प्रेमाचा पॉवर गेम संपवून स्नेहाचा अनुबंध टिकवून धरायचा असेल, तर एकमेकांच्या त्रुटींना भरून काढणं आणि गुणांना दाद देऊन आपलंसं करणं साधायला हवं. सहजीवनात एकमेकांशी स्पर्धा करत नव्हे, तर एकमेकांसोबत ‘सखा सप्तपदी भव’ म्हणत चालायचं असतं हे विसरून कसं चालेल?.

साल २०१३
कोजागरीला बििल्डगमधल्या सर्व जोडप्यांचा अंताक्षरीचा खेळ रंगत आला होता. विषय होता- प्रेम आणि नाती. एकेका चिठ्ठीवर काही शब्द लिहिले होते आणि त्यातली भावना व्यक्त करणारं गाणं, कविता सादर करायची होती. निकिता आणि प्रणवला चिठ्ठी आली- सुखदु:खातले साथीदार.. निकितानं पटकन म्हटलं- ‘इवलेसुद्धा मळभ आपुल्या आभाळामधी दाटू नये,  कितीही असली तलखी, जिव्हाळा आटू नये..’ सर्वाकडून उत्स्फूर्त दाद आली- ‘वा!  क्या बात है.’
साल २०१४
तशीच कोजागरी, तसाच अंताक्षरीचा खेळ- मात्र आज एकमेकांना आपल्या मनातलं ऐकवायची संधी देणारं गाणं किंवा कविता निवडायची होती. निकिता-प्रणवची वेळ आली. सगळे उत्सुकतेने सरसावले, पण ते दोघं काही फार उत्सुक दिसेनात. फारच आग्रह झाल्यावर प्रणवनं संकोचून पण मनापासून म्हटलं, ‘मला मान्यच आहे तुझी आजची चवल्या-पावल्यांची भाषा, पण एवढं विसरू नकोस, की काल श्वासांनीही बोललो होतो!’ त्या ओळी ऐकत असताना निकिताचा कावराबावरा झालेला चेहरा, मुश्किलीनं आवरलेलं डोळ्यांतलं पाणी आणि प्रणवनं नंतर घट्ट मिटून घेतलेले ओठ पाहून सगळे चिडीचूप झाले. काय घडलं असेल एका वर्षांत, की ज्यामुळे चित्रातले रंग उडून गेल्यासारखे वाटावेत? ‘खोल जिव्हाळ्याची’ भाषा ‘चवल्या-पावल्यांच्या हिशोबात’ बदलून जावी? एक उत्कट नातं असं पाहता पाहता बदलताना दिसलं तर आपणही कोडय़ात पडतो, नाही का? त्यातून त्या दोघांना आणि परिणामत: त्यांच्या निकटच्या सर्वानाच किती मनस्ताप होतो, अस्वस्थता येते, निराशा दाटून येते!
कधी कधी व्यसनं/फसवणूक/ शारीरिक- मानसिक िहसा अशा ठसठशीत कारणांपलीकडेही निकटच्या नात्यांमध्ये अशा काही दुखऱ्या जागा निर्माण होतात, की तिथे नुसतं बोट लागलं तरी ‘स्स:. हाय!’ वाटावं. खरं तर उत्कट प्रेमभावना ही नितांत आनंदाचा, समाधानाचा केवढा मोठ्ठा झरा असते. प्रेमातील जवळीक ही आपल्या भावनांची भूक भागवते, त्यातील बेधुंदपण आपल्याला नातं टिकवण्याची प्रेरणा देत असते, तर त्यातील वचनबद्धता आपल्या विचाराची- विवेकाची जोडणी करत असते. असं सामथ्र्य प्रेमाच्या भावनेत असूनही निकिता आणि प्रणवसारखी अस्वस्था, अपुरेपणा आणि दु:ख का निर्माण होतं? तर तिथे प्रेमाच्या निखळ अनुभवाऐवजी त्याचा ‘पॉवर गेम’ सुरू  झालेला असतो.
