविष्य ठेव योजना आदी योजना विचारपूर्वक राबवल्या गेल्या तर मुलीच्या जन्मदात्यांना त्यांची लेक भाग्यलक्ष्मी वाटून सुरक्षित वाटेल आणि घरातूनच मुलींना महत्त्व लाभेल. आपोआपच मुलांना घरातून पुरुषी वर्चस्वाचे धडे मिळणं बंद होईल.

– गौरलता देशपांडे

संवाद वाढायला हवा

प्रत्येक घरात परस्परांमधील संवाद वाढविणे हेही महत्त्वाचे आहे. आज आपण घरात काही वेळ एकत्र असतो, पण एकटय़ानेच मोबाइल, कॉम्प्युटरवरून तिसऱ्याच कोणाशी तरी बोलत असतो नाही तर सर्व जण मिळून टीव्ही पाहतो. मुळातच आज गतिमान जीवनशैलीला सामोरे जात असताना आपण कुटुंबीयांबरोबर कमी वेळ असतो. पूर्वी मुलांचे सामाजिकीकरण, मूल्यशिक्षण कळत- नकळत घरातच होत असे. आजही ते घरातच व्हायला हवे आणि पालकांनीच ती जबाबदारी कौशल्याने पार पाडायची आहे. त्यासाठी मुलांबरोबर संवाद होणे महत्त्वाचे आहे. सामाजिक बांधिलकीची जाण, नकार पचवणे, जबाबदारीचे भान, प्रामाणिकपणा, दुसऱ्याच्या दु:खात सहभागी होण्याची मानसिकता, व्यक्तिमत्त्वातील लवचीकता या गोष्टी कळत नकळत, जाता जाता, सहजपणे जाणवून देण्याच्या असतात. लैंगिक आनंद ही गरज असली तरी ती जीवनाची इतिकर्तव्यता नाही. बळजबरीने, ओरबाडून घेतलेले, सुख निखळ समाधान देत नाही. इतरही अनेक गोष्टीत समाधान, आनंद आहे. त्याचाही आस्वाद घ्यायला शिकवणे हे पालकांचे कर्तव्य आहे.

थोडक्यात, आपल्या भावना ओळखणे, दुसऱ्यांच्या जाणणे, भावनांचे प्राधान्यक्रम ठरवता येणे, त्यांचे व्यवस्थापन करणे, योग्य प्रकारे त्या हाताळणे व व्यक्त करणे.. याचे महत्त्व मुलांना पटवून देण्यात पालकांनी यशस्वी झाले पाहिजे.

– प्रा. डॉ. मुक्ता  पुरंदरे, पुणे

कुटुंबाची जबाबदारी

मुलगा आणि मुलगी यांच्यात भेदभाव न करण्याचे शिक्षण प्रथम पालकांना द्यायला हवे. आपल्याच कुटुंबातील स्त्री-सदस्य (मग ती मुलगी, बहीण, आई, आजी, आत्या, काकू, मावशी, मामी इतकंच काय पण शेजारीण, मोलकरीणसुद्धा) यांच्याबरोबर त्यांचा योग्य तो मान राखून वागण्याचे शिक्षण अगदी बाळकडू पाजल्यासारखे, मुलगा जरा कळत्या वयात आल्याबरोबर, पूर्ण कुटुंबाने दिले पाहिजे. यामध्ये कुटुंबातील स्त्रियांनीसुद्धा सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. यासाठी समाज प्रबोधन सातत्याने करण्याची आवश्यकता आहे. स्त्रियांची आत्मशक्ती जागृत झाली तरच पुरुषी वर्चस्वाच्या मानसिकतेला लगाम लावता येईल.

– ऊर्मिला परांजपे, तळेगाव- दाभाडे

.. तरच बदल शक्य

स्त्रीवर पिढय़ान्पिढय़ा केलेल्या सोशिकतेच्या संस्कारामुळे हे असेच चालणार हे गृहीत धरूनच ती समाजात वावरत असते. आपापसात स्त्रिया चर्चा करतानासुद्धा ‘माझ्या नवऱ्याला साधा चहासुद्धा बनवता येत नाही’ हे अभिमानाने सांगतात तेव्हाच त्या पुरुष वर्चस्व स्वीकारत असतात. त्यातही एखादी स्त्री परंपरेला छेदू पाहात असेल तर तिला नावे ठेवणार. जेव्हा स्त्री व पुरुष भेद त्यांच्या सामाजिक जडणघडणीतूनच, मनातून नष्ट होईल तेव्हाच बदल शक्य होईल.

– संध्या चं. शिंदे, ठाणे

असभ्य पोस्टस् तिथेच थांबवा

पुरुषी वर्चस्वाच्या मानसिकतेला खतपाणी घालणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. काही पारंपरिक, काही नव्या काळानुसार फोफावलेल्या. त्यातलीच एक गोष्ट म्हणजे स्त्रियांवरील विनोद. समाजमाध्यम हे मनावर परिणाम करणारे खूप महत्त्वाचं साधन आहे. विनोद वा वॉट्सअ‍ॅप मेसेजमधून स्त्रीचं सातत्याने रंगवलं जाणारं चित्र पुरुषांच्याच नाही तर स्त्रियांच्या मनातही सतत नकारात्मक प्रतिमा ठसवत राहातं. याविषयी मी काय करू शकते? तर किमान यातल्या असभ्य, पांचट विनोदांना मी तरी पुढे ढकलणार नाही एवढा निर्णय घेऊ  शकते. एखाद्या अशा गमतीशीर विनोदाला खळखळून दाद देतानाच तो विनोद तिथेच सोडून सगळ्याच बायका या अशाच असतात असा टॅग मी मनात तयार करणार नाही, याची मी काळजी घेऊ  शकते.

– रश्मी वारंग

निषेध हा हवाच

व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून चांगल्या संस्काराचे, नीती मूल्यांचे व्हिडीओ तयार करून दाखवले पाहिजेत. व्यसनांचे समर्थन, शिक्षकांवरचे विनोद, अतिरेकी धाडसाचे कौतुक बंद झाले पाहिजे. टीव्हीवरच्या अनेक कार्यक्रमातून अशा गोष्टीचा तीव्र निषेध करायला हवा. प्रसार माध्यमांनी जाणीवपूर्वक तसे प्रयत्न केले पाहिजे.

– प्रा. डॉ. श्रुतीश्री  वडगबाळकर

बदल होतो आहे..

स्त्री पुरुष समानतेचे महत्त्व मुला-मुलींना पटवून देण्यासाठी मात्र काही पद्धतशीर प्रयत्न आईवडिलांकडून होताना दिसत नाहीत. मुळात कुठलेच सामाजिक प्रश्न कुटुंबात चर्चेसाठी घेतले जात नाहीत. उलट ते विषय त्याज्यच समजले जातात. भारतीय समाज व्यवस्थेत कुटुंब संस्थेला फार महत्त्व असल्यामुळे कोणतेही धाडसी निर्णय घेताना देखील आपले कुटुंब लोकापवादाला बळी पडू नये अशी मुलामुलींची प्रामाणिक इच्छा असते. या सगळ्याचा परिणाम म्हणून आज स्त्री पुरुष समानतेबद्दल जे आभासी चित्र किंवा वास्तव आहे ते पूर्णपणे पुसून जाण्यासाठी अजून बराच काळ वाट पहावी लागेल पण त्या दिशेने समाजाची वाटचाल अगदी धीम्या गतीने का होईना, पण निश्चित चालू आहे.

– मोहन गद्रे, कांदिवली

घरातूनच सुरुवात

लिंगभेदाची जाणीव पुसण्यासाठी घरातूनच सुरुवात व्हायला हवी. समाजात मुलींना अधिक सवलती देऊन आजवरच्या स्त्रियांवरील अन्यायाची भरपाई केली गेली पाहिजे. घरातील स्त्रीपुरुषांमध्ये भेदभाव संपवून आपल्या घरातील मुलामुलींमध्ये समानता वाढीस लागेल. स्त्री पुरुषांमध्ये बौद्धिक, मानसिक पातळीवर कुठेही कमतरता नाही. त्यामुळे स्त्री आणि पुरुष हे घरात, समाजात, लोकशाहीत समान पातळीवरच आहेत. हेच सत्य आहे.

– सुलोचना मुखेडकर

रस्त्यावर उतरण्याची गरज

सर्व बाबतीत आपण कायदा व शासन यांच्यावर अवलंबून न राहता समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेने सर्व संस्था, तरुण वर्ग, महिला यांनी एकत्र येऊन ही मानसिकता बदलण्यासाठी आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. त्यासाठी प्रत्येकांनी विचार करायला हवा.  बदल नक्की घडेल.