 लहानपणी ‘शिवाजी म्हणतो’ या नावाचा खेळ असायचा. ‘शिवाजी’ झालेला भिडू सांगेल तसं करायचं. हात वर- हात खाली- बेडूक उडय़ा मारा, गोल फिरा.. इत्यादी. त्या शिवाजीला सर्वाधिकार बहाल केलेले असायचे. (मध्येच कधी तरी चकवायला, ‘संभाजी म्हणतो’ला प्रतिसाद दिला तर खेळातून आऊट! भाव फक्त शिवाजीला!) त्याला कुणी प्रतिवाद करायचा नाही. एरवी तो अगदी घट्ट मित्र/मत्रीण असली, हक्कानं मारामारी करण्यातला असला तरी, एकदा का ती व्यक्ती खेळात ‘शिवाजी’ झाला, की पूर्ण शरणागती अपेक्षित! खेळ म्हणून तो खूप  रंगायचा. प्रत्येकानंच आपण शिवाजी झाल्यावर इतरांकडून काय काय करवून घ्यायचं याचं मस्त चित्र रंगवलेलं असायचं; पण हाच खेळ वेगळ्या रूपात जेव्हा पती-पत्नी खेळायला लागतात तेव्हा प्रेमाचा पॉवरगेम सुरू होतो. ‘आपल्याला हवं तसं दुसऱ्यानं वागलंच पाहिजे, तरच त्याचं/तिचं आपल्यावर खरंखुरं प्रेम आहे’ असं समीकरण एकदा का डोक्यात बसलं, की आपला असा (खेळातला) शिवाजी झालाच! तिथे प्रेम हा शब्द वादाची ठिणगी पेटवणारी काडेपेटीच जणू.
पृथा आणि संजय भेटायला आले होते. लग्न होऊन ४-५ र्वष होऊन गेली होती. दोघंही एकमेकांवर नितांत प्रेम करणारे, पण गेल्या दोन वर्षांत गाडी घसरली होती. एकमेकांवरच्या प्रेमाची खात्री वाटेनाशी झाली होती. ‘ तू  करत  नाहीस- मी मात्र कायम तुला हवं तसं वागायचो-चे!’ हे दोघांचंही ध्रुवपद होतं. अपेक्षा दोघांच्याही होत्या, पण पूर्ण करण्याची जबाबदारी आधी दुसऱ्यानं घ्यावी हे मागणं होतं. बरंच बोलल्यावर लक्षात आलं, की त्यांना एकमेकांची प्रेम व्यक्त करण्याची भाषाच समजून घेता येत नव्हती. कल्पना करू या की, एक िहदी भाषिक एका फ्रेंच भाषिकाशी फोनवर बोलतो आहे. दोघांनाही मनापासून संवाद करायचाय- चेहरा वाचायची सोय नाही- तर कितीही इच्छा असो, जोवर ते एकमेकांची भाषा शिकत नाहीत (किमान एक जण तरी!) तोवर संवाद अशक्य आहे. हे सांगितल्यावर संजय म्हणाला, झाली की आता पाच र्वष, आता अजून किती शिकायचं? त्याला म्हटलं, संजय, तू पहिलीत इंग्रजी शिकायला सुरुवात केलीस ना? फाडफाड इंग्रजी यायला किती र्वष लागली रे? शब्दांची- तांत्रिक भाषा बरी यायलासुद्धा ७-८ र्वष किमान लागतात. मग भावनांची भाषा शिकायला पुरेसा वेळ नको का तुम्ही दोघांनी द्यायला?
 बऱ्याच जणांना ‘आय लव्ह यू’ म्हणणंच मुख्य अभिव्यक्ती आहे असं वाटतं; पण ‘कोर्टशिप’मधल्या प्रेमापेक्षा नंतरच्या सहवासातलं प्रेम कळायला शब्दांपलीकडेच बघावं लागतं.
* निनाद न विसरता प्रतिमासाठी दूरवरून छोटे छोटे हस्तकलेचे नमुने आणतो, तिच्या आवडीचा तो प्रांत आहे ना! तिचा चेहराच त्याला दाद देतो.
*  क्षिप्राला लगेच कळतं की, प्रथमेशची अ‍ॅसिडिटी वाढली आहे. उपदेशाचे डोस पाजायच्या आधी ती त्याचं डोकं हलक्या हातानं दाबून देते, कोमट लिंबू सरबत पाजते आणि मग औषध देते. तोही मग सुखावतो.
*  प्रांजलला प्रमोशन मिळाल्याचं त्यानं सांगितल्याबरोबर सानिकानं काहीही न बोलता त्याचा हात गच्च दाबून ठेवला. त्या स्पर्शातून- जवळिकीतून तिचं कौतुक त्याच्यापर्यंत पोचलं. ही सर्व मंडळी काय कधी वाद घालत नसतील? का त्यांना एकमेकांबद्दल काही नाराजीच नसेल? पण त्यापलीकडे ‘आपलं एक दुसऱ्यावर प्रेम आहे’ हे एकाच पद्धतीनं (किंवा आपल्याला हवं त्याच प्रकारे) व्यक्त होणारं नसू शकतं- हे त्यांनी एकमेकांपुरतं स्वीकारलेलं आहे.