– रेखा कमळापूरकर, डोंबिवली

म्डॉक्टरांनीही पुढाकार घ्यावा

स्त्री-पुरुष आभासी समानता नको असेल तर मुलगा झालाच नाही तर त्यात दोष स्त्रीचा नाही, याचा प्रचार आता डॉक्टरांनीच खडोपाडी जाऊन जास्तीत जास्त करायला हवा. कायद्याने मुलींना आई-वडिलांच्या मालमत्तेत समान हिस्सा मिळतो. याचा काहीवेळा मुलींना त्रासच होतो. काहीवेळा भावाला बहीण वाटेकरी झालेली आवडत नाही, तर काही ठिकाणी या मालमत्तेसाठी सासरचे लोक मुलीला त्रास देतात, हे बदलणे आवश्यक आहे.

– वासंती सिधये, पुणे

 शिस्त-संस्कारात भेद नको

लैंगिक आक्रमकता, बेदरकारपणा, व्यसन आदी गोष्टी जैविक नाहीत. पुरुष म्हणून वाढवताना कळत नकळत झालेल्या संस्कारांमुळे आहेत, त्याचा बीमोड करण्याकरिता मुलांच्या लहानपणापासून तयारी करावी लागेल. व्यक्ती मुलगा असो वा मुलगी, लिंगावरून शिस्त-संस्कारात भेदभाव नकोतच.

– प्रज्ञा राजोपाध्ये, पुणे

सोच बदलो..

निरांजन पेटवण्यासाठी तूप व वात दोन्ही आवश्यक आहे. तसेच सुदृढ समाज निर्माण होण्यासाठी मुलगा व मुलगी हे दोघेही आवश्यक आहेत. त्या दोघांनीही हातात हात घालूनच पुढे जायला पाहिजे. या वर्षीच्या रिओ ऑलिम्पिकमध्ये सिंधू व साक्षी यांनी देशाचे नाव त्यांच्या मेहनतीने मोठे केले आहे. म्हणजेच स्त्रियाही कोणत्याच बाबतीत कमी नाहीत. तेव्हा ‘सोच बदलो, नजर बदलो तो नजरीया बदलेगा’.

– प्रियंका जोशी, ठाणे

पुरुषांनीच बलात्कारांना विरोध करावा

बलात्काराचा विरोध करताना जास्तीत जास्त पुरुषांनी पुढे यायला हवे. बलात्कार हा सामाजिक आणि कौटुंबिक प्रश्न आहे. कौटुंबिक पातळीवर तुमचा विकास होत असतो. बलात्कार ही घटना होऊ नये म्हणून कायद्याचा धाक वाटेल असे कठोर कायदे करावेत व जलदगती न्यायालयात हे खटले चालवावेत.

– सुप्रिया सोळांकुरे, निगडी

 

 स्वरंक्षणाचे धडे अनिवार्य

स्त्रियांवरील अत्याचाराचा विचार करता हे सत्य आहे की शारीरिक ताकद कमी पडल्याने तिच्यावर अत्याचार होऊ शकतो वा होतो कारण बहुसंख्य स्त्रिया स्वसंरक्षणाचे शिक्षण घेत नाहीत. स्त्रीशिक्षण, स्त्रीअर्थार्जन हे गरज म्हणून घडले ते परिवर्तन नव्हे कारण पुरुषांची, समाजाची वा स्त्रियांची स्वत:चीही मानसिकता बहुतेकदा जुनीच दिसते. या बदलामागच्या प्रेरणा आर्थिक आहेत. मानसिक नाहीत म्हणूनच बदल घडायचा असेल तर तो आधी मानसिक पातळीवर व्हायला हवा.

– तेजश्री, माटुंगा

निकोप दृष्टिकोन हवा

मुलांच्या पर्यायाने पुरुषांच्या मनात स्त्रियांबद्दल एक ‘माणूस’ म्हणून निकोप दृष्टिकोन रुजायला हवा. घरात, शाळेत, समाजात, ऑफिसमध्ये त्याची रुजवात व्हायला हवी. त्याचबरोबर मुलींच्या-स्त्रियांच्या मनातली त्यांची ‘शारीर’ भीती काढायला हवी. शरीर आहे, ते मनासह फुलण्यासाठी, स्वच्छंदपणे बागडण्यासाठी, हे आपण मुलींना शिकवायला हवं.

– पूनम कांबळे, बाशी-सोलापूर

कडक र्निबध हवेत

महाविद्यालयाच्या आसपास सिगरेट, तंबाखू, गुटखा व दारू यावर अतिशय कडक र्निबध असायला हवे. शासनाने शिशुवर्गापासून ते कॉलेजपर्यंत अध्यात्म हा विषय अनिवार्य – ठेवायलाच पाहिजे. पुरुषांनीही पुरुषी अभिमान, अहंकार बाजूला ठेवून स्त्रीबद्दल आदर व प्रेमभावना कशी वाढेल याची काळजी घ्यायला हवी व याची सुरुवात आपण आपल्या घरापासूनच करायची आहे म्हणजे समानता येण्यास काहीच अवघड नाही.

– किशोर श्रीवर्धनकर, नवी मुंबई

 

1111

माणूसपण वाढावं

मूल वाढत असताना, आपली देहबोली, खाणं, पिणं, कपडे, शब्द- कौतुकाचे किं वा रागाचे, घरकाम, बाहेरची कामं, संस्कार या साऱ्यातून  ते माणूस म्हणून वाढणार आहेत याची जाणीव ठेवावी. परखडपणे बोलणाऱ्या वागणाऱ्या मुलीला पुरुषी, उद्दाम अशी विशेषणे न लावता तिचा माणूस म्हणून आदर करावा. दोष, चुका दाखवतानासुद्धा माणूसपणाच्या नात्यातून दाखवाव्यात.

– ललिता पांडुरंगे, सोलापूर

योनिशुचितेचे अवडंबर दूर ठेवा

निसर्गात कोणतीही गोष्ट साचून राहिली की सडते. प्रवाहीपणा व बदल हा निसर्गाचा नियम आहे. पण आपली जातिसंस्था, कुटुंबसंस्था, विवाहसंस्था समाजातील रूढी परंपरा गतकालानुगतिक जशाच्या तशा आहे व आतल्या आत सडत आहे. काळ बदलला तसे संदर्भही बदलले. या सर्वामध्ये बदल करून बदलत्या समाजरचनेप्रमाणे सुटसुटीत प्रवाहित व काळानुरूप करण्याची गरज आहे. म्हणूनच पुरुष वर्चस्व झुगारण्याची सुरुवात कुटुंबातील स्त्रियांनाच करावी लागेल.

वैचारिक दुर्बलता मागे टाकून प्रगतीची उत्तुंग झेप सर्वसामान्यांनी घेण्यासाठी योनिशुचितेचे अवडंबर दूर करून नैसर्गिकतेने जगणे आवश्यक आहे. एखादी घटना घडली तर तो अपघात समजून योनिशुचितेला महत्त्व न देता सहजपणे इतर दुर्घटनांप्रमाणे त्याकडे बघावे. अर्थात त्यासाठी मानसिक तयारी करणे आवश्यक आहे.

– ज्योती तळवडेकर, हेमलकसा

जाणीव जागृती गरजेची

राज्य घटनेने स्त्रियांना समानतेचा दर्जा प्राप्त झाला आहे. परंतु मोजक्याच स्त्रियांनी या समानतेचा फायदा घेत आयुष्यात यशाची उंच शिखरे गाठली आहे. या समानतेबाबतची जाणीव-जागृती आज किती स्त्रियांपर्यंत पोहचली असेल? अजूनही तळागाळातल्या स्त्रिया पुरुषी वर्चस्वाखाली जीवन जगताना दिसतात. म्हणूनच स्त्रियांना जागरूक करण्यासाठी प्रबळ कायदे व त्यांच्या कठोर अंमलबजावणीची धुरा सरकारने चोखपणे राबवणे अगत्याचे आहे. कारण कायदे करून ही आभासी समानता फक्त कागदावरच राहते. हे वास्तव आहे.

– संजयकुमार मोटघरे, अमरावती</strong>

निकालांसाठी कालमर्यादा हवी

स्त्रीविषयक काही कायद्यांमध्येही यथोचित बदल करण्याची आज गरज आहे. स्त्रीवर कुठलाही अत्याचार झाला असला तरी तिचे स्टेटमेंट मॅजिस्ट्रेटसमोरच घ्यावे. त्यामुळे नंतर ते मागे घेण्यासाठी येणारा दबाव अथवा आर्थिक लालूच यासारखे प्रसंग टाळता येतील. बलात्कारांसारख्या सर्व खटल्यांना निकालात काढण्यासाठी कालमर्यादा हवी नाही तर असे खटले वर्षांनुवर्षे भिजत राहतील. समाजाच्या संरक्षक यंत्रणांवर सरकारचा वचक असावा. विशेषत: पोलीस. स्त्री सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली गेली तर पुरुषी वर्चस्व आपोआप कमी होईल.