आपल्या जोडीदाराची ही भाषा कळायला (आणि स्वीकारायला) वर्षांनुवर्षांचा रियाझ हवा. एक-दोन वर्षांत आपल्याला एखादा माणूस अंतर्बाहय़ कळला (आणि पटला) पाहिजे, असा अट्टहास करून चालेल का? केमिस्ट्री जुळणं नावाची जी गोष्ट आहे त्यालासुद्धा पुरेसा (पूर्वीच्या भाषेत ५० र्वष- आज निदान ५-७ वर्षे..) वेळ आपण देतो का? की आपल्या प्रेमाचा पॉवर गेम होऊ देतो? या केमिस्ट्रीमध्ये फक्तदिसणं असावं का? असणं (Being) सुद्धा महत्त्वाचं आहे, असे अनेक प्रश्न माझ्या मनात पृथा आणि संजयमुळे निर्माण झाले.
वैवाहिक नात्याचा शास्त्रीय अभ्यास करणाऱ्यांनी पाच प्रकारच्या जोडप्यांचं वर्णन केलं आहे.
* चतन्यपूर्ण (Vitalized)- ज्यांचं नातं दोघांनाही अत्यंत स्फूर्तिदायक, दीर्घकाळाची निश्चिती देणारं वाटतं.
* सुसंवादी (Harmonious)- जे अजून एकमेकांना समजून घेतायत, पण दोघांमध्ये फार कलह नाही. नातं जपणं त्यांना महत्त्वाचं वाटतं.
* पारंपरिक (Traditional)- नात्यामध्ये फार सुसंवाद नाही, पण धर्म/मुलंबाळं, परंपरा, समाजाचं दडपण यामुळे नातं टिकवण्यावर एकमत असतं.
* संघर्षमय (Conflicted)- एकमेकांशी जमवून घेण्यात खूप अडचणी असतात. इच्छा असूनही व्यक्तिमत्त्व किंवा तात्कालिक कारणांमुळे सतत उडणारे खटके.
* तुटलेली/ दुभंगलेली (Devitalized) जे नातं आता केवळ नावापुरतंच आहे. दोघांचीही त्यात गुंतवणूक नाही. कोरडेपणा- भावहीनता आहे. पूर्ण तुटलेलं नाही इतकंच. अर्थातच या सर्व अवस्थांमध्ये बरीचशी जोडपी खाली-वर होत असतात. जिथे ती स्थिरावतात तिथे त्या नात्याची नियती ठरते. पारंपरिकता जपणं तुलनेनं सोपं असतं, पण संघर्ष अनुभवणाऱ्यांना सुसंवादाकडे जाण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. पॉवर गेम टाळण्यासाठी पदोपदी जागं राहावं लागतं.
कधी कधी व्यक्तिभिन्नताच एवढय़ा असतात की, त्यातून अनेक ताण निर्माण होतात. कल्पना करू या की, एका विटेला एक फुगा दोरीनं बांधला आहे. प्रकाश (म्हणजे वीट!) अगदी शिस्तप्रिय, सगळं ठरलेलं, चाकोरीप्रमाणे करणारा आहे, तर नीता (फुगा!) मुक्त छंद आहे. महिन्याचं नियोजन प्रकाश ठरवतो आणि पाळतो, तर आवडलेल्या सिनेमाला नीता त्याला आग्रहपूर्वक खेचून नेते, कधी अचानक विचार बदलून हॉटेलला जाऊ या म्हणते! लग्नापूर्वी ते खरं तर या भिन्नतेमुळे नकळत एकमेकांना संतुलित करत असतात. तेव्हा हे एकमेकांचे गुण फार भारी वाटत असतात, पण प्रत्यक्ष लग्नानंतरच्या सहवासात तेच गुण नात्यांवरची ओझी बनायला लागतात. आधीचा नेटकेपणा म्हणजे कजागपणा वाटू लागतो, मुक्तछंदता बेजबाबदारपणाची वाटते आणि मग एकमेकांवर कुरघोडीचे प्रयत्न चालू होतात. मीच कसा/कशी योग्य याचा अट्टहास सुरू होतो. प्रकाश आणि नीता हे विसरूनच जातात की, या वृत्ती कधी काळी त्यांच्या स्ट्रेन्थ होत्या. आज त्या तशा वाटेनाशा होतात, कारण प्रत्येक प्रसंगालाच त्या लागू करण्याचा हट्ट असतो, पण त्यांनी जर हे समजून घेतलं की, जिथे नेटकेपणा, व्यवस्थितपणा लागतो तिथे नीतानं प्रकाशला वाव द्यायचा आणि जिथे रूटीनमुळं येणारा कंटाळा/ तोचतोचपणा असतो तिथं प्रकाशनं नीताचं ऐकायचं- तर ‘वीट आणि फुग्याला बांधलेल्या त्या दोरीवरचा ताण’ किती तरी कमी होईल. आपल्या वृत्ती या सर्वच सारख्या उपयोगाच्या नसतात, पण योग्य त्या प्रसंगासाठी त्या ताकद म्हणून जरूर वापराव्यात, हे समजून घेतलं तर पॉवर गेमकडून आपण सहकार्याकडे आपोआप जातो नाही का?