– गीता उपोनी 

शोषकाची मानसिकता बदला

‘पितृसत्ताक पद्धतीची समाजरचना व त्याचे स्त्रियांवर होणारे परिणाम’ हा गेली अनेक दशके चर्चा आणि संशोधनाचा विषय राहिला आहे. या समाजरचनेची मुळे अत्यंत खोलवर रुजली असल्याने, या प्रश्नावर मात करण्यासाठी विविध पातळीवर व या प्रश्नाशी संबंधित विविध घटकांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारची ‘सत्ता’ व त्यातून निर्माण होणारी ‘वर्चस्ववादी व श्रेष्ठत्वाची भावना’ यांचा अतूट संबंध आहे. अशा प्रकारच्या सत्तेतूनच एक प्रकारची उतरंड

निर्माण होऊन, शोषक व शोषित असा वर्गीय भेद सुरू होतो. असा भेदभाव नाहीसा करायचा असेल तर सर्वाना समान लेखणारा व सत्ता विभाजनावर विश्वास असणारा वर्ग उदयाला यायला हवा. त्यासाठी शोषकाची मानसिकता बदलण्याबरोबरच, शोषित असलेल्या वर्गामध्ये आत्मभान निर्माण करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

– कौस्तुभ तिलोत्तमा सोमकांत, लातूर

विचारांची आमूलाग्र प्रगल्भता हवी

स्त्रियांचे दुय्यमत्व फक्त पुरुषांनीच नाही तर स्त्रियांनी आणि समाजानेसुद्धा इतके गृहीत धरले आहे की, त्यातून बाहेर पडायचे तर प्रचंड मानसिक तयारी आणि विचारांची आमूलाग्र प्रगल्भता आवश्यक ठरेल. भिन्नलिंगी आकर्षण हे नैसर्गिक असून त्याची योग्य शास्त्रीय माहिती, विवेक आणि संस्कार यांच्या आधारे त्यांची योग्य हाताळणी करणे जर मुलांना वेळीच शिकवले तर ती हिंसक आणि हेकट वृत्तीची होणार नाहीत. समोरच्या व्यक्तीच्या इच्छेला मान देता आला पाहिजे. पालक, शिक्षक आणि समाज यांचा सहभाग यात खूप महत्त्वाचा आहे.

– स्मिता वैद्य

स्त्रीचा सन्मान राखावा

चित्रपट आणि जाहिरातींमध्ये स्त्रीला उपभोग्य वस्तू असल्याप्रमाणेच दाखवलं जातं. सोशल मीडियावरसुद्धा अश्लील संदेश फिरत असतात. निदान सोशल मीडियावरील विकृत संदेश फारवर्ड न करणं यासारख्या गोष्टी प्रत्येकाला निश्चितच करता येतील. त्यातून स्त्रीचा आत्मसन्मान जपला जाईल

– नेहा खंदाडे, बुलढाणा

मदतीचा हात समोर करा

दुष्ट प्रवृत्तीच्या मानसिकतेला कुठे ना कुठे तरी आळा घातला पाहिजे. यासाठी आपणच प्रयत्न केले पाहिजे. जेव्हा आपण आपला एक हात समोर करू तेव्हाच अनेक हात आपल्या मदतीसाठी समोर येईल. आपल्या मुलांबरोबरचा संवाद मोकळा हवा तरच ते आपल्याला शाळेतील तसेच बाहेरील गोष्टी स्पष्टपणे सांगू शकतील. त्यांच्यावर काही अन्याय-अत्याचार होत असल्यास ते न घाबरता येऊन सांगतील. शिवाय त्यांच्यावर वायफळ खर्च न करता पैशाचा वापर योग्य त्या ठिकाणी कसा करावा हे त्यांना शिकविले पाहिजे.

– स्विटी सावसाकडे, चंद्रपूर

पुरुषांनी स्वत:लाही प्रश्न विचारावेत

प्रत्येक घरातील शहाण्या पुरुषाने आपण आपले परीक्षण करावे. काही प्रश्न स्वत:लाच विचारावेत. रोजच्या बोलण्या-वागण्यात आपण आपल्या घरातील स्त्रियांना (आई, बहीण, मुलगी, बायको) किती न्याय देतो? किती समान वागवतो? त्यांचं उत्तर आपोआपच मिळेल. स्त्री कितीही शिकली, कितीही पैसा कमविला तरी तिला चार चार भिंतींच्या आत जी वागणूक मिळते ती अनेकदा वेगळी नसते. त्यासाठी वाढत्या वयातल्या मुलांना विश्वासात घेऊन, त्यांच्याशी संवाद साधून, चांगले-वाईट यातील फरक निदर्शनास आणून देण्याचे काम करायला हवे. चांगली पुस्तके वाचण्यास देऊन त्यावर चर्चा घडवून आणायला हवी. त्यामुळे वाचन, चिंतन आणि मांडणी याची मुलांना सवय होईल

– नलिनी कुलकर्णी, नांदेड

 

 

स्त्री मानसिकताही बदलायला हवी

पुरुषप्रधान संस्कृतीत पुरुषी वर्चस्वाची मानसिकता असणार नाही का? तर ती असणारच..! मुलगी वडिलांचं (अर्थात् पुरुषांचं) नाव व आडनाव लावते आणि लग्न झाल्यावर नवऱ्याचं (अर्थात एका पुरुषाचंच) नाव व आडनाव लावते. नावापासूनच वर्चस्वाची ही खरी सुरुवात..!  ही अशी संस्कृती आपण काही बदलू शकणार नाही; हे समस्त रडक्या बायकांना पक्कं माहिती आहे. मग त्या काय करणार..? या ‘आयत्या’ पुरुषी वर्चस्वावर त्यांचा डोळा असतो. त्यानिमित्ताने प्रत्येक बाईला दुसऱ्या बाईवर आपला अहंकार गाजवायचा असतो आणि तो मिरवायचाही असतो. मग गळ्यात मंगळसूत्र आल्यावर, लग्न न होणाऱ्या बाईवर गाजवणार.. स्वत:ला मुलगा झाल्यावर, मुलगी झालेल्या बाईवर गाजवणार..सासू होऊन सुनेवर गाजवणार आणि नातू झाल्यावर तर जी बाई समोर येईल, तिच्यावर गाजवणार..! अर्थात् या सगळ्याचा फायदा घेणार नाही.. असा पुरुष आहे का..?

– अनामिका

आव्हानात्मक पालकत्व

प्रत्येकालाच यापुढे आव्हानात्मक पालकत्व स्वीकारावे लागणार आहे कारण आपल्या छायेखाली जरी आपली मुले सुरक्षित असली तरी बाहेर असतातच असे नाही म्हणून वास्तवाची कल्पना दिली गेली पाहिजे..अवघड असले तरी ते क्रमप्राप्त आहे.. नको त्या वयात नको ते कुतूहल विकृत स्वरूपात बाहेर पडते तेव्हा त्याला जबाबदारही समाजच असतो.. आता या हिंसक वृत्तीला छेद देण्याची वेळ येऊन ठेपली आहे. स्त्रीनेच स्वसंरक्षणासाठी सज्ज झाले पाहिजे.

– स्वाती पाचपांडे, नाशिक

तू होशील तारणहार

भारतीय संस्कृती कुटुंब रचनेवर आधारित आहे. प्रत्येक स्त्रीने पुरुषी वर्चस्वाची मानसिकता अनुभवलेली असते. मनुष्य स्वभावाचे जसे कंगोरे तसेच पुरुषी स्वभावाचे. त्यामुळे एकच पुरुष वेगवेगळ्या नात्यांत वेगवेगळा भासू शकेल. आताच्या चंगळवादी दुनियेत मात्र सारी समीकरणे पैसा आणि सत्तेपाशी येऊन थांबतात. पुरुष वर्चस्वाची मानसिकता जेव्हा लैंगिक अत्याचार करू लागते तेव्हा तो स्त्रीच्या मनुष्य असण्यावरचा घाला असतो.

त्यासाठी म्हणावसं वाटतं..

स्त्री तू आहेस एक माता निर्भयाची

आणि बलात्काऱ्याचीही.

नको लेखूस तू कमी स्वत:ला आणि दुसऱ्यालाही.

तुला झगडायचे आहे स्वत:शीही

आणि पुरुषी मानसिकतेशीही

मोडून टाक तू परंपरा स्वत:ला कमी लेखण्याच्या

जुन्याही आणि नव्याही.

तरच मग तू होशील तारणहार स्वत:ची

आणि दुसऱ्याचीही.

– प्रणिता गायकवाड

सर्वासमक्ष आवाज उठवावा

मुलींनी अपरात्री, अथवा निर्जनस्थळी जायची गरज भासल्यास पोलीस हेल्पलाइन क्रमांक जवळ बाळगावा. रस्त्यात, प्रवासादरम्यान, कार्यालयात, होणाऱ्या अश्लिल शेरेबाजीविरुद्ध, लंपट स्पर्शाच्या विरुद्ध खुले आम, सर्वासमक्ष आवाज उठवावा. या प्रकारच्या गुन्ह्यंविरुद्धची लढाई स्त्री आणि पुरुष दोघांनी मिळून लढण्याची गरज आहे. त्यासाठी मान्य केलेले स्वत:चे दुय्यम स्थान स्त्रियांनी झुगारून दिले पाहिजे. आणि आत्मविश्वासाने जगावे.