कधी कधी काही पती-पत्नींपकी एकाची काही तरी गंभीर समस्या असते आणि दुसऱ्या व्यक्तीचे ती समस्या गंभीर राहावी म्हणून नकळत प्रयत्न चालू असतात, कारण त्यात एक न दिसणारा फायदा असतो. मग तो उपदेश करायला मिळणं असेल किंवा आपलं ‘बिचारेपण’ सर्वासमोर उगाळणं असेल! अशा वेळी डेड एन्डसारखी परिस्थिती निर्माण होते. कधी दोघेही एकमेकांमधील त्रुटीच कायम शोधत राहतात आणि त्याच वेळी स्वत:तलं अपूर्णत्वही त्यांना खुपत असतं. जणू काही एकमेकांचं आयुष्य ते निराशेने, दु:खाने झाकोळून टाकतात आणि तरीही एकमेकांना घट्ट चिकटून राहतात. एकमेकांशिवाय दुसरं जगणंच ते अनुभवत नाहीत.
 जेव्हा जोडप्यातील एक जण दुसऱ्याला अगदी स्वत:च्या मुशीतलं बनवायचा प्रयत्न करतो तेव्हा तर हा पॉवर गेम खूपच गंभीर होतो. असे ‘आपुल्यासारिखे करिती तात्काळ’ पती-पत्नी एकमेकांचं जगणं मुश्कील करून टाकतात. ‘मला संगीत आवडतं, तर त्यालाही  आवडलंच पाहिजे.’ ‘मला शिस्तप्रियता जमते, तर तिलाही तशीच आणि तेवढीच जमली पाहिजे.’ ‘मला फालतू खर्च आवडत नाहीत, तर त्यानेही करताच कामा नयेत.’ असल्या जबरदस्तीच्या फासात एकमेकांचे गळे आवळून ठेवतात.
प्रेमाचा पॉवर गेम संपवून स्नेहाचा अनुबंध टिकवून धरायचा असेल तर प्रत्येकानं स्वत:च्या असा एक अवकाश निर्माण करायला हवा. एकमेकांच्या त्रुटींना भरून काढणं आणि गुणांना दाद देऊन आपलंसं करणं साधायला हवं.
दु:ख, निराशा, चिडचिड व्यक्त होणारंच, पण ती करताना दुसऱ्याचा व्यक्ती म्हणून अपमान होणार नाही हे पाहायला हवं आणि हो! ‘मनापासून चुकलं’ असं म्हणायची लाज वाटता कामा नये. शेवटी सहजीवनात एकमेकांशी स्पर्धा करत नव्हे, तर एकमेकांसोबत ‘सखा सप्तपदी भव’ म्हणत चालायचं असतं हे विसरून कसं चालेल?.
डॉ. अनघा लवळेकर -anagha.lavalekar@jnanaprabodhini.org

Ram Navami 2024 Wishes Messages Status in Marathi
Ram Navami 2024 Wishes : रामनवमीच्या द्या प्रियजनांना हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर मेसेज
chatura article on small kid, chatura parent article
समुपदेशन : मुलांच्या जगातून पालक हरवतात?
swanand kirkires article on kumar gandharv
आठवणींचा सराफा: गुरू तो सारिखा कोई नाही…
it is bothering because social media is ahead of the times and we are behind
फरफट होतेय कारण समाज माध्यमे काळाच्या पुढे आहेत आणि आपण मागे…