-मुग्धा मोडक, कुर्ला  

विरोध वर्चस्ववादी व्यवस्थेला, पुरुषांना नाही!

आजही अनेक पालक मोठय़ा अभिमानाने सांगतात, ‘आम्ही आमच्या मुलीला मुलासारखं वाढविलं आहे’ यातही पुरुषी वर्चस्वाची मानसिकता आलीच. त्यामुळे घरात मुला-मुलींना वाढवताना दोघांनाही स्वावलंबनाची शिकवण द्यावी. मुलगी वयात आल्यावर तिला हजारो सूचना दिल्या जातात, त्याप्रमाणे मुलींशी कसं वागायचं हा संस्कार मुलांना वयात येताना दिला पाहिजे. या सगळ्या मंथनात विरोध आहे तो फक्त पुरुष वर्चस्ववादी व्यवस्थेला. पुरुषांना नाही! या मागास व्यवस्थेचे बळी आम्ही ठरणार नाही असे समाजातील प्रत्येक स्त्री-पुरुषाने ठरवायला हवे.

– शर्मिला शेंडे, पुणे

समाजच जबाबदार

पुरुषी विकृत मानसिकतेचे धोके आई अनेकदा माहीत असूनही मुलीला सांगत नाही. जो नराधम अशा प्रकारची कृत्ये करतो त्याला समाजाची भीती राहिलेली नाही. या सगळ्याला आपणच जबाबदार असल्यामुळे सगळ्याचं खापर पुरुषी वर्चस्वावर लादून चालणार नाही. एखाद्या बालिकेवर अन्याय झाला तर ती पुरुषी वर्चस्वाची भावना हे मान्य करता येऊ शकते पण भूलथापांना बळी पडून ज्या मुली स्वत:हून या नराधमांच्या जाळ्यात अडकतात. याचा अर्थ आपणच कुठेतरी समुपदेशनात, संस्कारात मागे पडत नाही ना? नात्यातील पुरुषाची बदनामी होईल या भीतीने ती पीडित मुलगी तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करत जगत असते. अशा अन्यायांना वाचा फोडण्याची आणि विकृत पुरुषी वर्चस्वाची सत्ता उलथून टाकण्याची खरी गरज भासते आहे.

– डॉ. विद्या शिंदे, दापोली

सतर्क राहाणे गरजेचे

समाज सुरू होतो आपल्याच घरापासून. त्यामुळे नव्या कायद्याची किंवा अस्तित्वात असलेले कायदे अधिक सक्षम करण्याची मागणी करताना प्रत्येकाने आपण आपल्या घरात कितपत समानता पाळतो याचा विचार करायला हवा. आपण कोणतीही गोष्ट धसास लावून धरत नाही. प्रबोधन करा, कायद्यात बदल करा; पण त्या कायद्याची अंमलबजावणी कशी होते आहे, याबाबत सजग सतर्क राहणे आवश्यक आहे.

– दादासाहेब येंधे, काळाचौकी, मुंबई

मातेनेच करावेत संस्कार

पुरुषी वर्चस्वाची मानसिकता बदलावयाची असेल तर स्त्रीने आधी स्वत: बदलले पाहिजे. नुसतेच सुशिक्षित होऊन चालणार नाही तर सुसंस्कृत व्हावे लागेल. आत्मविश्वास निर्माण करायला हवा. हा पुरुषी वर्चस्वाचा, अहंकाराचा आणि त्या अनुषंगाने होणाऱ्या हिंसाचाराचा बुरखा काढायचा असेल तर प्रत्येक मातेने आपल्या मुलांवर असे संस्कार करावे की, त्याला असे करण्याची हिंमतच होऊ  नये.

– रसिका हिंगे, अकोला 

तरुणाईला द्या ठोस कार्यक्रम

राज्यकर्त्यांनी तरुणाईला विधायक गोष्टींकडे वळवणारा एखादा ठोस कार्यक्रम देणे गरजेचे आहे, तरच मुले वेगळ्या समाजोपयोगी कामात गुंततील. शिवाय कायद्याची आदरयुक्त भीती, नैतिक मूल्यांची जोपासना, सकस विचारांची पेरणी, स्त्रीकडे पाहण्याचा मानवतावादी दृष्टिकोन इत्यादी गोष्टी सजगतेने पेरत जाणे गरजेचे आहे.

– ज्योती कदम, नांदेड

पालक-शिक्षकांचेही प्रबोधन व्हावे

स्त्री-पुरुष भेद नाहीसा करण्यासाठी शिक्षणातून प्रथम शिक्षकांचे व पालकांचे मोठय़ा प्रमाणावर प्रबोधन घडवून आणावे लागेल. शाळेत मुला-मुलींच्या वेगवेगळ्या याद्या करणे, मुलींना विशेष सवलती देणे याचाही विपरीत परिणाम होऊ  शकतो. ‘पुरुषी वर्चस्व’या शब्दांतूनच स्त्रियांची दुर्बलता चित्रित होते. घराघरांतून कुटुंबप्रमुख म्हणून पुरुषाचेच नाव असणे हे गृहीत धरलेले आहे. त्याऐवजी पुरुषाचे नाव त्याच्या पत्नीसमवेत संयुक्तपणे घेतले गेले, घरावर पति-पत्नी दोघांचे नाव लावले गेले, तरी पुष्कळ फरक पडू शकेल. दोन स्त्रियांमधील संघर्ष मिटवायचा असेल, तर आधी पुरुषाच्या वर्चस्वाखाली दबलेल्या स्त्रीला मुक्त करणे गरजेचे आहे. तसेच, प्रत्येक विवाहाची सरकारी नोंदणी करून नवविवाहितांसाठी सरकारने लैंगिक शिक्षण सक्तीचे करावे; हे शिक्षण देण्यासाठी चांगल्या डॉक्टरांची नेमणूक करावी; जेणेकरून नवा जन्म हा मुलाचा असो वा मुलीचा; तो केवळ आनंद असेल. शिक्षणातून जबाबदार, सुज्ञ आणि मानसिकरीत्या सुदृढ समाज निर्माण झाल्यास पुरुषी वर्चस्वाची आणि बलात्कारी प्रवृत्ती दूर होऊ  शकेल.

– मंजुषा जाधव, मुंबई

दोन आघाडय़ांवरची लढाई

एकीकडे मुलींवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना कडक शासन व दुसरीकडे किशोरवयीन मुलांना ‘आभासी समानतेतून’ बाहेर काढून त्यांना उत्तम नागरिक बनवणे अशा दोन्ही आघाडय़ांवर आपल्याला एकदम लढणे जरुरीचे आहे. हे करायला हवे आहे.

– अंजली भातखंडे, नागाव-रायगड

मुलांमध्येच बदल अपेक्षित

पुरुषप्रधान संस्कृतीत राजकारण, समाजकारण व घरांतील व्यवहार या सर्व ठिकाणी थोडय़ा फार फरकाने पुरुषी वर्चस्व दिसून येते. काही घरात अजूनही पुरुषांच्या पुढे दबून वागणाऱ्या स्त्रिया आपल्याला आजूबाजूला दिसतात. आर्थिक सक्षम असूनही अनेकजणींना आर्थिक स्वातंत्र्य नसते. तर वैचारिक स्वातंत्र्य फार पुढची गोष्ट आहे. घरातील स्त्रीला दुय्यम वागणूक देणे हे घरातील पुरुषांकडून मुलांसमोर घडते. त्यामुळे कळत-नकळत मुलांच्या मनात हेच ठसते. त्यापेक्षा मुलांकडे भरपूर ऊर्जा आहे ती चांगल्या ठिकाणी वळविण्यासाठी त्यांना मदत करावी आपल्याकडे खूप संस्था चांगले काम करणाऱ्या आहेत त्यांचे सहकार्य घ्यावे.

– अनुराधा केळकर, डोंबिवली

अहं नकोच

पुरुषांनी स्त्रीचं सामथ्र्य मान्य करायला हवे. सर्व क्षेत्रातील जबाबदाऱ्या दोघांनी एकमेकांच्या विचारांनी सहकार्याने पार पाडाव्यात. आपापले ‘इगो’ बाजूला सारून थोडे पुढे-मागे-सरकून एकमेकांना साथ देऊन तडजोडी करून कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक सर्वच प्रश्न-समस्या सोडवाव्यात. प्रत्येक गोष्टीतील ‘निर्णय’ दोघांच्या एकत्रित विचारांनी घ्यावेत. त्यामुळे दोघांना सर्वच क्षेत्रात ‘यश’ मिळेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 कल्याणी बिदनूर,  नवीन पनवेल